Sindhu-Saraswati Culture In Text Book  :  नवीन पाठ्यपुस्‍तकात ‘हडप्‍पा’ऐवजी ‘सिंधू-सरस्‍वती संस्‍कृती’चा नामोल्लेख !

केंद्रशासनाच्‍या ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्‍या समाजशास्‍त्राच्‍या पुस्‍तकात महत्त्वपूर्ण पालट !

‘सिंधु सरस्‍वती संस्‍कृती’

नवी देहली – ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्‍या, म्‍हणजेच राष्‍ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने इयत्ता सहावीच्‍या समाजशास्‍त्र पुस्‍तकाचे प्रकाशन करण्‍यात आले आहे. ‘एक्‍सप्‍लोरिंग सोसायटी: इंडिया अँड बियॉन्‍ड’ नावाच्‍या या पुस्‍तकात हडप्‍पा संस्‍कृतीचा नोमोल्लेख ‘सिंधु सरस्‍वती संस्‍कृती’ असा करण्‍यात आला आहे. पुस्‍तकात अनेक ठिकाणी सरस्‍वती नदीचा उल्लेख आहे. या शैक्षणिक वर्षाच्‍या आरंभीपासूनच हे पाठ्यपुस्‍तक शाळांमध्‍ये वापरले जाणार आहे. जुन्‍या पाठ्यपुस्‍तकात या नदीचा उल्लेख केवळ वैदिक सूक्‍तांमध्‍ये आलेल्‍या नदीचे एक नाव असा करण्‍यात आला होता.

१. पुस्‍तकात स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे की, समाजशास्‍त्राचे नवीन पुस्‍तक विद्यार्थ्‍यांच्‍या सोयीकरता ‘इंडिया अँड द वर्ल्‍ड: लँड अँड पिपल; ‘टेपेस्‍ट्री ऑफ द पास्‍ट’; ‘अवर कल्‍चरल हेरिटेज अँड नॉलेज ट्रॅडीशन्‍स’; ‘गव्‍हर्नन्‍स अँड डेमोक्रसी’; ‘इकॉनामिक लाईफ अराउंड अस’ या पाच प्रमुख विषयांमध्‍ये विभागले आहे.

२. नवीन पाठ्यपुस्‍तकानुसार सरस्‍वती नदी आज भारतात ‘घग्‍गर’ आणि पाकिस्‍तानमधील ‘हाकरा’ (‘घग्‍गर-हाकरा नदी’) या नावाने ओळखली जाते. पुस्‍तकात २ नकाशे देण्‍यात आले आहेत.

पुरामुळे नाही, तर अल्‍प पाऊस आणि सरस्‍वती नदी कोरडी पडल्‍याने सिंधु-सरस्‍वती (हडप्‍पा) संस्‍कृतीचा झाला लय !

या नवीन पाठ्यपुस्‍तकात हडप्‍पा संस्‍कृतीचा र्‍हास कसा झाला, याची कारणमीमांसा देतांना दोन प्रमुख करणे देण्‍यात आली आहेत. एक म्‍हणजे वातावरणातील पालट, ज्‍यामुळे पावसावर परिणाम झाला आणि पावसाचे प्रमाण अल्‍प झाले. दुसरे म्‍हणजे सरस्‍वती नदी कोरडी पडली. त्‍यामुळे या नदीच्‍या खोर्‍यात विकसित झालेली कालीबंगा किंवा बाणावली यांसारखी शहरे नामशेष झाल्‍याचे म्‍हटले आहे.

जुन्‍या पाठ्यपुस्‍तकात हडप्‍पा संस्‍कृतीच्‍या र्‍हासासाठी अनेक कारणे देण्‍यात आली असून त्‍यात सरस्‍वती नदी कोरडी पडल्‍याचा उल्लेखच नाही. यासह या संस्‍कृतीच्‍या र्‍हासासाठी पूर कारणीभूत असल्‍याचे एक कारण सांगण्‍यात आले होते.

सरस्‍वती नदीसंदर्भात डॉ. नीलेश ओक यांची ‘सनातन प्रभात’ने घेतलेली मुलाखत !

अमेरिकेतील प्रसिद्ध संशोधक डॉ. नीलेश ओक यांची ‘सनातन प्रभात’ने नुकतीच मुलाखत घेतली. त्‍यामध्‍ये त्‍यांनी दैवी सरस्‍वती नदीविषयी केलेले अद्वितीय संशोधन वर्णिले आहे.

 त्‍याचा व्‍हिडिओ पहाण्‍यासाठी क्‍लिक करा : www.youtube.com/watch?v=MTTBIeyINr8

संपादकीय भूमिका

केंद्रशासनाने केलेल्‍या या महत्त्वपूर्ण पालटासमवेत अन्‍यही अनेक पालट करणे आवश्‍यक आहेत. त्‍यामध्‍ये रामायण आणि महाभारत ही केवळ महाकाव्‍ये अथवा कपोलकल्‍पित कथा नसून तो आपला इतिहास आहे, हे सांगितले पाहिजे. तसेच आर्य आक्रमण सिद्धांत हा कशा प्रकारे धादांत खोटा आहे, हे सोदाहरण सांगून सनातन हिंदु धर्म हा या भूमीतूनच सर्वत्र पसरला, हे स्‍पष्‍ट केले पाहिजे !