गेल्या ५ वर्षांत ० ते १८ वर्षे वयोगटातील १५ सहस्र २६२ मुलांचा मृत्यू !

राज्यासह मुंबईत बालमृत्यूची समस्या गंभीर !

मुंबई – येथे ० ते पाच आणि १० ते १८ वर्षे वयोगटांमध्ये दगावणार्‍या मुलांची संख्या वाढत आहे. मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार वर्ष २०१९ ते २०२३ या कालावधीमध्ये ० ते ५ वयोगटातील ९ सहस्र ९६१ मुलांचा, तर १० ते १८ वर्षे वयोगटातील ५ सहस्र ३०१ मुलांचा मृत्यू झाला. दोन्ही वयोगटांतील बालकांच्या एकत्रित मृत्यूची एकूण संख्या १५ सहस्र २६२ इतकी आहे.

या मृत्यूमागे मातेचे होणारे कुपोषण, गर्भामधील व्यंग, मुदतपूर्व प्रसूती, योग्य वेळी आजाराचे निदान न होणे, तसेच असंसर्गजन्य आजार अशी अनेक कारणे आहेत. विलंबाने होणारे विवाह, प्रसूती या कारणांमुळे मुलांचे मुदतपूर्व जन्माला येण्याचे प्रमाण वाढत आहे. वंध्यत्वाच्या समस्येमुळे चाळीशीनंतर गर्भधारणा झाल्यास मुदतपूर्व प्रसूती होते.

संपादकीय भूमिका 

स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही सहस्रावधी संख्येत बालमृत्यू होतात, याचा सरकारी यंत्रणांनी गांभीर्याने विचार करायला हवा !