भारताच्या वैचारिक विध्वंसाचा स्वातंत्र्योत्तर इतिहास ! – (भाग ३)

‘स्वातंत्र्यानंतर उदयास आलेल्या आणि लोकशाही स्वीकारलेल्या भारताचा गेल्या ७५ वर्षांचा वस्तुनिष्ठ इतिहास ‘हिंदु’ जगासमोर अभावानेच कुणी मांडला असेल. हे लक्षात आणून देणारा ‘प्राच्यम् स्टुडिओज’ने प्रसारित केलेल्या व्हिडिओतून अत्यंत सुरेखपणे सांगण्यात आले आहे. ‘प्राच्यम् स्टुडिओज’चे प्रमुख कॅप्टन प्रवीण चतुर्वेदी यांच्या विशेष सौजन्याने या व्हिडिओची संहिता आमच्या वाचकांसाठी प्रकाशित करत आहोत.

याचा दुसरा भाग आपण १० मार्च २०२४ या दिवशीच्या अंकात वाचला. त्यामध्ये ‘स्वातंत्र्य मिळवण्याच्या नावाखाली नेहरू आणि काँग्रेस यांच्याकडून अनेक गुप्त करार !’, ‘जिना आणि मुस्लिम लीग यांची क्रूरता’, ‘रशियाच्या ‘केजीबी’चे हातचे खेळणे झालेला भारत’, ‘भारतात साम्यवादाची क्रांती घडवून आणण्यासाठी साम्यवाद्यांकडून हिंदु संस्कृती नष्ट करण्याचा कुटील प्रयत्न’ आदी सूत्रे पाहिली. आज याचा पुढील भाग पाहूया.


(हा व्हिडिओ जगातील पहिले हिंदु ओटीटी असलेल्या ‘प्राच्यम्’वर विनामूल्य पहाता येऊ शकतो. भ्रमणभाषवरून http://prachyam.com वरून हा व्हिडिओ हिंदू पाहू शकतात. या व्हिडिओचे नाव आहे – ‘साहेब’ जे कधी गेलेच नाहीत : भाग २ – परिणाम.’ भाग-१ मधून स्वातंत्र्याच्या आधी १००० वर्षांचा हिंदुद्वेषी इतिहास दाखवण्यात आला आहे. त्याचा लेख एप्रिल २०२३ मध्ये ‘सनातन प्रभात’मध्ये प्रकाशित करण्यात आला होता.)

भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा :  https://sanatanprabhat.org/marathi/772391.html

१३. भारताचा तिसरा वसाहतवाद !

‘भारतियांच्या मनात मार्क्सवादी विचारसरणी पूर्ण विरघळली पाहिजे’, असे सोव्हिएत रशियाला वाटत होते. संपूर्ण शहराला विष पाजायचे असेल, तर त्यासाठी पाणीपुरवठ्यावर आक्रमण करण्यावाचून अधिक चांगला पर्याय नाही. सोव्हिएत रशियाच्या इशार्‍यावर इंदिरा गांधींनी साम्यवाद्यांसाठी भारतीय शिक्षणाची दारे उघडी केली. साहेबांनी येणार्‍या शेकडो पिढ्यांचे भविष्य, देशभक्ती आणि जीवनप्रवास सर्वकाही सत्तेसाठी विकून टाकले. हा भारताचा तिसरा वसाहतवाद होता, एक बौद्धिक विध्वंस – ‘इंटेलेक्च्युल सबव्हर्जन’ !

सोव्हिएत संघाचा व्यावसायिक प्रचार (प्रॉपगेंडा) करणारे युरी बेझमेनोव्ह सांगतात, ‘‘मी प्रसिद्ध भारतीय कवि सुमित्रानंदन पंत यांच्या शेजारी उभा होतो. पंत एका प्रसिद्ध कवितेचे कवी होते. त्याचे शीर्षक होते ‘रॅपसोडी टू लेनिन’ ! यामुळेच त्यांना सोव्हिएत रशियामध्ये आमंत्रित केले गेले. आमच्यासाठी हे लोक केवळ ‘राजकीय वेश्यां’चा (‘पॉलिटिकल प्रॉस्टिट्यूट्स’चा) समूह होते, ज्यांचा लाभ विविध प्रचार मोहिमांसाठी उचलण्यात येणार होता.’’

१४. भारतीय विचारवंतांना सोव्हिएत रशियाचे निमंत्रण !

