Ram Mandir Dhwajarohan : ५०० वर्षांपूर्वीच्या यज्ञाची पूर्णाहुती ! – पंतप्रधान मोदी  

अयोध्येत श्रीराममंदिरावर ध्वजारोहण !

पंतप्रधान मोदी

अयोध्या (उत्तरप्रदेश) – आज अयोध्यानगरी भारतीय सांस्कृतिक क्षेत्रातील एका उच्च बिंदूची साक्षीदार बनली आहे. संपूर्ण भारत आणि संपूर्ण विश्व राममय आहे. अद्वितीय समाधान, असीम कृतज्ञता आणि अपार अलौकिक आनंद आहे. शतकांपासूनच्या जखमा भरून येत आहेत.

शतकांच्या वेदना आज शांत झाल्या आहेत. शतकानुशतके केलेला संकल्प आज सिद्धीस जात आहेत. ५०० वर्षांपूर्वीच्या यज्ञाची आज पूर्णाहुती होत आहे.

आज भगवान श्रीरामाच्या गर्भगृहात अनंत ऊर्जा, दिव्य-भव्य मंदिरात रामदरबार प्रतिष्ठापित झाला आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. ते श्रीराममंदिरावरील धर्मध्वजाच्या ध्वजारोहण सोहळ्यात बोलत होते.

या वेळी व्यासपिठावर श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे अध्यक्ष नृत्यगोपालदास महाराज, कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरि, राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी यांनी मांडलेली सूत्रे

१ सहस्र वर्षांसाठी भारताचा पाया पक्का करायचा आहे !

श्रीराममंदिरामध्ये श्रीरामलल्लाची प्रतिष्ठापना करण्यात आली, तेव्हा मी ‘श्रीराममंदिर ते रामराज्य’ या विषयावर चर्चा केली. आपल्याला येत्या १ सहस्र वर्षांसाठी भारताचा पाया पक्का करायचा आहे. वर्तमानाच्या समवेतच भावी पिढ्यांविषयी विचार करायचा आहे. आपण नव्हतो, तेव्हाही हा देश होता, पुढेही रहाणार आहे. आपण एक जिवंत समाज आहोत. त्यामुळे आपल्याला दूरदृष्टीने काम करायचे आहे. आपल्याला प्रभु श्रीरामाकडून शिकायचे आहे. त्यांचे व्यवहार आत्मसात करायचे आहेत.

धर्मध्वज युगायुगांपर्यंत प्रभु श्रीरामाची शिकवण मानवजातीपर्यंत पोचवेल !

ही धर्मध्वजा केवळ ध्वज नाही, तर भारतीय सभ्यतेच्या पुनर्स्थापनेचे प्रतीक आहे. हा ध्वज वर्षांनुवर्षे पाहिले गेलेल्या स्वप्नांचे साकार स्वरूप आहे. येणारी अनेक शतके हा धर्मध्वज प्रभु श्रीरामांच्या आदर्शांचा उद्घोष करेल. ‘सत्यमेव जयते’, हा उद्घोष हा धर्मध्वज करेल. ‘प्राण जाए पर वचन न जाए’, यासाठी हा ध्वज प्रेरणा देईल. विश्वास, कर्म आणि कर्तव्य याला प्राधान्य द्यायला शिकवेल. भेद-भावापासून मुक्ती आणि समाजात शांती प्रस्थापित करेल. आपण असा समाज बनवू जिथे गरिबी नसेल, लाचारी नसेल. हा धर्मध्वज युगायुगांपर्यंत प्रभु श्रीरामाची शिकवण मानवजातीपर्यंत पोचवेल, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

श्रीराममंदिराच्या उभारणीसाठी योगदान देणारे भक्त, कारागिर, योजनाकार, वास्तूकार सर्वांना प्रणाम करतो, अशा भावना पंतप्रधानांनी व्यक्त केल्या.

