Declare SavarkarSadan National Memorial : शासनाने ‘सावरकर सदन’ संपादन करून ‘राष्ट्रीय स्मारक’ घोषित करावे !

  • हिंदु जनजागृती समितीची आंदोलनाद्वारे मागणी

  • पुनर्विकासाच्या नावाखाली ‘सावरकर सदन’ भुईसपाट होऊ देणार नाही ! - सावरकरप्रेमींचा दृढ निश्चय

मुंबई येथील उपेक्षित असलेले ‘सावरकर सदन’

रत्नागिरी – स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतीकारकांचे महामेरू स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या मुंबईच्या दादर येथील ऐतिहासिक ‘सावरकर सदन’ या वास्तूवर पुनर्विकासाच्या नावाखाली ‘बिल्डर लॉबी’कडून भुईसपाट होण्याचे संकट आले आहे. ही ऐतिहासिक वास्तू भुईसपाट होण्यापासून वाचवण्यासाठी आणि तिचे जतन करण्यासाठी सरकारने त्या वास्तूला ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समिती अन् समविचारी संघटना यांच्या वतीने धरणे आंदोलनात करण्यात आली. हे आंदोलन २८ मे या दिवशी येथील जयस्तंभ येथे करण्यात आले. या वेळी सावरकरप्रेमींनी ‘पुनर्विकासाच्या नावाखाली ‘सावरकर सदन’ भुईसपाट होऊ देणार नाही’, असा दृढ निश्चय व्यक्त केला. यानंतर सावरकरप्रेमींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांना मागण्यांचे निवेदन दिले.

जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांना निवेदन देतांना सावरकरप्रेमींचे शिष्टमंडळ

या आंदोलनात शिक्षक परिषद, रत्नागिरीचे श्री. राजेश आयरे, भाजपचे रत्नागिरी शहर सरचिटणीस श्री. नीलेश आखाडे, भाजपचे रत्नागिरी शहर उपाध्यक्ष श्री. शैलेश बेर्डे, भाजपचे दक्षिण रत्नागिरीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. संदीप नाचणकर, कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष श्री. अनंत आगाशे, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष श्री. गणेश गायकवाड, विश्व हिंदु परिषदेचे धर्मप्रसार विभागप्रमुख अधिवक्ता सचिन रेमणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. समीर करमरकर, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य संघटक श्री. संजय जोशी आणि सनातन संस्थेच्या सौ. शुभांगी मुळ्ये यांच्यासह अनेक सावरकरप्रेमी संघटना अन् नागरिक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या वेळी नागरिकांनी सावरकर यांच्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला आणि ‘सावरकर सदन वाचवा !’ अशा घोषणा दिल्या.

आंदोलनाच्या वेळी घोषणा देतांना सावरकरप्रेमी

‘जिना हाऊस’ला संरक्षण आणि सावरकर सदनावर पडझड का ? – गोविंद भारद्वाज, जिल्हा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

श्री. गोविंद भारद्वाज

‘जिना हाऊस’ला संरक्षण, मग सावरकर सदनावर पडझड का ? भारताच्या फाळणीला आणि लाखो हिंदूंच्या कत्तलीला कारणीभूत असणार्‍या महंमद अली जिना यांचे मुंबईतील ‘जिन्ना हाऊस’ स्वतंत्र भारतात सुरक्षित रहाते; मात्र अखंड भारतासाठी सर्वस्व अर्पण करणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या निवासस्थानाला पुनर्विकासाच्या नावाखाली पाडण्याची वेळ येते, हे दुर्दैवी आहे. केंद्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील घर कोट्यवधी रुपये खर्चून ताब्यात घेतले, तसेच इंदू मिलच्या जागेवर भव्य स्मारक उभारले जात आहे. त्याच धर्तीवर स्वातंत्र्यवीर सावरकर तब्बल ४ दशके (वर्ष १९२८ ते १९६६) राहिले, त्या ‘सावरकर सदना’चेही शासनाने त्वरित संपादन करावे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने वर्ष २०१० मध्येच या वास्तूचा वारसा सूचीत समावेश करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडे शिफारस पाठवली होती; मात्र गेल्या १५ वर्षांत शासनाने यावर अंतिम निर्णय घेतलेला नाही. याचा अपलाभ घेऊन ‘बिल्डर लॉबी’ ही वास्तू बळकावण्याचा प्रयत्न करत आहे.

…अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करू !

जर सरकारने या ऐतिहासिक वास्तूचे संरक्षण करण्यासाठी त्वरित पावले उचलली नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्रात सावरकरप्रेमी अधिक तीव्र आंदोलन करतील, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आली.

हे ही वाचा → Hindu Vidhidnya Parishad Demands : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील घराप्रमाणे महाराष्ट्रातील ‘सावरकर सदन’ खरेदी करून त्याचे संवर्धन करावे !

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक –

निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या

१. ‘सावरकर सदन’ वास्तूची मालकी सरकारने स्वतःकडे घेऊन तिथे सावरकर यांची हस्तलिखिते आणि त्यांनी लिहिलेली पत्रे यांचे भव्य संग्रहालय करावे, तसेच संशोधन केंद्र आणि डिजिटल लायब्ररी विकसित करावी.

२. या वास्तूच्या संवर्धनासाठी विशेष निधीचे प्रावधान करून सकारात्मक निर्णय घ्यावा.