वसई गावात इलेक्ट्रिकच्या पट्ट्यावरून श्री गणेशमूर्ती पाण्यात सोडण्याची यंत्रणा

गणेशभक्तांचा संताप !

वसई – गावात श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी आधुनिक पट्ट्याच्या यंत्रणेचा वापर करण्यात आला आहे. इलेक्ट्रिकवर चालणार्‍या या पट्ट्यावर श्री गणेशमूर्ती ठेवल्या जातात. पट्ट्यासमवेत त्या पुढे जातात आणि पाण्यात कलंडतात. या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी केल्याने गणेशभक्त संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. यामुळे देवतेचा आणि संस्कृतीचा अवमान होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ‘ही मूर्तीविसर्जनाची पद्धत चुकीची असून ती त्वरित बंद करा’ अशा प्रतिक्रिया गणेशभक्तांनी दिल्या आहेत.

यापूर्वी कोल्हापूर येथे अशा प्रकारची यंत्रणा बसवण्यात आली होती. त्याला हिंदुत्वनिष्ठांनी विरोध केला होता.

संपादकीय भूमिका 

  • धर्मशास्त्राप्रमाणे पाण्यात ३ वेळा श्री गणेशमूर्ती बुडवून नंतर तिचे विसर्जन करायचे असते. पट्ट्यावरून मूर्ती पाण्यात ढकलणे हा मनोभावे पूजन केलेल्या श्री गणेशमूर्तीचा अवमानच नव्हे का ?
  • श्री गणेशमूर्ती ही पाण्यात सोडायची किंवा टाकायची नसते, तर जो विधी आहे आणि त्याला ‘विसर्जन’ म्हणतात. पूजन केलेल्या पवित्र मूर्तीतील पवित्रके त्यामुळे पाण्यात मिसळून सर्वांना लाभ होत असतो. अशा प्रकारे आधुनिकीकरणाच्या नावे श्री गणेशमूर्ती पाण्यात सोडणे, ही त्या पवित्र विधीची विटंबनाच होय !