Murshidabad Babri Masjid : मुर्शिदाबाद (बंगाल) येथे बाबरी मशिदीच्या पायाभरणीचे लावण्यात आले फलक

श्रीराममंदिराच्या ध्वजारोहणाच्या दिवशी लावले फलक

तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायू कबीर (डावीकडे) व त्यांनी लावलेला फलक (उजवीकडे)

मुर्शिदाबाद (बंगाल) – येथील बेलडांगामध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायू कबीर यांनी ६ डिसेंबर २०२५ या दिवशी बाबरी मशिदिची पायाभरणी करण्याची घोषणा केली होती. आता त्यांनी या संदर्भातील फलक सर्वत्र लावले आहेत. हे फलक २५ नोव्हेंबरला; म्हणजेच अयोध्येतील श्रीराममंदिरावर ध्वजारोहण केले जात असतांना लावण्यात आले.

१. कबीर यांनी पुन्हा एकदा सांगितले की, आम्ही ६ डिसेंबरला बाबरी मशिदीची पायाभरणी करू. ३ वर्षांत त्याचे बांधकाम पूर्ण होईल. पायाभरणीच्या कार्यक्रमात अनेक मुसलमान नेते सहभागी होतील.

२. ६ डिसेंबर १९९२ याच दिवशी श्रीरामजन्मभूमीवरील बाबरीचा ढाचा पाडण्यात आला होता. त्या निमित्तानेच पायाभरणीचा दिवस ठरवण्यात आल्याचे कबीर यांनी सांगितले.

मशिदीची नाही, तर बांगलादेशाची पायाभरणी होत आहे ! – गिरिराज सिंह, केंद्रीय मंत्री

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह

भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी आरोप केला की, तृणमूल काँग्रेस बंगालमध्ये मशिदीची नाही, तर बांगलादेशाची पायाभरणी करत आहे. ममता बॅनर्जी सरकार बांगलादेशी आणि रोहिंग्या यांच्या समर्थनावर अवलंबून आहे. ज्या प्रकारे तृणमूल हिंदूंच्या मृतदेहांवर राजकारण करत आहे, ते अधिक काळ टिकणार नाही.

आगरा येथे हिंदु महासभेने कबीर यांची प्रतीकात्मक कबर खोदली !

उत्तरप्रदेशातील आगरा येथे हिंदु महासभेने कठोर भूमिका घेत ताजमहालाच्या मागील बाजूस यमुना नदीच्या काठावर एक खड्डा खोदून त्यास प्रतीकात्मक कबरीचे स्वरूप दिले आणि आमदार हुमायू कबीर यांना चेतावणी दिली. कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, ‘बाबरी मशीद पुन्हा उभी करण्याची भाषा करणार्‍यांचा कसा शेवट होईल ?’, याची  चेतावणीचे प्रतीक म्हणून हा खड्डा खोदला आहे.

कबीर यांना जिवंत किंवा मृत आणणार्‍याला सोन्याचे कडे देणार !

हिंदु महासभेच्या आगरा जिल्हाध्यक्ष मीरा राठौर यांनी सांगितले, ‘हुमायू कबीर यांना जिवंत किंवा मृत अवस्थेत आगर्‍यात आणणार्‍याला मी सोन्याचे कडे देणार. बाबरीचे स्वप्ने पहाणार्‍यांसाठी ही कबरच पुरेसे उत्तर आहे.’

  • बाबरी मशीद बांधण्यात येणार्‍या भूमीच्या मालकांचा कबीर यांना विरोध

  • भूमी कबीर यांच्या मालकीची नसल्याचे आले समोर !

हुमायू कबीर ज्या भूमीवर मशिदीची पायाभरणी करून तिची उभारणी करणार आहेत, ती भूमी त्यांची नसल्याचे या भूमीच्या मालकांनी म्हटले आहे. त्यांनी येथे बांधकामाला विरोध केला आहे. ‘झी न्यूज’ या हिंदी वृत्तवाहिनीच्या वृत्तात म्हटले आहे की, येथे रुग्णालय आणि मशीद बांधण्याच्या केल्या जात असलेल्या दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. भूमी मालकाने सांगितले की, ज्याने मशिदीविषयी मोठे दावे केले आहे, त्याच्या नावावर एक इंच भूमीसुद्धा नाही.

या मालकाने भूमीच्या तुटलेल्या कुंपणाच्या भिंतीची डागडुजी चालू केली आहे. तो पुढे म्हणाला की, आम्ही भूमी विकलेली नाही, एक रुपयासुद्धा घेतलेला नाही. भूमी आमचीच आहे; म्हणून आम्ही तिला संरक्षित करत आहोत.

कबीर यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार

भूमी मालकाने आमदार हुमायू कबीर यांच्या मशीद बांधण्याच्या वक्तव्यावर पोलिसात लेखी तक्रार दिली आहे. कबीर यांनी बाबरी मशिदीसमवेत हॉटेल आणि शाळा उभारण्याचेही दावे केले होते. गावातील एका मालकाने स्पष्ट सांगितले की, आधी भूमी कुठली आहे, हे दाखवा ? ही भूमी आमची आहे. मशीद कुठे बांधणार?

संपादकीय भूमिका

असे कितीही फलक लावले, तरी बाबरीच्या नावाने कोणतीही वास्तू कधी पुन्हा देशात उभारली जाऊ शकणार नाही, हे धर्मांधांनी लक्षात ठेवावे !