सर्वांगीण विकासासाठी महायुतीला मतदान करा ! – मंत्री नारायण राणे

रत्नागिरी शहरातील प्रभागनिहाय बैठकांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद

रत्नागिरी – कोकणात जे मते मागायला आले आहेत त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात कोकणाला काय दिले ? केवळ टीका करून विकास होत नसतो. सावरकर आणि टिळक यांच्या या भूमीच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह मी कटीबद्ध असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाचे व्हिजन इथे राबवण्यासाठी महायुतीला (कमळाला) मतदान करा, असे आवाहन महायुतीचे उमेदवार मंत्री नारायण राणे यांनी केले.

शहरातील १५ प्रभागांमध्ये ३ ठिकाणी मंत्री नारायण राणे यांच्या उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासमवेत प्रचार सभा झाल्या. या वेळी ते बोलत होते.

मंत्री नारायण राणे म्हणाले की,

१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १० वर्षांत देशाला प्रगत केले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत देश ११ व्या क्रमांकावरून तिसर्‍या क्रमांकावर नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हीच मोदी यांची ‘गॅरंटी’ आहे.

२. कोरोना काळात लाखो जीव जात असतांना मोदी यांनी लस बनवण्याचा निर्णय घेऊन आपले जीव वाचवले आहेत. कारखाने उद्योग बंद झाले होते, उपासमार होत होती त्या वेळी विनामूल्य धान्य दिले.

३. प्रत्येक घरात पाणी नेण्यासाठी प्रयत्न चालू केलेत, बेघरांना घर, उज्ज्वल गॅस योजना, शेतकर्‍यांना ६ सहस्र रुपयांचे साहाय्य, आयुष्यमान भारत योजना, महिला उद्योजक बनवण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना चालू केल्या आहेत.

४. पालकमंत्री उदय सामंत यांनी तुमच्यासमोर विकास कामांची यादी दिली आहे; पण विरोधक फक्त मोदींवर टीका करत आहेत. जे टीका करत आहेत त्यांनीच भाजप समवेत २५ वर्ष संसार केला; पण त्या युतीचे पावित्र्य राखले नाही, आता तर ते मोदी शहांवर टीका करत आहेत. त्यासाठीच इथे आले आहेत.