India Pakistan Relation : (म्हणे) ‘भारताने निवडणुकीत जम्मू-काश्मीरवर खोटे दावे करणे थांबवावे !’ – पाकचा जळफळाट

पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या झाहरा बलोच

नवी देहली – निवडणुकीत राजकीय लाभ घेण्यासाठी पाकचे नाव घेऊ नयेे. भारतीय नेत्यांनी जम्मू-काश्मीरवर खोटे दावे करणे थांबवावे, असे वक्तव्य पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या झाहरा बलोच यांनी केले आहे. २६ एप्रिल या दिवशी त्यांनी पत्रकार परिषदेत वरील दावे करत भारतीय नेत्यांनी त्यांच्या भाषणात आणि मतांसाठी पाकचे सूत्र उपस्थित करणे थांबवावे, असेही म्हटले. त्यांनी जम्मू-काश्मीरविषयी भारतीय नेत्यांचे सर्व दावे फेटाळून लावले.

झाहरा बलोच पुढे म्हणाल्या की, जम्मू-काश्मीरवर भारतीय नेत्यांच्या भडकावणार्‍या भाषणांमध्ये गेल्या काही काळापासून वाढ होत आहे. हे अत्यंत चिंताजनक आहे. त्यांची ही विधाने राष्ट्रवादाने प्रेरित आहेत. त्यामुळे या भागातील शांतता धोक्यात येऊ शकते. भारतीय दावे ऐतिहासिक आणि कायदेशीर तथ्यांच्या विरुद्ध आहेत.

पाकव्याप्त काश्मीर आमचा भाग होता, आहे आणि राहील ! – राजनाथ सिंह

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ११ एप्रिल या दिवशी मध्यप्रदेशातील सतना जिल्ह्यात एका सभेत पाकचा उल्लेख करत म्हटले होते की, जम्मू-काश्मीरचा ज्या प्रकारे विकास होत आहे, त्यावरून मला वाटते की, पाकव्याप्त काश्मीरच्या लोकांना वाटते की, त्यांचा विकास केवळ पंतप्रधान मोदी यांच्या हातूनच शक्य होईल. पाकव्याप्त काश्मीर आमचा भाग होता, आहे आणि राहील !

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनीही पत्रकार परिषदेत म्हटले होते की, पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग नाही, हे आम्ही कधीही मान्य करणार नाही. तो भारताचाच भाग आहे, अशी भारतातील सर्व पक्षांची एकच भूमिका आहे.

संपादकीय भूमिका

  • तालिबान डोईजड झालेल्या पाकला पाकव्याप्त काश्मीर हातातून निसटण्याचे भयही निर्माण झाले आहे. अर्थात् त्यात तथ्य असल्यानेच त्याच्याकडून नैराश्येपोटी अशी वक्तव्ये केली जात आहेत, यात काय आश्‍चर्य ?
  • कथित खोट्या दाव्यांना सत्यात उतरवण्यासाठी भारतीय संरक्षण आणि कूटनैतिक यंत्रणा लवकरच आखलेल्या व्यूहरचनेवर कार्यवाही करतील, हे पाकने लक्षात ठेवले पाहिजे !