शिष्यवृत्तीपासून वंचित संशोधक विद्यार्थ्यांची फुलेवाडा (पुणे) ते विधानभवन (मुंबई) मार्गावर पायी फेरी !

पुणे – राज्यशासनाने बार्टी, सारथी, महाज्योती, टी.आर्.टी.आय. या संस्थांच्या कामकाजात समानता आणण्याचा निर्णय घेऊनही अनेक विद्यार्थी िशष्यवृत्तीपासून वंचित आहेत. त्यामुळे राज्यभरातील संशोधक विद्यार्थी २४ जून ते २ जुलै या कालावधीत पुण्ो येथील महात्मा फुलेवाडा ते मुंबईतील विधानभवन या मार्गावर पायी फेरी (लाँग मार्च) काढणार आहे. राज्यशासनाच्या वतीने बार्टी, सारथी, महाज्योती, टी.आर्.टी.आय. अशा संस्थांच्या माध्यमातून सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल, वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना पीएच्.डी.साठी शिष्यवृत्ती दिली जाते; मात्र त्यांना शिष्यवृत्ती मिळत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून सातत्याने केला जात आहे; मात्र अद्याप शिष्यवृत्तीचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर दलित भटके विमुक्त, ओबीसी, एस्.बी.सी. आणि मराठा विद्यार्थ्यांनी एकत्रित पायी फेरी काढण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यार्थी समन्वयक तुकाराम शिंदे यांनी सांगितले की, राज्यशासनाने ३० ऑक्टोबर २०२३ या दिवशी शासन निर्णय प्रसिद्ध करून समानतेच्या नावाखाली बार्टी, सारथी, महाज्योती, टी.आर्.टी.आय. या संस्थांच्या वतीने दिल्या जाणार्‍या शिष्यवृत्तीची संख्या निश्चित करण्यात आली. त्यामुळे या संस्थांची स्वायत्तता संपुष्टात आल्याने शिष्यवृत्तीचा गोंधळ निर्माण झाला आहे. शिष्यवृत्तीसाठी निश्चित केलेल्या जागा विद्यार्थी संख्येच्या तुलनेत पुष्कळ अल्प आहेत. गेल्या २ वर्षांत शिष्यवृत्तीसाठी विद्यापन प्रसिद्ध करूनही शिष्यवृत्ती देण्यात आली नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थिनींना शिक्षण सोडण्याची वेळ आली आहे. शिष्यवृत्ती मिळत नसल्याचा विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. त्यामुळे चारही संस्थांतील संशोधक विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन शिष्यवृत्तीच्या हक्कासाठी पायी फेरी काढण्याचा निर्णय घेतला आहे.

संपादकीय भूमिका

शिष्यवृत्ती मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना पुणे ते मुंबई अशी फेरी काढावी लागणे हे प्रशासन आणि सरकार यांना लज्जास्पदच !