बांगलादेशातील मंदिरांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत ! – महाआरतीद्वारे हिंदु संघटना-हिंदूंची मागणी 

कोल्हापूर – बांगलादेशातील आरक्षणाच्या सूत्रावरून प्रारंभ झालेल्या हिंसाचाराने  टोक गाठले आहे. या हिंसाचाराचे रूपांतर आता अराजकतेत झाले असून सरकारविरोधी आंदोलन, हे आता हिंदूंच्या विरोधात प्रारंभ झाले आहे. सध्या तेथे चालू असलेल्या अराजकात इस्कॉनच्या मंदिरासह अन्य ४ हून अधिक मंदिरांना धर्मांधांनी आग लावली. तेथील भक्त कसेबसे जीव मुठीत धरून पळून गेले. वर्ष १९९० मध्येही अशाच प्रकारे तेथील अनेक मंदिरांना आग लावण्यात आली होती. वर्ष २०१६ मध्ये तेथील ४९ मंदिरे नष्ट झाली. आता या अराजकानंतरही तेथील हिंदूंची घरे आणि दुकाने यांची तोडफोड, लूट, आगी लावणे असे चालू झाले आहे. बांगलादेशामध्ये हिंदूंच्या (शत्रूच्या) भूमी बळकावणारा एक अत्याचारी कायदा बांगलादेश स्वतंत्र होण्यापूर्वीपासून आहे. त्या अंतर्गत वर्ष २००६ पर्यंत हिंदूंची २६ लाख एकरांहून अधिक भूमी मुसलमानांनी बळकावलेली आहे. तरी या अराजक परिस्थितीत बांगलादेशातील हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणे, मूर्तींची तोडफोड थांबवण्यासाठी तेथील सैन्य दलाला कठोर सूचना द्याव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने बिनखांबी गणेशमंदिर येथ ४ सप्टेंबरला सायंकाळी ५.३० वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.

बांगलादेशात जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष्य करून त्यांच्या उघडपणे हत्या करणे, हिंदूंच्या घरांवर आक्रमणे करणे, हिंदूंची दुकाने लुटणे, हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणे-आग लावणे, हिंदु महिलांवर बलात्कार करणे, हिंदूंना विस्थापित करणे आदी अत्याचार केले जात आहे. तरी तेथील मंदिरांना आणि हिंदूंना तात्काळ सुरक्षा पुरवण्यासाठी भारत सरकारने बांगलादेश सरकारवर दबाव आणावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. प्रास्ताविक महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. प्रसाद कुलकर्णी यांनी केले. या प्रसंगी हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेण्यात आली.

या प्रसंगी आसुर्ले येथील मठाधिपती श्री श्री श्री १००८ महामंडलेश्वर आनंदसिद्ध स्वामी (काडसिद्धेश्वर स्वामी), ह.भ.प. महादेव यादव महाराज, हिंदु धर्म मंडळ संस्थेचे खजीनदार श्री. हसमुखभाई शाह, उजाळाईवाडीदेवी मंदिराचे श्री. अशोक गुरव, सांगवडे येथील नृसिंह मंदिराचे श्री. आप्पासाहेब गुरव, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हा संयोजक श्री. प्रमोद सावंत, सहसंयोजक श्री. अभिजित पाटील, श्री श्री रवीशंकर संप्रदायाचे श्री. आप्पासाहेब लाड, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे आणि करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, आरोग्य भारतीच्या डॉ. अश्विनी माळकर, माधवी गायकवाड, विश्व हिंदु परिषदेच्या मातृशक्ती संघटनेच्या वंदनाताई बंबलवाड, दुर्गावाहिनीच्या अमृता कुलकर्णी, भ्रष्टाचारविरोधी जनजागृती कृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे आणि श्री. शिवानंद स्वामी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सासणे, महिला आघाडीच्या श्रीमती शीला माने, हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ मेथे यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांने प्रतिनिधी, कार्यकर्ते, भाविक उपस्थित होते.

संपादकीय भूमिका

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ?

महाआरतीसाठी उपस्थित ह.भ.प. महादेव यादव महाराज, श्री श्री श्री १००८ महामंडलेश्वर आनंदसिद्ध स्वामी (काडसिद्धेश्वर स्वामी), तसेच अन्य मान्यवर