पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्‍यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani

  • केंद्रीय गृह मंत्रालयाचे माजी अवर सचिव आणि ‘पद्मश्री’प्राप्त आर्.व्ही.एस्. मणी यांनी केला दावा

  • ‘पीपल-टू-पीपल कॉन्टॅक्ट’च्या नावाखाली चालू होती तस्करी

  • भारतातील पाकपुरस्कृत आतंकवादाला अमली पदार्थांच्या तस्करीतून मिळत असे ३० टक्के निधी

(भारत-पाकिस्तान यांच्यातील पीपल-टू-पीपल कॉन्टॅक्ट म्हणजे उभय देशांतील कलाकार, खेळाडू आदींचे येणे-जाणे)

नवी देहली – भारत दौर्‍यावर आलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघातील अनेक खेळाडू अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये सहभागी होते. या तस्करीतून निर्माण होणारा पैसा आतंकवादी आक्रमणांसाठी वापरला जात होता, असा खळबळजनक दावा भारताच्या केंद्रीय गृह मंत्रालयातील माजी अवर सचिव आर्.व्ही.एस्. मणी यांनी केला आहे. मणी यांनी एका मुलाखतीत असा दावा करतांना शोएब अख्तर, महंमद आसिफ, सलीम मलिक, शाहिद आफ्रिदी आणि हसन रझा या क्रिकेटपटूंची नावे घेतली. या कृत्यामागे पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आय.एस्.आय.’ असल्याचा आरोपही त्यांनी केला.

वर्ष २०२६ मध्ये पद्मश्री पुरस्कार प्राप्त मणी यांनी यासंदर्भात एक उदाहरण दिले. ते म्हणाले की, ऑक्टोबर २००६ मध्ये पाकिस्तानच्या उच्चायुक्तांकडे अख्तर आणि आसिफ यांनी भारताच्या दौर्‍यावर असतांना स्वत:समवेत अमली पदार्थ नेल्याची स्वीकृती दिली होती. त्या वेळी उच्चायुक्तालयाने त्यांना मायदेशी पाठवले. दोघांनी म्हटले होते की, अमली पदार्थ आम्ही वैयक्तिक वापरासाठी नेले होते; परंतु ती केवळ एक चाल किंवा सबब होती. त्यामागील संपूर्ण पार्श्वभूमी समजून घेणे आवश्यक आहे.

पाकिस्तानी प्रशिक्षक बॉब वूल्मर यांची तस्करीला विरोध केल्यावरून हत्या ! – मणी

पाकचे इंग्लंडचे प्रशिक्षक बॉब वूल्मर

मणी म्हणाले की, हे केवळ एका व्यक्तीच्या वैयक्तिक वापरापुरते मर्यादित नव्हते. अख्तर आणि आसिफ यांना १६ ऑक्टोबर २००६ या दिवशी परत पाठवण्यात आले. त्यानंतर अवघ्या ६ महिन्यांत मार्च २००७ मध्ये पाकचे इंग्लंडचे प्रशिक्षक बॉब वूल्मर यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यांनी पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या या अमली पदार्थांच्या तस्करीला विरोध केला होता. या सर्व घटनांमधील दुवे जोडले, तर आपणास हा भाग लक्षात येईल.

तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम् केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अहवालांकडे करत असत कानाडोळा !

तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम्

असे सर्व घडत असतांना गुप्तचर यंत्रणा आदींच्या सूचना मिळत नव्हत्या का, या प्रश्नावर मणी म्हणाले की, गुप्तचर यंत्रणांकडून आलेले अनेक अहवाल गृह मंत्रालयात तसेच पडून रहात; कारण गुप्तचरांचे काम केवळ आम्हाला सावध करणे किंवा माहिती देणे एवढेच असते. त्यानंतर संबंधित विभागाने त्या प्रकरणावर कार्यवाही करणे अपेक्षित असते.

