Pakistan Warns Nukes Ready : (म्हणे) ‘पाकिस्तानचे अणूबाँब सिद्ध !’

पाकिस्तानची भारताला धमकी !

इस्लामाबाद – भारतात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यापर्यंत सर्वांनीच पाकिस्तानच्या अणूबाँबच्या सामर्थ्यावर ताशेरे ओढले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानने आता भारताला अणूबाँबच्या धमक्या देणे चालू केले आहे. पाकिस्तानच्या अणूबाँबवर देखरेख करणार्‍या ‘नॅशनल कमांड अथॉरिटी’चे सल्लागार लेफ्टनंट जनरल (निवृत्त) खालिद अहमद किडवई म्हणाले की, पाकिस्तानचे अणूबाँब पूर्णपणे सिद्ध आहेत. अणूबाँबविषयी पाकिस्तानचे ‘नो फर्स्ट यूज’ (प्रथम वापर न करणे) असे धोरण नसून प्रसंगी आम्ही त्यांचा वापर करू.

किडवई पुढे म्हणाले की, भारताच्या ‘नो फर्स्ट यूज’ धोरणाविषयी पाकिस्तानच्या रणनीतीकारांना शंका आहे. भारत अण्वस्त्र आक्रमण करू शकतो, असे त्यांचे मत आहे. पाकिस्तानचे सैन्यदल, नौदल आणि हवाई दल या सर्वांकडे अणूबाँब आहेत. (घोडा-मैदान जवळ आहे, हे भारताला अणूबाँबची धमकी देणार्‍या  पाकिस्तानने ध्यानात ठेवावे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही ! – संपादक)

संपादकीय भूमिका

आर्थिक डबघाईला आलेल्या आणि जगभरात कर्जाची भिक मागत फिरणार्‍या पाकिस्तान सरकारविषयी तेथील जनतेत प्रचंड रोष आहे. जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी पाकिस्तान नेहमीच अशा प्रकारच्या धमक्या देत असतो. अर्थात् भारतानेही या धमकीकडे दुर्लक्ष न करता पाकला ‘जशा तसे’ उत्तर देऊन त्याला त्याची जागा दाखवली पाहिजे !