सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी अमरावती येथील साधकांना आलेल्या अनुभूती

वर्ष २०२३ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव ब्रह्मोत्सव स्वरूपात साजरा केला होता. त्या वेळी अमरावती येथील साधकांना आलेल्या काही अनुभूती आपण २ मे या दिवशी पाहिल्या. आज पुढील अनुभूती पाहूया.

याच्या आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/789762.html

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

३. श्री. विलास सावरकर

३ अ. ब्रह्मोत्सवात पूर्णवेळ भावावस्था अनुभवणे : ‘११.५.२०२३ या दिवशी प.पू. गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्याच्या वेळी ‘गुरुदेव आज कुठल्या रूपात दर्शन देणार ?’, याविषयी कार्यक्रम चालू होईपर्यंत माझ्या मनाला उत्कंठा लागली होती. प्रत्यक्ष कार्यक्रम चालू झाल्यावर तो संपेपर्यंत मी भावावस्थेत होतो. गुरुदेव रथातून पटांगणात फिरत असतांना ‘ते उपस्थित साधकांना दर्शन देऊन कृपाशीर्वाद देत आहेत’, असे मला वाटले.

मैदानात उपस्थित असलेल्या साधकांची संख्या बघून ‘मलाही हा सोहळा प्रत्यक्ष बघण्याची संधी मिळाली असती, तर चांगले झाले असते’, असा विचार माझ्या मनात आला. लगेच गुरुदेवांनी मला आतून सांगितले, ‘हा सोहळा प्रत्यक्ष किंवा ‘ऑनलाईन’ पहाणार्‍या प्रत्येकाला चैतन्य आणि कृपाशीर्वाद यांचा सारखाच लाभ होणार आहे. संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत माझी भावावस्था टिकून होती. ‘गुरुदेवा, आपल्या चैतन्याचा लाभ आम्हाला सतत मिळू दे’, अशी आपल्या चरणी शरणागतीने प्रार्थना आहे.’

४. सौ. संगीता ठाकरे

४ अ. ‘रथारूढ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे दर्शन झाल्यावर भाव जागृत होऊन चैतन्याच्या लहरी अनुभवणे : ‘११.५.२०२३ या दिवशी प.पू. गुरुदेवांचा ८१ वा जन्मोत्सव सोहळा बघायला मिळणार’, असा निरोप मिळाल्यावर माझी भावजागृती झाली. दिवसभर मला गुरुदेवांचे अस्तित्व जाणवून आतून शांत वाटत होते. प्रत्यक्ष सोहळ्याच्या दिवशीही माझा भाव जागृत होऊन मला चैतन्याच्या लहरी अनुभवता आल्या. ‘मी गुरुमाऊलींमधील विष्णुतत्त्वाचे दर्शन घेत त्यांच्या चरणांशी नामजप करत आहे’, असे मला सतत जाणवत होते. मला प्रत्येक साधकाच्या चेहर्‍यावर भाव जाणवत होता. गुरुमाऊली, श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे रथारूढ दर्शन झाल्यावर माझे मन स्थिर झाले. ‘गुरुदेवांच्या कृपेमुळेच मला हे अनुभवता आले’, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

५. सौ. महानंदा चोरे

५ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे वातावरणात गारवा अनुभवणे आणि त्यांचे त्रिमूर्तीरूप अनुभवता येऊन भावजागृती होणे : ‘ब्रह्मोत्सव सोहळ्याच्या दिवशी सकाळी उठल्यापासून मी आनंदात होते. माझ्याकडे कार्यक्रमस्थळाची वास्तूशुद्धी करायची सेवा होती. ती सेवा करतांना ‘इथे सर्व देवता उपस्थित असून गुरुमाऊली सगळीकडे फिरून पहात आहे. वास्तूमध्ये गारवा आणि पुष्कळ चैतन्य आहे’, असे मला जाणवत होते. ‘ब्रह्मोत्सवाचा पूर्ण वेळ कसा गेला ?’, ते मला कळलेही नाही. आदल्याच दिवशी मला कंबरदुखीचा त्रास होत होता; पण ब्रह्मोत्सवाच्या दिवशी मला काहीच त्रास झाला नाही. कार्यक्रम पहातांना गुरुदेवांचे त्रिमूर्तीरूप दर्शन झाल्यावर मला आनंदाश्रू आवरत नव्हते. ‘प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळेच मला हा आनंद अनुभवता आला’, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

६. सौ. नीता देशमुख

६ अ. रथारूढ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना पहातांना ‘स्वतः स्वर्गलोकात आहे’, असे वाटून मन कृतज्ञतेने भरून येणे : ‘११.५.२०२३ या दिवशी झालेल्या प.पू. डॉक्टरांच्या ‘ब्रह्मोत्सव’ सोहळ्याच्या वेळी ‘मी प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळीच आहे’, असे मला जाणवत होते. रथारूढ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना पहातांना माझा भाव जागृत होत होता. प्रत्यक्ष सगुण रूपातील गुरुदेवांचा हा सोहळा पहातांना ‘मी स्वर्गलोकात आहे’, असे वाटून माझे मन कृतज्ञतेने भरून आले. गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

(सर्व सूत्रांचा दिनांक १३.५.२०२३) (क्रमश:)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

याच्या नंतरचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/790412.html