Jaish Female Terrorist : जयपूर (राजस्थान) येथे हिंदु महिला ‘जैश-ए-महंमद’च्या संपर्कात !

  • धर्मांतर करून जिहादी आतंकवाद्याशी केले ऑनलाईन लग्न

  • पाकिस्तानला जाण्याचा करत होती प्रयत्न

बबीता धाकड

जयपूर (राजस्थान) – राजस्थान आतंकवादविरोधी पथक आणि गुप्तचर यंत्रणा यांनी येथे ‘जैश-ए-महंमद’ या आतंकवादी संघटनेची एक महिला ‘स्लीपर सेल’ (छुप्या पद्धतीने आतंकवाद्यांना साहाय्य करणारे धर्मांध मुसलमानांचे स्थानिक गट) बबीता धाकड हिला अटक केली आहे. बबीताच्या अटकेमुळे एका जाळ्याची माहिती उघड झाली. या जाळ्याद्वारे महिलांचा बुद्धीभेद करून त्यांना लक्ष्य बनवले जात असल्याची माहिती समोर आली. भारतात महिला आतंकवादी सिद्ध करण्यासाठी ‘जमात-उल-मुमिनात’ नावाचा एक महिला विभाग चालू करण्यात आल्याचे समजले आहे.

पाकिस्तानी आतंकवादी हँडलर्सनी (भारतात आतंकवादी कारवाया करण्यासाठी नियंत्रण आणि संचालन करणारे लोक) सामाजिक माध्यमांद्वारे बबीताशी संपर्क साधला होता. यानंतर तिला सतत भारतविरोधी आणि कट्टरपंथी साहित्य अन् व्हिडिओ दाखवून तिचा पूर्णपणे बुद्धीभेद करण्यात आला. यात बबीता अडकली आणि तिने ऑनलाईनच ‘कलमा’ (अल्लाचा गौरव करणारी विधाने) पठण करण्यास चालू केले. तसेच स्वतःचे नाव पालटून ‘खदिजा’ ठेवले. ती मोठे राष्ट्रविरोधी कृत्य करण्याच्या सिद्धतेत होती. ती पाकिस्तानला जाऊ इच्छित होती, हेही समोर आले आहे.

आतंकवादी अबू उबैदा याच्यासमवेत करायचे होते लग्न

चौकशीत समोर आले आहे की, बबीता अबू उबैदा नावाच्या आतंकवाद्याच्या संपर्कात होती. असेही म्हटले जात आहे की, बबीताने या उबैदासमवेत ऑनलाईन विवाह केला होता, तसेच धर्मांतरही केले होते. लग्नानंतर तिला पाकिस्तानला जायचे होते. यासाठी तिने पारपत्र बनवण्याचाही प्रयत्न केला होता. बबीताला नेपाळ, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात या देशांच्या मार्गाने पाकिस्तानला बोलवण्याचा प्रयत्न होता. अबू उबैदाच्या प्रेमजाळ्यात फसलेल्या बबीताचे एक ‘क्रिप्टोकरन्सी’ (आभासी चलन) खातेही आहे. हे खातेही बबीताला पाकिस्तानला बोलवण्यासाठीच बनवून घेण्यात आले होते, असे सांगितले जात आहे.

पतीसमवेतच्या वादामुळे जयपूरमध्ये वडिलांसोबत रहात होती

प्राथमिक अन्वेषणात समोर आले आहे की, बबीता मूळची गंगापूर सिटी येथील रहाणारी आहे. बबीताचे वडील खादी विभागात कार्यरत होते. बबीताचे लग्न हिंडौन येथे झाले होते; परंतु गेल्या बर्‍याच काळापासून पतीसमवेतचे मतभेद आणि घटस्फोटाचा खटला चालू असल्यामुळे ती जयपूरमध्ये तिच्या वडिलांसमवेतच रहात होती. याच एकटेपणाचा आणि कौटुंबिक वाद यांमुळे सामाजिक माध्यमांत सक्रीय झाल्यावर ती आतंकवाद्यांच्या संपर्कात आली.

संपादकीय भूमिका

हिंदूंना धर्मशिक्षण नाही आणि त्यामुळे धर्माभिमान अन् राष्ट्राभिमान नसल्याने ते अशा जाळ्यात अडकतात आणि धर्म अन् देश यांचा घात करतात !