Dhaka Indian Embassy Attacked : ढाका (बांगलादेश) येथील भारतीय दूतावासावर सहस्रो जिहाद्यांचा आक्रमणाचा प्रयत्न

भारताकडून ढाक्यातील व्हिसा अर्ज केंद्र तात्पुरते बंद !

ढाका (बांगलादेश) : बांगलादेशाची राजधानी ढाका येथे १७ डिसेंबरच्या सायंकाळी सहस्रोंच्या संख्येने जिहादी मुसलमानांनी भारताच्या दूतावासावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सुरक्षेमुळे हा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. या घटनेनंतर भारताने भारतीय व्हिसा अर्ज केंद्र तात्पुरते बंद केले आहे. ज्या अर्जदारांची अर्ज सादर करण्याची वेळ निश्चित होती त्यांचा दिनांक पुढील काळासाठी नव्याने ठरवण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले. ढाक्यातील जमुना फ्युचर पार्कमध्ये असलेले हे केंद्र राजधानीतील सर्व भारतीय व्हिसा (एखाद्या देशात प्रवेश करण्याची, एखादा देश सोडून जाण्याची किंवा एखाद्या देशातून प्रवास करण्याची अनुमती देणारे अधिकृत कागदपत्र किंवा शिक्का) सेवांसाठी मुख्य आणि एकत्रित केंद्र मानले जाते. यापूर्वी नवी देहलीत परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेशाचे उच्चायुक्त रियाज हामिदुल्ला यांना पाचारण केले होते. ढाक्यातील भारतीय दूतावासाच्या आजूबाजूला काही कट्टरतावादी घटकांकडून वातावरण बिघडवण्याच्या केलेल्या प्रयत्नांवरून मंत्रालयाने तीव्र चिंता व्यक्त केली.

परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की,

बांगलादेशातील अंतरिम सरकारने त्याच्या राजनैतिक दायित्वांनुसार तेथील भारतीय दूतावास आणि कार्यालये यांची सुरक्षा सुनिश्चित करावी, अशी भारताची अपेक्षा आहे. बांगलादेशातील ढासळलेल्या सुरक्षा परिस्थितीविषयीची तीव्र चिंता उच्चायुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. प्रादेशिक सुरक्षा आणि राजनैतिक संस्था यांच्या सुरक्षिततेविषयी संवेदनशीलता वाढलेल्या काळात हे पाऊल उचलण्यात आले आहे. आपल्या नागरिकांची आणि मिशनची सुरक्षा भारतासाठी सर्वोच्च प्राधान्य आहे, हेही स्पष्ट करण्यात आले.

हसीना यांच्या प्रत्यार्पणाच्या मागणीसाठी निदर्शने

ढाक्यात १७ डिसेंबरला मोठ्या संख्येने निदर्शक भारतीय दूतावासाच्या दिशेने मोर्चा काढत होते; मात्र पोलिसांनी त्यांना मध्येच अडवले. आंदोलक भारतविरोधी घोषणा देत होते आणि माजी पंतप्रधान शेख हसीना, तसेच इतर नेते यांचे प्रत्यार्पण करण्याची मागणी करत होते.

एका निदर्शकाने सांगितले की,

आम्ही भारतीय दूतावासावर आक्रमण करणार नाही; मात्र कुणी बांगलादेशावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, तर त्याला सोडले जाणार नाही. भारत समर्थित राजकीय पक्ष, माध्यमे आणि सरकारी अधिकारी बांगलादेशाच्या विरोधात कट रचत असल्याचा आरोपही निदर्शकांनी केला.

भारतीय उच्चायोगाच्या सुरक्षेत वाढ

ढाका पोलिसांचे उपआयुक्त नूर ए आलम सिद्दीक यांनी सांगितले की, भारतीय दूतावासाच्या परिसराची सुरक्षा वाढवण्यासाठी शहरातील विविध भागांतून अतिरिक्त पोलीस दल मागवण्यात आले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व ढाका विद्यापीठ केंद्रीय विद्यार्थी संघटनेचे समाजकल्याण सचिव ए.बी. जुबैर यांनी केले. पोलिसांनी अडवल्यानंतर आंदोलक रस्त्यावर बसले.

परिस्थिती पुन्हा का चिघळली ?

गेल्या आठवड्यात अज्ञात आक्रमणकर्त्यांनी मागील वर्षीच्या आंदोलनातील प्रमुख नेता शरीफ उस्मान हादी यांच्यावर गोळीबार केल्यानंतर परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली. ते गंभीर घायाळ झाले आहेत. तसेच बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाच्या एका उमेदवाराने सुरक्षेच्या कारणास्तव निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. मागील आंदोलनातील प्रमुख नेते महफुज आलम यांनी चेतावणी दिली आहे की, आंदोलनाचे नेते सुरक्षित नसतील, तर त्यांचे विरोधकही सुरक्षित रहाणार नाहीत.

संपादकीय भूमिका

भारतीय दूतावासावर आक्रमणाचा प्रयत्न म्हणजे भारतावर आक्रमणाचा प्रयत्न असून भारताने ‘जशास तसे’ प्रत्युत्तर दिले पाहिजे. जर भारत आताही निष्क्रीय राहिला, तर ही स्थिती दिवसेंदिवस अधिक कठीण होणार, हे स्पष्ट आहे !