कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्याजवळ घंटानाद आंदोलन करणार्‍या शिवसैनिकांवर गुन्हा नोंद !

शिवसैनिक पोलिसांच्या कह्यात !

कल्याण (जिल्हा ठाणे) – ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावरील मंदिरात हिंदु भाविकांना प्रवेश मिळावा आणि हिंदु भाविकांवरील निर्बंध हटवण्यात यावेत, या मागणीसाठी कल्याण येथील लालचौकी येथे गडाच्या प्रवेशद्वारापासून काही अंतरावर शिवसेना अन् अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी घंटानाद आंदोलन केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी २०० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुर्गाडीच्या दिशेने जाणार्‍या शिवसैनिकांना पोलिसांनी बॅरिकेड्स (प्रतिबंधात्मक जाळीद्वारे) रोखले. नमाजपठणाच्या काळात एकाही शिवसैनिकाला पोलिसांनी तेथे जाऊ दिले नाही. पोलिसांनी आंदोलनकर्त्या शिवसैनिकांना कह्यात घेतले आणि त्यांना प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पोलीस ठाण्यात नेले. त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला.

या वेळी हिंदूंनी ‘दुर्गाडी किल्ला आमच्या हक्काचा’ अशा घोषणा दिल्या. (हा हक्क हिंदु राष्ट्रातच मिळणार आहे, हे हिंदूंनी लक्षात घेऊन त्यासाठी कृतीशील व्हावे ! – संपादक) ‘हिंदु भाविकांना श्री दुर्गादेवीच्या मंदिरात प्रवेश मिळालाच पाहिजे, तो आम्हा हिंदूंचा हक्क आहे’, अशा आशयाचे फलक सर्वांनी हाती घेतले होते. शुभ्र सदरे आणि भगव्या टोप्या यांमुळे वातावरणात वीरश्री संचारली होती.

काय आहे प्रकरण ?

बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी जिल्हा प्रशासनाकडून बंदी घातली जाते. बंदीच्या या निर्णयाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विरोध दर्शवला होता. वर्ष १९८२ पासून शिवसेनाप्रमुखांच्या आदेशांनुसार शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी येथे घंटानाद आंदोलन चालू केले होते. ते अजूनही चालू आहे. हा वाद गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ चालू आहे.

संपादकीय भूमिका

  • राज्यात हिंदुत्वनिष्ठ सरकार असतांना मुसलमानांना नमाजपठणाची अनुमती आणि हिंदूंना मात्र मंदिरात जाण्यास विरोध असा दुटप्पीपणा का ?
  • गडावर हिंदूंना प्रतिबंध केला जाणे, हे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रासाठी अन्यायकारक होय !