महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने आंतरराष्ट्रीय परिषदांत सादर केलेल्या काही शोधनिबंधांचे विषय !

ऑक्टोबर २०१६ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने २० राष्ट्रीय आणि ९४ आंतरराष्ट्रीय अशा एकूण ११४ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी १४ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सर्वोत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार मिळाले आहेत. या शोधनिबंधांच्या माध्यमातून विविध वैज्ञानिक उपकरणांद्वारे सकारात्मक आणि नकारात्मक घटकांचा आध्यात्मिक दृष्टीकोनातून वेध घेतला गेला अन् त्यांची सत्यता पडताळली गेली.

१. श्रीलंकेच्या ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज मॅनेजमेंट’च्या वतीने ८ व्या ‘आंतरराष्ट्रीय सामाजिक विज्ञान परिषद’ या पहिल्या परिषदेत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या ‘भयपट चित्रपटाचा (‘हॉरर मूव्ही’चा) सूक्ष्म परिणाम’ या शोधनिबंधाला ‘सर्वोत्कृष्ट प्रस्तुतकर्ता – प्रसारमाध्यम’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. या परिषदेत २० देशांतून शोधनिबंध सादर करण्यात आले होते. त्यात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या शोधनिबंधाला ‘सर्वोत्कृष्ट प्रस्तुतकर्ता – प्रसारमाध्यम’ पुरस्कार प्राप्त झाला.

वास्को, गोवा येथे २७ मे या दिवशी २०२३ या दिवशी झालेल्या ‘विविधता, समावेशकता आणि परस्पर आदर’ या विषयावरील ‘सी-२०’ परिषदेच्या (‘सी-२०’ ही ‘जी-२०’ परिषदेची नागरी शाखा आहे.  यंदाच्या वर्षी भारताकडे ‘जी-२०’ परिषदेचे यजमानपद आहे.) कार्यक्रमात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने श्री. शॉन क्लार्क यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑरा’ आणि ‘एनर्जी स्कॅनर’ आदी उपकरणे वापरून चालू असलेल्या अनोख्या आध्यात्मिक संशोधनाविषयी सविस्तर माहिती दिली. एखाद्या व्यक्तीच्या प्रभावळीमध्ये नकारात्मक ऊर्जा असणे, हे तिला शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक स्तरावर समस्या निर्माण करते. हे समजावण्यासाठी दैनंदिन जीवनातील आहार, संगीत, चित्रपट, अलंकार इत्यादी सर्वसामान्य सूत्रे व्यक्तीच्या प्रभावळीवर कशा प्रकारे सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करतात’, या संदर्भातील विविध आध्यात्मिक संशोधनात्मक प्रयोग श्री. क्लार्क यांनी सादर केले. या वेळी सात्त्विक नृत्याचे सादरीकरण करण्यात आले.

२. श्रीलंकेच्या ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज मॅनेजमेंट’च्या वतीने द्वितीय ‘आंतरराष्ट्रीय पुरातत्व इतिहास आणि वारसा परिषद’ या दुसर्‍या परिषदेत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘वारसा स्थळांविषयी आध्यात्मिक दृष्टीकोन’ हा शोधनिबंध सादर केला. या परिषदेत १५ देशांतून २५ शोधनिबंध सादर करण्यात आले. त्यामध्ये महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या शोधनिबंधाला ‘सर्वोत्कृष्ट प्रस्तुतकर्ता’ पुरस्कार प्राप्त झाला.

३. ‘जनसंपर्क तंत्रज्ञानाचा समाजमनावर आध्यात्मिकदृष्ट्या होणारा परिणाम’, हा परिषदेचा विषय होता. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने श्री. शॉन क्लार्क (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांनी परिषदेत सादर केलेल्या शोधनिबंधाला ‘सर्वोत्कृष्ट सादरीकरणा’चा पुरस्कार देण्यात आला. या परिषदेत २४ देशांनी १०० शोधनिबंध सादर केले होते.

४. सप्टेंबर २०२२ मध्ये संगीत आणि नृत्य यांवर आधारित ‘भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्य’ यांच्या उत्पत्तीत भारतीय मंदिरांचे महत्त्व’ या विषयावर शोधनिबंध आंतरराष्ट्रीय परिषदांत सादर करण्यात आला.

५. मार्च २०२४ मध्ये थायलंड येथे झालेल्या ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ हॅपिनेस अँड वेलबिईंग’ आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘सकारात्मक सूक्ष्म स्पंदने कशी निरामय आणि आनंदी जीवन प्रदान करतात’, या विषयावर शोधनिबंध सादर करण्यात आला. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया, नामजप करणे अन् आध्यात्मिक स्तरावरील उपायपद्धत, उदा. मीठ-पाण्यात १५ मिनिटे पाय ठेवून उपाय करणे या गोष्टी मानवाचे जीवन सात्त्विक बनवतात, हे काही चाचण्यांच्या आधारे सिद्ध करण्यात आले.

६. बँकॉक, थायलंड येथे झालेल्या ‘सेव्हन्थ ग्लोबल पब्लिक हेल्थ कॉन्फरन्स’ या परिषदेत मंत्र, नामजप आणि भारतीय शास्त्रीय संगीतातील राग यांमुळे सर्वंकष उपचार होतात. हा शोधप्रबंध सादर करण्यात आला.

७. नवी देहली येथे झालेल्या ‘ट्वेंटिसेवेंथ इंडिया कॉन्फरन्स ऑफ वेव्हज ऑन मॅन अँड नेचर इन वेदिक ट्रॅडिशन : मॉडर्न प्रर्स्पेक्टिव्ह’ या राष्ट्रीय परिषदेत ‘यज्ञामधील वायूमंडलाची आध्यात्मिक शुद्धी करण्याची क्षमता’, हा शोधनिबंध सादर केला.

८. श्रीलंका येथे आयोजित ‘द एट्थ वर्ल्ड कॉन्फरन्स ऑन वुमेन्स स्टडीज् २०२०’ या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत ‘व्यक्तीची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये तिच्या स्त्री किंवा पुरुष असण्यावर अवलंबून नसणे’ या विषयावर सादर केलेल्या शोधनिबंधाला उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार प्राप्त झाला !

९. ‘सध्या जगभरातील वायूमंडलात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण ‘न भूतो न भविष्यति’ एवढे वाढले आहे, हे अत्यंत चिंतेचे कारण आहे’, असे हवामान शास्त्रज्ञ सांगत आहेत; मात्र त्याही पेक्षा अधिक काळजीचे कारण ‘सूक्ष्म स्तरावरील आध्यात्मिक प्रदूषणात, म्हणजे रज-तम यांत झालेली वाढ’, हे आहे. यज्ञामुळे वायूमंडलातील रज-तमाचे प्रदूषण न्यून होते, हे विविध वैज्ञानिक प्रयोगांतून स्पष्ट झाले आहे. यज्ञातून प्रक्षेपित होणारी सकारात्मकता ग्रहण करणे आणि ती टिकवून ठेवणे यांसाठी सात्त्विक जीवनशैली अवलंबणे अन् साधना करणे आवश्यक आहे.

– श्री. शॉन क्लार्क (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.