रोमिला थापर, इरफान हबीब, आर्.एस्. शर्मा, डी.एन्. झा, जी. पार्थसारथी आणि ठाऊक नाही, किती विचारवंत अन् इतिहासकार समोर येऊ लागले. नवनवीन वर्तमानपत्रे आणि मासिके प्रकाशित होऊ लागली. या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक क्षणाविषयी युरी बेझमेनोव्ह सांगतात, ‘‘प्राध्यापकांशी मैत्री करण्याचा हा पहिला टप्पा आहे. पुढचा टप्पा म्हणजे त्या प्राध्यापकांना ‘इंडो सोव्हिएत फ्रेंडशिप सोसायटी’च्या मेळाव्यात आमंत्रित करणे. ते त्या कार्यक्रमाला त्यांच्या पत्नीसमवेत आलेही ! त्यांना पुढे ‘सोव्हिएत रशिया’च्या सहलीसाठी विनामूल्य पाठवण्यात आले. त्यांना विश्वास दिला गेला की, त्यांना यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे; कारण ते एक प्रतिभावान, संयमी विचार करणारे विचारवंत आहेत. पूर्णपणे खोटे ! वास्तविक ते ‘एक उपयुक्त मूर्ख’ (यूझफुल इडियट) असल्याने त्यांना आमंत्रित केले होते, तसेच ते जेव्हा भारतात परततील, तेव्हा पुढील अनेक वर्षे ते त्यांच्या विद्यार्थ्यांच्या नवनवीन पिढ्यांना सोव्हिएत समाजवादाचे सौंदर्य सांगणार होते.’’

१५. इस्लामी आक्रमणकर्ते भारतीय इतिहासाचा केंद्रबिंदू बनले कसे ?

संपूर्ण जगात मार्क्सवाद आणि इस्लाम एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत. इस्लामी देशांमध्ये साम्यवाद्यांवर बंदी आहे आणि साम्यवादी देशांमध्ये मशिदी तोफांनी उडवल्या जातात. असे असतांना ‘साहेबां’च्या (नेहरूंच्या) भारतात एक विचित्र घटना घडली. येथे मार्क्सवाद्यांनी इस्लामीवाद्यांना एकेक करून निवडले आणि प्रोत्साहन दिले. इस्लामी आक्रमणापूर्वीच्या सर्व भारतीय इतिहासाला ‘राष्ट्रवादी प्रचार’ संबोधून खोटे ठरवण्यात आले आणि शेकडो विचारवंतांनी गाझी आक्रमणकर्त्यांना भारतीय इतिहासाचे प्रमुख केंद्रबिंदू बनवले.

लेखक आणि संशोधक डॉ. ओमेंद्र रत्नू सांगतात, ‘‘२५ फेब्रुवारी १५६८ या दिवशी ज्या अकबराने ४० सहस्र निरपराध हिंदूंची हत्या केली, त्याला हिंदु समाजात ‘अकबर द ग्रेट’ म्हणून शिकवले जाते. जर सभ्यतेच्या दृष्टीने हिंदूंमध्ये मुसलमान राजांविषयी द्वेष असेल, तर तुम्ही या देशाचे इस्लामीकरण करू शकत नाही. शहरी हिंदू मात्र ‘जिम्मी’ (‘जिम्मी’ म्हणजे स्वत:च्या बुद्धीचा विशेष उपयोग न करणारी आणि अपमान सहन करून मालकाशी एकनिष्ठ रहाणारी व्यक्ती !) आहेत, तेथे ही प्रक्रिया करणे सोपे होते. दुसरीकडे या देशातील खेडोपाडी ही प्रक्रिया राबवणे कठीण होते. तेथील हिंदूंना ‘आपला शत्रू कोण आहे ?’, हे ठाऊक होते. या शत्रूबोधाला क्षीण करण्यासाठी परकीय आक्रमणकर्त्यांचे उदात्तीकरण करण्यात आले, जे पूर्णपणे खोटे होते.

