केवळ अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश नव्हे, तर संपूर्ण जगातील पीडित हिंदूंना भारतात आश्रय मिळावा !

प्रयागराजच्या महाकुंभमेळा क्षेत्रातून हिंदु संघटनांची केंद्र सरकारकडे मागणी !

डावीकडून हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, श्री. हिंदू मक्कल कत्छी’ (हिंदु जनता पक्ष)चे अध्यक्ष अर्जुन संपत, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. चेतन राजहंस

प्रयागराज – आज केवळ अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश येथील नव्हे, तर श्रीलंका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, इंडोनेशिया, अमेरिका, इंग्लंड यांसारख्या अनेक देशांमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत. त्यांच्यावर भेदभाव, बळजोरीने धर्मांतर, सामाजिक आणि आर्थिक त्रास दिला जात आहे, तसेच त्यांच्या मंदिरांवर आणि उत्सवांवर आक्रमणे होत आहेत. अशा परिस्थितीत संपूर्ण जगभरातील हिंदू केवळ भारताकडे आशेने पहात आहेत. जसे की, जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात असलेल्या ज्यू लोकांवर संकट आले, तर त्यांचे संरक्षण करण्यासाठी इस्रायल तत्पर असतो, त्याचप्रमाणे भारतानेही संपूर्ण जगभरातील हिंदूंसाठी संरक्षण देणारा आणि त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा रहाणारा देश असायला हवे. नागरिकत्व सुधारणा कायद्याचा (‘सीएए’चा) विस्तार करून संपूर्ण जगातील पीडित हिंदूंना संरक्षण देण्याचे कार्य भारत सरकारने करावे, तसेच वर्ष २०१९ मध्ये लागू केलेला ‘सीएए’ सर्व राज्यांमध्ये त्वरित लागू करण्यात यावा, अशी महत्त्वाची मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केली. प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वरील मागणी केली. या वेळी तमिळनाडूतील ‘हिंदू मक्कल कत्छी (हिंदु जनता पक्ष)’चे संस्थापक अध्यक्ष श्री. अर्जुन संपत, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत उपस्थित वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !

श्रीलंकन हिंदू निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी ‘सीएए’मध्ये सुधारणा करा ! – अर्जुन संपत, संस्थापक अध्यक्ष, हिंदू मक्कल कत्छी

श्री. अर्जुन संपत

श्रीलंकेत हिंदूंवर अद्यापही अमानुष अत्याचार होत आहेत. त्यांना श्रीलंकेत दुय्यम दर्जाचे नागरिक म्हणून वागवले जाते. हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त केली जात आहेत आणि हिंदू मुलींचे बळजोरीने मुसलमानांशी विवाह लावले जात आहेत. त्यामुळे श्रीलंकेत हिंदू लोकसंख्या घटत आहे. अशा स्थितीत भारत सरकारने श्रीलंकन हिंदूंच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. त्याचप्रमाणे अमानुष अत्याचारामुळे भारतात आलेल्या श्रीलंकन हिंदू निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी ‘सीएए’मध्ये सुधारणा करावी.

काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी जम्मू-काश्मीरमध्ये पनून कश्मीर ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

श्री. चेतन राजहंस

काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनानंतरही ते स्वतःच्या देशात निर्वासित म्हणून रहात आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे. ‘कलम ३७० आणि ३५ ए’ हटवणे, हा महत्त्वाचा निर्णय होता; परंतु आजवर भारत सरकारने विस्थापित काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी कोणतीही योजना घोषित न करणे आश्‍चर्यकारक आहे. आमची मागणी आहे की, निर्वासित काश्मिरी हिंदूंसाठी जम्मू-काश्मीरमध्ये ‘पनून कश्मीर’ (आपले काश्मीर) नावाचा स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश बनवण्यात यावा. काश्मिरी हिंदूंच्या सुरक्षेचे आणि पुनर्वसनाचे पूर्ण दायित्व केंद्र सरकारने तात्काळ घ्यावे.

सद्गुरु नीलेश सिंगबाळ

सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती : हिंदु जनजागृती समितीने या महाकुंभ क्षेत्रातील सेक्टर ६ मध्ये बांगलादेश आणि काश्मीरमधील हिंदूंवरील अमानवीय अत्याचारांविषयी जनजागृतीसाठी चित्रप्रदर्शन आयोजित केले आहे. समाजामध्ये हिंदूंवरील अत्याचारांविषयी जागरूकता निर्माण करणे, हे या प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

पत्रकारांनी समजून घेतले हिंदूंवरील आघात आणि हिंदु राष्ट्राची संकल्पना !

हिंदु जनजागृती समितीच्या प्रदर्शनाची पत्रकारांना माहिती देतांना विश्‍वनाथ कुलकर्णी

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – हिंदु जनजागृती समितीची पत्रकार परिषद झाल्यानंतर भारतासह विविध देशांमध्ये होत असलेल्या हिंदूंवरील अत्याचारांची माहिती देणारे, तसेच हिंदु राष्ट्राची संकल्पना स्पष्ट करणारे हिंदु जनजागृती समितीचे प्रदर्शन पत्रकारांनी पाहिले. समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी यांनी पत्रकारांना प्रदर्शन दाखवून त्याविषयीची सविस्तर माहिती दिली. या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेला वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्या यांचे २५ पत्रकार उपस्थित होते.