बांगलादेशामध्‍ये हिंदूंचा नरसंहार होत आहे ! : Suvendu Adhikari

बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांचा गंभीर आरोप

बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी

कोलकाता (बंगाल) – बांगलादेशामध्‍ये चालू असलेल्‍या हिंसाचाराच्‍या पार्श्‍वभूमीवर बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपचे आमदार असलेले सुवेंदू अधिकारी यांनी विधानसभेत म्‍हटले की, काही दिवसांत १ कोटी हिंदू निर्वासित बंगालमध्‍ये येणार आहेत. (बांगलादेशात सध्‍या १ कोटी ३१ लाखाहून अधिक हिंदू वास्‍तव्‍य करत आहेत.) त्‍यामुळे तुम्‍ही सिद्ध रहावे. बांगलादेशामध्‍ये हिंदूंचा नरसंहार होत आहे. रंगपूर येथे नगरसेवक हरधन नायक यांची हत्‍या करण्‍यात आली. सिराजगंज पोलीस ठाण्‍यात १३ पोलिसांची हत्‍या करण्‍यात आली होती. त्‍यांपैकी ९ हिंदू होते. नोआखलीमध्‍ये हिंदूंची घरे जाळण्‍यात आली. मी बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्‍यपाल यांना या प्रकरणी भारत सरकारशी त्‍वरित बोलण्‍यास सांगेन.

बांगलादेश जमात-ए-इस्‍लामी आणि कट्टरतावादी यांच्‍या हातात जाईल !

सुधारित नागरिकत्‍व कायद्याचा (सीएएचा) संदर्भ देत सुवेंदू अधिकारी म्‍हणाले की, सीएएमध्‍ये हे स्‍पष्‍ट आहे की, धार्मिक छळामुळे एखाद्याला मारहाण झाल्‍यास आपला देश पुढे येऊन या प्रकरणांमध्‍ये लक्ष घालेल. मी तुम्‍हाला सांगतो की, जर ही परिस्‍थिती ३ दिवसांत आटोक्‍यात आली नाही, तर बांगलादेश जमात-ए-इस्‍लामी आणि कट्टरतावादी यांच्‍या हातात जाईल.

संपादकीय भूमिका

बांगलादेशात गेली ५३ वर्षे हिंदूंचा नरसंहार होत असल्‍याने तेथे वर्ष १९४७ मध्‍ये २८ टक्‍के असणारे हिंदू आता केवळ ९ टक्‍केच राहिले आहेत. भारताच्‍या निष्‍क्रीयतेमुळे तेही काही वर्षांत नष्‍ट होतील, अशीच स्‍थिती आहे !