यासंदर्भात मणी यांनी २-३ उदाहरणे देत सांगितले की, पाकिस्तानी शिष्टमंडळातील काही लोक काही घंट्यांसाठी गायब व्हायचे आणि मग परत यायचे. या सर्व गोष्टी होत्या, पण आम्ही त्याविषयी काहीच करू शकत नव्हतो; कारण त्या वेळी गुप्तचर यंत्रणेकडून केवळ संशय व्यक्त केला जात होता. जर मला अन्वेषण यंत्रणेकडून त्यांची चौकशी करवून घ्यायची असेल, तर गृह मंत्रालयाने किंवा त्या-त्या काळातील गृहमंत्र्यांनी तशी अनुमती कधीच दिली नाही – मग ते शिवराज पाटील असोत किंवा पी. चिदंबरम् असोत. या उलट चिदंबरम् यांनी पाकिस्तानी प्रतिनिधींना साहाय्य करण्यासाठी पुढाकार घेतला होता.

मणी म्हणाले की, आम्ही गुप्तचर यंत्रणेच्या साहाय्याने अत्यंत बारकाव्यांनिशी अहवाल (डॉसियर) बनवायचो, परंतु चिदंबरम् त्याकडे कानाडोळा करायचे. ते त्यांच्या आवडत्या ‘सीबीआय’कडून अहवाल बनवून घेत असत. (चिदंबरम्‌च भगव्या आतंकवादाचे पुरस्कर्ते होते. या माध्यमातून त्यांना हिंदुत्वनिष्ठ संघटनांना आतंकवादी ठरवायचे होते. आता मणी यांच्या या दाव्यांवरून तरी मोदी सरकारने चिदंबरम् यांना अटक करून त्यांची कसून चौकशी करून त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली पाहिजे ! – संपादक)

पाकिस्तानी खेळाडू, कवी, लेखक भारताच्या दौर्‍यावर असतांना करायचे अमली पदार्थांची तस्करी !

मणी म्हणाले की, पाकिस्तानी शिष्टमंडळे अमली पदार्थ आणत असत आणि त्या काळातील गुप्तचर विभागाच्या अनुमानानुसार भारतातील ३० टक्के आतंकवादी आक्रमणांसाठीचा निधी अमली पदार्थांच्या व्यापारातूनच येत असे. भारतात अमली पदार्थ ढकलणे किंवा त्यांची तस्करी करणे, हे पाकिस्तानचे अधिकृत धोरण आहे. म्हणूनच आम्ही म्हणायचो की, जर अफगाणिस्तानमधील जलालाबादमध्ये अफूचे पीक (उत्पादन) चांगले झाले, तर येथे अधिक आक्रमणे होणार. आम्ही तसा अनुमान लावायचो, असे मणी म्हणाले.

हे ही वाचा → मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani

मणी पुढे म्हणाले की, पाणीवाटपाच्या वाटाघाटींसाठी येणार्‍या अधिकृत (राजकीय) शिष्टमंडळांकडून ही तस्करी कधीही होत नसे. तथापि ‘लोकांचा लोकांशी संपर्क’ हा जो प्रकार असायचा, म्हणजे खेळाडू, कवी, लेखक, कलाकार आदींच्या माध्यमातून ही तस्करी होत असे. ‘लोकांचा लोकांशी संपर्क’ हाच सर्वांत मोठा फसवणुकीचा प्रकार होता.

संपादकीय भूमिका

  • या दाव्यांमध्ये तथ्य असण्याची शक्यताच अधिक आहे. याचे कारण पाकिस्तानी क्रिकेटपटू खेळापेक्षा त्याच्याकडे जिहादी युद्धाच्या दृष्टीकोनातूनच पहात आले आहेत. खेळाडूंनी काश्मीरचा राग आळवण्यातूनही हे अनेक वेळा समोर आले आहे. यामुळे आता भारताने पाकसमवेतचे सर्व व्यवहार बंद केले पाहिजेत !
  • आतातरी पाकिस्तानला ‘आतंकवाद्यांचा देश’ घोषित करून जगाने त्याच्यावर प्रतिबंध लादले पाहिजेत. यासाठी भारत सरकार पुढाकार घेणार आहे कि नाही ?
  • जे भारतीय पुरोगामी ‘भारत-पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंधांपेक्षा कलाक्षेत्रातील देवाण-घेवाणीला महत्त्व दिले पाहिजे’, असा राग आळवत आले, त्यांच्या विरोधात आता राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंद करा !