Salman Khurshid On Article 370 : कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये समृद्धता आली ! – सलमान खुर्शीद, माजी परराष्ट्रमंत्री

काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद

नवी देहली – काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये भारत सरकारने जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘‘कलम ३७० ही काश्मीरमध्ये एक मोठी समस्या होती. यामुळे ‘काश्मीर देशाच्या इतर भागांपेक्षा वेगळे आहे’, असा आभास निर्माण झाला होता. वर्ष २०१९ मध्ये कलम ३७० हटवल्यानंतर ही धारणा संपली. त्यानंतर निवडणुका झाल्या आणि ६५ टक्के लोकांनी मतदान केले. आता काश्मीरमध्ये निवडून आलेले सरकार आहे. काही लोक काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करू इच्छितात, हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांना काश्मीरमध्ये समृद्धी पहायची नाही.’’ इंडोनेशियामधील विचारवंतांसमोर बोलतांना खुर्शीद यांनी हे वक्तव्य केले.

ऑपरेशन सिंदूरनंतर अख्ख्या जगाला भारताची बाजू समजावी आणि पाकिस्तानचा आतंकवादी चेहरा जगासमोर यावा, यासाठी जगातील विविध देशांमध्ये भारताची सर्वपक्षीय शिष्टमंडळे जाऊन तेथे भारताची बाजू मांडत आहेत. माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांच्यासह जनता दल (संयुक्त) चे संजयकुमार झा हे मलेशिया, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, जपान आणि सिंगापूर या देशांना भेटी देत आहेत.