Letter To CJI : न्यायव्यवस्थेवर दबाव निर्माण करून ती दुर्बल करण्याचा प्रयत्न केला जात आहे !

निवृत्त २१ न्यायमूर्तींचे सरन्यायाधिशांना पत्र !

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड

नवी देहली – देशातील २१ निवृत्त न्यायमूर्तींनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना पत्र लिहून ‘न्यायव्यवस्थेवर दबाव निर्माण करून ती दुर्बल करण्याचा प्रयत्न केला जात आहे’, असे म्हटले आहे. २१ न्यायमूर्तींपैकी ४ सर्वोच्च न्यायालयाचे, तर उर्वरित १७ राज्यांमधील उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा अन्य निवृत्त न्यायाधीश आहेत.

निवृत्त न्यायमूर्तींनी पत्रात मांडलेली सूत्रे

१. काही लोक दबाव निर्माण करून, चुकीची माहिती पसरवून आणि सार्वजनिकरित्या त्यांचा अपमान करून न्यायव्यवस्था दुर्बल करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत. हे लोक क्षुल्लक राजकीय स्वार्थासाठी आणि वैयक्तिक लाभासाठी न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्‍वास अल्प करत आहेत.

२. आम्ही कायद्याचे रक्षक आहोत, आमच्या सचोटीवर प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. काही समीक्षक न्यायालये आणि न्यायाधीश यांच्या अखंडतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करून न्यायिक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्यासाठी फसव्या मार्गांचा अवलंब करत आहेत.

३. अशा कृतींमुळे केवळ आपल्या न्यायव्यवस्थेच्या पावित्र्याचा अपमान होत नाही, तर न्याय आणि निष्पक्षता यांच्या तत्त्वांनाही थेट आव्हान निर्माण होते, ज्यांचे पालन करण्याची शपथ न्यायाधिशांनी घेतली होती. आम्हाला काळजी वाटते की, जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्‍वास अल्प होऊ नये.

४.  चुकीच्या माहितीद्वारे न्यायव्यवस्थेविरुद्ध जनभावना भडकावण्याच्या रणनीतीबद्दल आम्ही विशेषतः चिंतित आहोत. असे करणे केवळ अनैतिकच नाही, तर आपल्या लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांनाही हानीकारक आहे.