‘एका ज्योतिषाने पितृदोषाचे निवारण होण्यासाठी मला ‘नारायणबळी विधी’ करण्यास सांगितला होता. हा विधी १.५.२०२४ या दिवशी हरवळे (गोवा) येथे करण्यात आला. या विधीचे देवाच्या कृपेमुळे मला सूक्ष्म परीक्षण करता आले. ते पुढे दिले आहे.
१. या विधीत मी भाताच्या पिंडावर स्वतःच्या उजव्या अंगठ्याने पितरांना पाणी देण्याची कृती केली. तेव्हा मला जाणवले, ‘ज्याप्रमाणे तहानेने व्याकुळ झालेल्या व्यक्तीला पाणी मिळाल्यास ती तृप्त होते, त्याप्रमाणे पितरांना पाण्याद्वारे आध्यात्मिक ऊर्जा मिळून ते तृप्त होत आहेत.’
२. हा विधी पूर्वजांना गती मिळण्यासाठी केला जातो. हा विधी चालू असतांना मला जाणवले, ‘बसस्थानकावर बसगाड्या येण्यापूर्वी शांतता असते. गाडी आली की, काही प्रवासी लगबगीने बसमध्ये चढतात. काही प्रवासी त्या गाडीत न बसता योग्य त्या गाडीची वाट पहातात, तर काही प्रवासी तटस्थ उभे असतात, त्याप्रमाणे विधी चालू असतांना सूक्ष्म लोकात पितरांची स्थिती होती. विधी चालू झाल्यावर ज्या पितरांना पुढील गती हवी आहे, ते उत्कंठतेने वाट पहात विधीतील आध्यात्मिक ऊर्जा ग्रहण करत होते. काही पितरांच्या आणखी काही इच्छा शेष होत्या आणि त्यांना पुढील गती नको होती. असे पितर विधीद्वारे केवळ आध्यात्मिक ऊर्जा ग्रहण करत होते आणि काही पूर्वज या विधीकडे तटस्थ राहून पहात होते.’
३. विधीच्या शेवटी मला सूक्ष्मातून पुढील दृश्य दिसले, ‘माझ्या एकूण पितरांपैकी ६ पितरांना नारायणबळी विधीतून पुष्कळ आध्यात्मिक ऊर्जा मिळाली आणि त्यांना पुढील गती प्राप्त झाली. ज्याप्रमाणे रॉकेट आकाशाच्या दिशेने झेपावण्यापूर्वी कंप पावते आणि त्यानंतर ते वेगाने वरच्या दिशेने प्रवास करते, त्याप्रमाणे विधीतून पितरांना पुष्कळ आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त झाल्याने त्यांच्या शक्तीत वाढ झाली अन् त्यानंतर ते वेगाने पुढील प्रवासासाठी निघून गेले. काही पूर्वज काही ना काही कारणास्तव अडकलेले दिसले. या विधीतून त्यांना पुढील गती न मिळता केवळ आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त झाली.’
४. विधीतून माझ्यावर पुष्कळ आध्यात्मिक स्तरावरील उपाय झाले. त्यानंतर माझ्या शरिराला हलकेपणा जाणवू लागला.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.६.२०२४)
|