काल २१ जुलै २०२४ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा झाली. त्या निमित्ताने…

अयोध्येत ‘श्रीरामलल्ला’च्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी घरी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राची पूजा करतांना आलेल्या अनुभूती !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. घरात दिवे लावल्यावर मोगर्‍याचा सुगंध येणे आणि एका दिव्यात तेल अल्प असूनही तो ६ घंटे तेवणे

‘२२.१.२०२४ या दिवशी अयोध्येत ‘श्रीरामलल्ला’च्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार होती. त्या वेळी मी दारात सुंदर रांगोळी काढली. पाटावर छानसे वस्त्र अंथरून त्यावर गुरुदेवांचे छायाचित्र ठेवले. घरात दिवे लावले. दिवे लावल्यावर मोगर्‍याचा सुगंध येत होता. एका दिव्यात तेल अल्प असूनसुद्धा तो ६ घंटे तेवत होता.

२. गुरुदेवांना प्रार्थना करत असतांना एक पक्षी येणे आणि त्याने नैवेद्यासाठी ठेवलेले सर्व पदार्थ खाणे

पू. (सौ.) संगीता पाटील

मी श्रीरामलल्लाची चरणपूजा केली. त्या वेळी मी गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘गुरुमाऊली, मला अयोध्येत प्रत्यक्ष जाता येत नाही. मी इथूनच तुमच्या चरणांची पूजा करते.’ त्या वेळी कबुतरासारखा एक पक्षी घरात आला. (‘कोणता पक्षी आला ?’, हे डोळ्यांनी व्यवस्थित दिसले नाही.) तो अंघोळ केल्याप्रमाणे स्वच्छ आणि सुंदर दिसत होता. त्याच्याकडे बघून मला आनंद जाणवत होता. नैवेद्यासाठी वाटीत काजू, बदाम आणि खारीक ठेवली होती. त्या पक्ष्याने ते पदार्थ संपवले. तो पक्षी २० मिनिटे घरात होता. आरती झाल्यावर मी त्याच्याशी बोलले. तेव्हा मला आनंद झाला. ‘प्रार्थना केल्यावर पक्ष्याच्या रूपात गुरुदेवच नैवेद्य ग्रहण करण्यासाठी आले’, अशी अनुभूती देवाने मला दिली’, त्याबद्दल गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’

– पू. (सौ.) संगीता महादेव पाटील, भोसरी, जिल्हा पुणे. (१४.४.२०२४)


श्री गुरुकृपेने मिळे मोक्षस्थान !

जाणुनिया श्री गुरूंची मनोकामना ।
करूया अष्टांगसाधना ।। १ ।।

श्री गुरुकृपेने लाभली
बुद्धीस सत्प्रेरणा ।
भक्तीभावाने करूया
श्री गुरुचरणवंदना ।। २ ।।

सुश्री (कु.) मधुरा भोसले

हिंदुत्वाची करूनी घनगर्जना ।
करूया समष्टी साधना ।। ३ ।।

भाववृद्धीसाठी करूया प्रयत्न ।
वंदन करूया श्री गुरुचरणा ।। ४ ।।

स्मरण करिता अमृतवचना ।
दिशा लाभली या जीवना ।। ५।।

गुरुरूपाचे करूनी स्मरण ।
कृतज्ञ राहू आजीवन ।। ६ ।।

आमुच्या हृदयी वसू दे श्रीरंगा ।
श्री गुरुचरणी करू आर्त प्रार्थना  ।। ७ ।।

गुरुरूपाचे करूनी ध्यान ।
गुरुचरणांचे करूनी पूजन ।। ८ ।।

मंत्ररूपी असती गुरुवचन ।
श्री गुरुकृपेने मिळते मोक्षस्थान ।। ९ ।।

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.७.२०२४)


सद्गुरु म्हणजे सर्वश्रेष्ठ दैवत !

आपण कोण ? याची शुद्ध जाण देणारे ते सद्गुरु. मूळ वस्तूची जाण देऊन, बालकाचा हात धरून त्याला चालवावे, तसे वस्तूप्राप्तीकरता चालवणारे ते सद्गुरु. वस्तूप्राप्ती झाल्यावर शिष्याच्या आनंदबेहोशीने स्वतः आनंदित होणारे, ते सद्गुरु. जगातील सर्वश्रेष्ठ, मंगल, उदात्त, दिव्य आणि भव्य जे जे आहे, ते ते देणारे एकमेव असलेले तेच सद्गुरु; म्हणून तेच सर्वश्रेष्ठ दैवत नव्हे का ?

– स्वामी विद्यानंद (साभार:  ग्रंथ ‘चिंतनधारा’)


सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी निर्मिलेल्या ‘गुरुकृपायोगा’च्या अंतर्गत साधकाला त्याच्या पातळीनुसार प्राप्त होणार्‍या विविध अवस्था आणि साधनेतील टप्पे !

– सुश्री (कु.) मधुरा भोसले(सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.६.२०२४)


गुरूंच्या संदर्भातील उपयुक्त दृष्टीकोन !

पू. संदीप आळशी

 १. ‘गुरूंच्या वाणीत सामर्थ्य असते, हे निर्विवाद सत्य आहे; पण त्यांचे शब्द खरे ठरण्यासाठी त्यांच्यावर श्रद्धाही असावी लागते.

२. गुरूंना शिष्य किंवा साधक यांना जे शिकवायचे आहे, ते ‘ये हृदयीचे ते हृदयी’ होण्यासाठी शिष्य किंवा साधक यांचा गुरूंप्रती अनन्य भाव हवा.

३. ‘आपल्या अंतःकरणातील गुरुचरण’ हाच साधकांना सर्वांत मोठा आधार वाटायला हवा.

४. ‘गुरूंची सेवा सांगकाम्यासारखे नव्हे, तर ‘गुरूंना काय अपेक्षित आहे ?’, हे जाणून करणारे गुरूंना अधिक आवडतात.’

– (पू.) संदीप आळशी (२७.५.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक