अयोध्या प्रकरणातील निकाल सर्वांना स्वीकारार्ह होता, त्यामुळे देशात शांतता राखली गेली ! – Former Justice Nageswara Rao

माजी न्यायमूर्ती नागेश्वर राव

चेन्नई (तमिळनाडू) – अयोध्या प्रकरणावरील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल घोषित झाल्यानंतर देशात कुठलीही अस्थिरता निर्माण झाली नाही; कारण तो सर्वांना स्वीकारार्ह होता, असे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एल्. नागेश्वर राव यांनी येथे  सांगितले. चेन्नई येथे आयोजित ‘केस फॉर राम : द अनटोल्ड स्टोरी ऑफ अयोध्या रामजन्मभूमी बाबरी मशीद डिस्प्युट’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. हे पुस्तक अनिरुद्ध शर्मा आणि श्रीधर पोतराजू यांनी लिहिले आहे.

अधिवक्ता अनिरुद्ध शर्मा आणि अधिवक्ता श्रीधर पोतराजू  – (चित्रावर क्लिक करा)

न्यायमूर्ती राव म्हणाले की, हा भारतातील सर्वांत महत्त्वाचा खटला होता. संपूर्ण देश श्वास रोखून निकालाची वाट पहात होता. लोकांना निकालात काय होईल ? याची नव्हे, तर निकालानंतर काय घडेल ? याची अधिक चिंता होती; परंतु निकालानंतर कुठेही हिंसा झाली नाही. सर्वांनी तो निर्णय स्वीकारला. ही भारतीय समाजाची परिपक्वता दर्शवते, असे न्यायमूर्ती म्हणाले.

अधिवक्ता के. परासरन्

न्यायमूर्ती राव यांनी या वेळी बोलतांना वरिष्ठ अधिवक्ता के. परासरन् यांचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले, ‘‘अधिवक्ता परासरन् म्हणतात की, त्यांनी हा खटला प्रभु श्रीरामासाठी लढला. परासरन् यांनी कधीही विरोधकांविरुद्ध द्वेषभाव दाखवला नाही. त्यांनी विरोधी बाजूच्या अधिवक्त्यांनाही तितकाच सन्मान दिला. न्यायालयाबाहेर वैरभाव न ठेवणे, ही सनातन धर्माची सुंदर परंपरा आहे.’’ ‘न्यायाधीश आणि अधिवक्ता यांनी न्यायालयाबाहेर खटल्यांवर बोलणे टाळावे. परासरन् यांनी कधीच माध्यमांना मुलाखत दिली नाही. अधिवक्त्यांनी न्यायालयात बोलावे आणि न्यायाधिशांनी केवळ त्यांच्या निर्णयांद्वारे बोलावे, असेही ते म्हणाले.