संपूर्ण ‘वन्दे मातरम्’चे गायन काळाची आवश्यकता ! – राजूमामा भोळे, आमदार, जळगाव

जळगाव, १७ ऑगस्ट (वार्ता.) – आज अनेक कार्यक्रमांमध्ये ‘वन्दे मातरम्’चे केवळ एकच कडवे गायले जाते. तसेच महाराष्ट्र राज्याच्या विधानभवनातही ‘वन्दे मातरम्’ला विरोध केला जातो. ‘वन्दे मातरम्’मध्ये आपल्याला दैनंदिन जीवनासाठी लागणार्‍या जीवनावश्यक वस्तूंविषयी (हवा, अन्न, पाणी) विवेचन आहे. या सर्व गोष्टींचा वापर या लोकांकडून केला जातो, तरी यास विरोध करण्याची काय आवश्यकता ?, असे प्रतिपादन भाजपचे आमदार राजूमामा भोळे यांनी केले. ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या अनुषंगाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील महानगरपालिकेसमोर भारतमाता प्रतिमा पूजन, क्रांतिकारकांच्या चित्रांचे फ्लेक्स प्रदर्शन आणि संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ गायन असा उपक्रम राबवण्यात आला. या वेळी ते बोलत होते.

कार्यक्रमास सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव, उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचे प्राध्यापक तुषार देशपांडे, भाजप नगरसेवक अमित काळे, हिंदुत्वनिष्ठ नरेश सोनवणे, येसाजी चव्हाण, परिस महाराज, प्रा. तुषार रायसिंग, प्रा. विलास कुमावत, प्रा. शरद पाटील, व्यावसायिक जिगर पटेल, अधिवक्ता ललित बडगुजर, हिंदु जनजागृती समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक श्री. प्रशांत जुवेकर, योग वेदांत सेवा समितीचे श्री. अनिल चौधरी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. आकाश फडे यांसह समितीचे कार्यकर्ते, राष्ट्रप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्षणचित्रे

१. क्रांतीकारकांच्या जीवनचरित्रावर आधारित फ्लेक्स प्रदर्शन पाहून अनेक जण प्रभावित झाले.

२. उपस्थितांना सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी संबोधित केले.