जेव्हा आपण परंपरांपासून वेगळे होतो, तेव्हा वैभव इतिहासाच्या पानात दबून जाते !

सनातन धर्माच्या परंपरा जपण्याचे आवाहन करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जेव्हा आपण आपल्या मुळापासून, परंपरांपासून वेगळे होतो, तेव्हा आपले वैभव इतिहासाच्या पानात दबून जाते. रामायणकाळात भरत त्याच्या सेनेसह चित्रकुट येथे पोचला, तेव्हा लक्ष्मणाने लांबूनच अयोध्येच्या सेनेला ओळखले. याचे वर्णन वाल्मीकिंनी केले आहे. त्या सेनेच्या ध्वजावर कांचन वृक्षाचे चिन्ह होते. तेच कांचन वृक्षाचे शुभचिन्ह पुन्हा श्रीराममंदिरावरील ध्वजावर प्रतिष्ठापित झाले आहे. हे केवळ चिन्हाचे पुनरागमन नाही, तर आपल्या परंपरांचे पुनरुज्जीवन आहे. देशाला पुढे घेऊन जायचे असेल, तर आपल्या परंपरांचा अभिमान बाळगला पाहिजे. गुलामीगरीच्या मानसिकतेतून मुक्त झाले पाहिजे.

मेकॉलेची शिक्षणव्यवस्था उद्ध्वस्त करणार !

वर्ष १८३५ मध्ये मेकॉले नावाच्या इंग्रजाने भारताला परंपरांपासून उखडण्याचा पाया भरला. वर्ष २०३५ मध्ये या अपवित्र घटनेला २०० वर्षे पूर्ण होतील. दुर्दैवाने मेकॉलेचा उद्देश व्यापक प्रमाणात यशस्वी झाला. ‘आपल्या वस्तूंमध्ये खोट आहे, परदेशी सगळे चांगले आहे’, ही मानसिकता रुजली. मागच्या आठवड्यात मी एका कार्यक्रमात ‘भारताला येत्या १० वर्षांत गुलामीच्या मानसिकतेतून मुक्त करणार’, असे म्हटले होते. ‘येत्या १० वर्षांत आपल्या देशाला गुलामगिरीच्या मानसिकतेत ढकलणारी मेकॉलेप्रणित शिक्षणव्यवस्था उद्ध्वस्त करायची आहे. वर्ष २०३५ मध्ये गुलामगिरीची मानसिकता सोडून दिली, तर वर्ष २०४७ मध्ये विकसित भारत निर्माण होईल. मेकॉलेच्या योजनेला पूर्णपणे उद्ध्वस्त केल्यानंतरच विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होईल, असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

(डावीकडून) प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

भारत लोकशाहीची जननी !

“आपण विदेशातून लोकशाही स्वीकारली’, असे आपल्याला सांगितले गेले. प्रत्यक्षात भारत लोकशाहीची जननी आहे. लोकशाही आपल्या ‘डीएन्ए’मध्ये (डीऑक्सीरिबो न्यूक्लिक ॲसिड म्हणजे व्यक्तीची मूळ ओळख पटवणारे शरिरातील घटक) आहे. तमिळनाडूमध्ये सहस्रो वर्षांपूर्वीचा शिलालेख आहे. त्यावर ‘जनता कसे सरकार निवडते ?’, याचा उल्लेख आहे. भगवान बसवण्णांच्या अनुभवमंडपाची माहिती लपवली गेली. त्यात ‘सार्वजनिक सहमतीने निर्णय घेतले जात असत’, याची माहिती आहे. आपण आपल्या मूळाकडे, म्हणजेच प्राचीन परंपरांकडे गेले पाहिजे.

भारत स्वतःची शक्ती स्वतःच्या पद्धतीने परिभाषित करेल !

