Jamaat E Islami Chief : (म्हणे) ‘आम्हाला चांगले संबंध हवेत; पण भारताने आमच्या प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करू नये !’ – जमात-ए-इस्लामी पक्षाचे प्रमुख शफीकुर रहमान

जमात-ए-इस्लामी पक्षाचे प्रमुख शफीकुर रहमान यांचे विधान !

जमात-ए-इस्लामी पक्षाचे प्रमुख शफीकुर रहमान

ढाका (बांगलादेश) – जमात-ए-इस्लामी पक्षाला भारत आणि बांगलादेश यांच्यात चांगले संबंध रहावेत, असे वाटते; परंतु भारताने आमच्या प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करू नये, असे विधान या पक्षाचे प्रमुख शफीकुर रहमान यांनी केले आहे. ते एका मुलाखतीत बोलत होते. ‘आमच्या पक्षाचे मत आहे की, बांगलादेशाने अमेरिका, चीन, पाकिस्तान अशा सर्व देशांशी भक्कम संबंध निर्माण करावेत’, असेही ते म्हणाले.

शफीकुर रहमान पुढे म्हणाले की,

१. जमात-ए-इस्लामी भारताच्या विरोधात नाही !

भारत जमात-ए-इस्लामी पक्षाला भारतविरोधी मानतो; परंतु हे चुकीचे आहे, यात पालट झाला पाहिजे. जमात-ए-इस्लामी कोणत्याही देशाच्या विरोधात नाही. आम्ही बांगलादेशाचे समर्थक असून केवळ बांगलादेशाच्या हितांचे रक्षण करू इच्छितो.

२. शेख हसीना यांनी बांगलादेशात परतावे !

जर शेख हसीना त्यागपत्र देऊन भारतात गेल्या नसत्या, तर चांगले झाले असते. शेख हसीना यांनी बांगलादेशात परतून कायद्याचा सामना करावा.

३. (म्हणे) ‘भारताने त्याच्या परराष्ट्र धोरणाची पुन्हा समीक्षा करावी !’

भारत आमचा शेजारी आहे आणि आम्हाला त्याच्याशी चांगले, स्थिर आणि द्विपक्षीय सौहार्दाचे संबंध हवे आहेत; परंतु भारताने भूतकाळात काही अशा गोष्टी केल्या आहेत, ज्या बांगलादेशातील लोकांना आवडलेल्या नाहीत. उदाहरणार्थ वर्ष २०१४ मध्ये बांगलादेशातील निवडणुकांच्या वेळी ढाक्यातील एका वरिष्ठ भारतीय राजनैतिक अधिकार्‍याने ‘कुणी निवडणुकीत भाग घ्यावा आणि कुणी नाही’, असे सांगितले होते. हे अस्वीकार्य आहे. शेजारी देशाने असे करू नये. भारताने त्याच्या परराष्ट्र धोरणाची पुन्हा समीक्षा करावी आणि शेजारी देशांच्या प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करू नये.

४. (म्हणे) ‘भारताने धरणातून पाणी सोडत असल्याची सूचना दिली नाही !’

बांगलादेशात आलेल्या पुराविषयी रहमान म्हणाले की, भारताने आधी धरणातून पाणी सोडत असल्याची सूचना द्यायला हवी होती, जेणेकरून आम्ही चांगले व्यवस्थापन करू शकलो असतो. ज्या ठिकाणी धरण आहे, तिथे धरण आवश्यक नाही. पाण्याला नैसर्गिकरित्या वाहू द्यायला हवे होते.

(म्हणे) ‘बांगलादेशात हिंदूंवर ‘ते हिंदु आहेत’ म्हणून आक्रमणे झालेली नाहीत !

‘आम्ही पाकिस्तानसह सर्व शेजारी देशांशी बांगलादेशाचे चांगले संबंध पाहू इच्छितो. बांगलादेशात हिंदूंवर ‘ते हिंदु आहेत’ म्हणून आक्रमणे झालेली नाहीत’, असेही विधान शफीकुर रहमान यांनी केले. (‘खोटे बोल; पण रेटून बोल’, या वृत्तीचे शफीकुर रहमान ! बांगलादेशमध्ये हिंदूंना प्रतिदिन वेचून ठार मारले जात असतांना रहमान कशाच्या आधारे असे दायित्वशून्य विधान करत आहेत ?)

संपादकीय भूमिका

भारताने बांगलादेशात हस्तक्षेप न केल्यानेच आज बांगलादेशाशी भारताचे संबंध बिघडले आहेत. भारताने हस्तक्षेप करणे आवश्यक होते. त्यामुळे बांगलादेशात आता जी स्थिती आहे, ती झाली नसती, तसेच हिंदूंवर आक्रमणे झाली नसती आणि संबंधही बिघडले नसते !