राष्ट्रवादी लोकांनी अराजक माजवू पहाणार्‍या लोकांवर अंकुश ठेवावा ! – महंत रामगिरी महाराज

समाजात तेढ निर्माण होण्यासारखे बोललो नसल्याचे प्रतिपादन

महंत रामगिरी महाराज

नाशिक – मी समाजात तेढ निर्माण होण्यासारखे काहीही बोललो नाही. माझ्या प्रवचनातील मोजकाच भाग ‘एडिट’ करून दाखवण्यात आला आहे. माझा राज्यघटना आणि न्यायव्यवस्था यांच्यावर विश्वास आहे. हिंदूंनी त्यांच्यावर होणार्‍या अत्याचाराच्या विरोधात संघटित व्हावे. राष्ट्रवादी लोकांनी अराजक माजवू पहाणार्‍या लोकांवर अंकुश ठेवावा. सर्व समाजांनी शांतता राखावी. आंदोलन किंवा दगडफेक करणे योग्य नाही. आम्ही शांतताप्रिय आहोत. अत्याचार सहन करू नये, हा आमचा उद्देश आहे, असे विधान महंत रामगिरी महाराज यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना केले.

सातारा शहरामध्ये पडसाद !

सातारा, १७ ऑगस्ट (वार्ता.) – अहिल्यानगर येथील महंत रामगिरी महाराज यांनी नाशिकच्या सिन्नर तालुक्यात एका कार्यक्रमात महंमद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप होत आहे. याचे तीव्र पडसाद नगर (अहिल्यानगर), छत्रपती संभाजीनगरसह सातारा शहरामध्येही उमटले. शहरातील मुसलमान समाज ही बातमी कळल्यानंतर शहर पोलीस ठाण्यासमोर जमला. या वेळी शहर पोलीस ठाणे परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला. या प्रकरणी कायदेशीर सल्ला घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन सातारा शहर पोलिसांनी दिले.