आपल्या व्यवस्थेच्या प्रत्येक कोपर्‍यात गुलामीच्या मानसिकतेने ठाण मांडले आहे. आम्ही नौदलाच्या ध्वजावरून गुलामगिरीचे प्रतीक हटवले. हा केवळ नक्षीमध्ये पालट नव्हता, तर मानसिकता पालटण्याचा प्रारंभ आहे. भारत स्वतःची शक्ती स्वतःच्या पद्धतीने परिभाषित करेल. गुलामगिरीच्या मानसिकतेने अनेक वर्षांपासून श्रीरामत्वाला नाकारले आहे. गुलामीची मानसिकता इतकी बळावली की, प्रभु श्रीरामालाही काल्पनिक ठरवले गेले, हेच आता पालटायला हवे. मेकॉलेप्रणीत शिक्षणव्यवस्थेमुळे देशात निर्माण झालेली गुलामगिरीची मानसिकता झटका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

अनेकांचे आत्मे तृप्त झाले असतील ! – प.पू. सरसंघचालक

हा दिवस सर्वांसाठी अर्थपूर्ण आहे. अनेकांनी प्रयत्न केले, आयुष्य वाहिले. आज त्यांचे आत्मे तृप्त झाले असतील. अशोक सिंघल (विश्व हिंदु परिषदेचे दिवंगत अध्यक्ष) यांनाही आज शांती लाभली असेल. महंत रामचंद्र दास महाराज, डालमिया आणि अनेकांनी अथक परिश्रम करून प्राणर्पणही केले, अशी कृतज्ञता प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी त्यांच्या मार्गदर्शनात व्यक्त केली.

मंदिर उभारण्याची शास्त्रीय प्रक्रिया पूर्ण !

ते पुढे म्हणाले की,

ध्वजारोहणानंतर मंदिर उभारण्याची शास्त्रीय परंपरा विधिवत पूर्ण झाली आहे. रामराज्याचा ध्वज जो कधीकाळी अयोध्येत फडकत होता आणि जगभर शांततेचा संदेश देत होता, तोच ध्वज आज पुन्हा शिखरावर प्रतिष्ठित होतांना आपण पाहिला. राममंदिराची प्रक्रिया आज पूर्णत्वास पोचली. ही परंपरा, हे ज्ञान आणि ही संरक्षणात्मक छाया जगभर पोचवण्याचे कार्य भारताने आज नव्याने चालू केले आहे. आज आपल्या संकल्पाचा पुनरुच्चार करण्याचा दिवस आहे. आपण पाहिलेले स्वप्न आणि पूर्वजांची आकांक्षा याहूनही अधिक भव्य रूपात साकार झाली आहे.

भगवा ध्वज धर्माचे प्रतीक  ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

श्रीराममंदिरावरील धर्मध्वजारोहण सोहळा, ही एका मोठ्या यज्ञाची पूर्णाहुती आहे. विवाहपंचमीचा शुभमुहूर्त या सोहळ्याला पावन बनवत आहे. अनेक पिढ्यांची प्रतीक्षा या भव्य श्रीराममंदिराच्या रूपाने साकार झाली आहे. श्रीराममंदिरावरील भगवा ध्वज हे धर्माचे प्रतीक आहे. हे विकसित भारताच्या संकल्पनेचेही प्रतीक आहे. संकल्पाला कोणताही विकल्प (पर्याय) नाही. गेल्या ११ वर्षांत पालटणारा भारत सर्वांनी पाहिला आहे. विकास आणि वारसा यांचा समुच्चय सर्वांनी पाहिला आहे, अशी भावना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या वेळी व्यक्त केली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, गेल्या ५०० वर्षांत साम्राज्ये, पिढ्या पालटल्या; परंतु श्रद्धा अढळ राहिली. रा.स्व. संघासारख्या संघटनेच्या हाती कमान आली आणि ‘रामलल्ला हम आयेंगे, लाठी गोली खाएंगे, मंदिर वही बनाएंगे’, हे नारे घुमू लागले. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली रामराज्याच्या पुनर्स्थापनेची दिव्य अनुभूती आज जग घेत आहे. श्रद्धेच्या नव्या युगात आपण प्रवेश करत आहोत. प्रत्येक धर्मावलंबिसाठी हा आत्मगौरवाचा दिवस आहे. धर्मपथ, रामपथ, भक्तीपथ, ८४ कोस परिक्रमा भक्तांच्या श्रद्धेला नवा सन्मान देत आहे. महर्षि वाल्मीकि विमानतळ भक्तांनी आंतरराष्ट्रीय सुविधा देत आहेत. स्मार्ट सिटीच्या रूपात अयोध्या समोर येत आहे.

