पुन्हा सत्तेवर आल्यास आसाममधून २४ घंट्यांत ‘मियां मुसलमानां’ना’ बाहेर काढण्याचा कायदा आणू – Himanta Biswa Sarma

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचे आश्वासन

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

गौहत्ती (आसाम) – भाजप सरकार तिसर्‍यांदा सत्तेत आल्यास आसाममधून स्थलांतरितांना बाहेर काढण्याचा ‘अधिनियम, १९५०’ लागू केला जाईल. (या कायद्यामुळे जिल्हाधिकारी यांना २४ घंट्यांत अवैध स्थलांतरितांना हटवण्याचा अधिकार मिळतो) तसेच बांगलादेशी मियाँकडून (मुसलमानांकडून) झालेल्या अतिक्रमणाविरोधातील मोहीम अधिक तीव्र केली जाईल आणि त्यांना भूमीचा एक इंचही तुकडा ठेवू दिला जाणार नाही. पुढील ५ वर्षांत आम्ही बांगलादेशी मियाँची कंबर मोडू, असे आश्वासन आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी दिले.

मुख्यमंत्री सरमा यांच्या ‘मियां मुसलमान’ या शब्दांवरून काँग्रेसने टीका केली आहे. ‘निवडणुकीत अशा प्रकारची भाषा लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे’, असे काँग्रेसचे नेते गौरव गोगोई यांनी म्हटले आहे.

समान नागरी संहिता लागू करण्याची घोषणा !

भाजपच्या घोषणापत्रात समान नागरी संहिता लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. सरमा यांनी दावा केला की, सत्तेत आल्यानंतर ३ महिन्यांच्या आत ती लागू केली जाईल. सहाव्या अनुसूचीअंतर्गत येणार्‍या आदिवासी भागांना यातून वगळण्यात येईल. सरकारच्या मते, लव्ह जिहाद आणि भूमी जिहाद यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय आवश्यक आहे.

‘पूरमुक्त आसाम’चे पुन्हा आश्वासन !

भाजपने पुढील ५ वर्षांत आसामला पूरमुक्त करण्याचा दावा पुन्हा केला आहे. यासाठी पहिल्या २ वर्षांत १८ सहस्र कोटी रुपये खर्च करण्याची योजना आखण्यात आली आहे.