धर्मध्वज आणि त्यावरील चिन्हे !

धर्मध्वज

भगव्या रंगाच्या या धर्मध्वजावर कोविदार वृक्ष, सूर्य आणि ॐ चित्रित करण्यात आले आहेत. भगवान श्रीराम यांच्या वंशासाठी ‘कोविदार वृक्ष’ याला काही जण कांचन, रक्त कांचन, देवकांचन, वनराज, रक्तपुष्प असेही म्हणतात, हा वृक्ष प्रतीक म्हणून या ध्वजावर आहे. या वृक्षाला जांभळी फुले येतात. तसेच श्रीराम सूर्यवंशी असल्याने सूर्यनारायणाचे चिन्ह या ध्वजावर रेखाटण्यात आले आहे.

असा आहे प्रभु श्रीरामाची शिकवण युगायुगांपर्यंत मानवजातीपर्यंत पोचविणारा धर्मध्वज !

हा धर्मध्वज कित्येक किलोमीटर दुरूनच दृष्टीपथास पडतो. हा ध्वज २२ फूट लांब आणि ११ फूट रूंद असेल. या ध्वजाचे वजन हे २ ते ३ किलोग्रॅम असेल. १६१ फूट उंच मंदिर शिखर आणि त्यावरील ४२ फूट उंच ध्वजदंडानुसार हा ध्वज सिद्ध करण्यात आला आहे. यासाठी ३६० कोनातून फिरणारा बॉल-बिअरिंगचा वापर होईल.

हा ध्वज हाताने शिवण्यासाठी २५ दिवस लागले. हा ध्वज ‘एव्हिएशन ग्रेड पॅराशूट नायलॉन’ आणि रेशम यांपासून सिद्ध करण्यात आला आहे. पॅराशूट ग्रेड नायलॉनमध्ये सिल्क सॅटिनच्या धाग्याचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे वेगवान वारे, मुसळधार पाऊस आणि हवामानातील पालट, यांचा त्यावर लगेचच परिणाम होणार नाही.

कोविदार वृक्षाचे महत्त्व !

कोविदार वृक्षाविषयी असे मानले जाते की, मंदार आणि पारिजात यांच्या संकरातून हा वृक्ष उत्पन्न झाला. हा वृक्ष ऋषि कश्यप यांनी निर्माण केल्याचेही वर्णन आढळते. त्याच्या गुणधर्मांकडे पाहिल्यास तो आयुर्वेदात अत्यंत उपयुक्त मानला जातो. या वृक्षाची फुले, पाने आणि साल अनेक आजारांवर औषधी म्हणून वापरली जातात. असेही मानले जाते की, हा वृक्ष देवतांना प्रिय असून त्याच्या परिसरात सतत सकारात्मक ऊर्जा टिकून रहाते. याला कांचनार, कचनार किंवा कचनाल अशीही नावे आहेत. उत्तर भारतात, विशेषतः हिमालयाच्या दक्षिण भागात हा वृक्ष मोठ्या प्रमाणावर आढळतो. कालिदासांच्या ‘रघुवंश’ आणि ‘मेघदूत’ या काव्यांमध्येही त्याचा उल्लेख आहे. प्राचीन भारतीय वैद्यकग्रंथांमध्ये देखील कोविदारचे विस्तृत वर्णन आढळते.