सुप्रसिद्ध लेखक आणि संशोधक श्री. एस्.एल्. भैरप्पा

सुप्रसिद्ध लेखक आणि संशोधक श्री. एस्.एल्. भैरप्पा हे त्यांच्या जीवनातील अत्यंत बोलका प्रसंग सांगतात. ते म्हणतात, ‘‘मी ‘एन्.सी.ई.आर्.टी.’मध्ये ‘शिक्षण दर्शन’मध्ये ‘रिडर’ म्हणून काम करत होतो. ते कदाचित् वर्ष १९६९ किंवा १९७० असावे. जी. पार्थसारथी नावाचे गृहस्थ, जे नेहरू घराण्याच्या अगदी जवळचे होते, ते मला म्हणाले, ‘‘आपल्याला आपला अभ्यासक्रम स्वच्छ करावा लागेल; पण मी त्यांना विरोध केला.’’ मी म्हणालो, ‘‘तुम्हाला नक्की काय करायचे आहे, ते सांगा.’’ ते म्हणाले, ‘‘उदाहरणार्थ बनारसमध्ये एक मशीद (ज्ञानवापी) आहे, जी मंदिरावर (काशीविश्वनाथ मंदिरावर) बांधली आहे, असे लोक म्हणतात. अशा गोष्टी आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये नसाव्यात.’’ मग मी म्हणालो, ‘‘हे खरे आहे कि नाही ?’’; पण ते ओरडले, ‘‘तुम्हाला काय पाहिजे ?’’

ते आधीच चिडले होते. साधारण १०-१२ दिवसांनी एक परिपत्रक आले. त्यामध्ये एस्. एल्. भैरप्पा यांचे नाव काढून टाकण्यात आले होते. त्या वेळी संपूर्ण देशात काँग्रेसचीच सत्ता होती. सर्व राज्यांत इस्लामी आक्रमकांनी केलेला अत्याचार नसणारा अभ्यासक्रम बनला.

१६. ‘जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचा’चा उदय !

काही दिवसांनी श्रीमती इंदिरा गांधी आणि मालक यांनी ब्रिटनच्या हैलीबेरी कॉलेजच्या आधारावर ‘जे.एन्.यू.’चा (जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचा) पाया रचला – एक वचनबद्ध नोकरशाही उभी करण्यासाठी ! परिसीमा तेव्हा गाठली गेली, जेव्हा श्रीमती गांधी यांनी सैयद नरूल हसन यांना भारताचे शिक्षणमंत्री केले. हसन यांचे शिक्षण ऑक्सफर्डमध्ये झाले होते. ते एका तालुकदारी घराण्यात जन्मलेले मार्क्सवादी होते. हसन यांच्या राजवटीत केवळ कार्डधारक साम्यवाद्यांनाच ‘जे.एन्.यू’मध्ये प्राध्यापक म्हणून निवडले जायचे. राष्ट्राची संपूर्ण भरतीप्रणाली या साहेबांनी साम्यवादी ‘इकोसिस्टम’मध्ये (इकोसिस्टम म्हणजे राष्ट्रद्वेष्ट्यांनी विरोधी विचारसरणीला शह देण्यासाठी विविध स्तरांवर राबवलेली कार्यप्रणाली) परिवर्तित केली, तीही काही वर्षांतच !

१७. इंदिरा गांधी यांनी ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ हे शब्द राज्यघटनेत घुसडले !

‘वर्ष १९७५ मध्ये इंदिरा गांधी निवडणुकीत घोटाळा करून जिंकल्या’, असा निवाडा अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला. ही बातमी कळताच सत्तेच्या भुकेपोटी इंदिरा गांधी यांनी कुणालाही न विचारता संपूर्ण भारताला अराजकतेत ढकलले. लोकशाहीच्या चिंध्या चिंध्या करतांना नेहरूंच्या मुलीने एखाद्या हुकूमशाहप्रमाणे आणीबाणी घोषित केली. संसद स्थगित करण्यात आली आणि संपूर्ण देश स्वत:च्या हातात घेतला.

इंदिरा यांनी मग घटनाबाह्य पद्धतीने ४२ वी घटनादुरुस्ती संमत केली, जेणेकरून भारतीय राज्यघटनेत दोन निवडक शब्द जोडण्यात आले, ते होते – ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ – पहिला सोव्हिएत रशियाच्या हितात होता आणि दुसरा इंदिरा यांच्या !

१८. देशभरात बांधल्या जाऊ लागल्या मशिदी आणि मदरसे !

हळूहळू काळ लोटला. इराणच्या क्रांतीनंतर संपूर्ण विश्वात इराणने ‘शिया’, तर सौदी अरेबियाने ‘सुन्नी’ इस्लाम यांचा प्रचार करण्यास चालू केले. नेहमीप्रमाणे आमचे ‘साहेब’ इस्लामवाद्यांकडे दुर्लक्ष करत राहिले. ‘पेट्रो डॉलर्स’मध्ये न्हाऊन निघणार्‍या सौदी अर्थव्यवस्थेने भारतातून लक्षावधी मुसलमान कामगारांना बोलावले. तेथील चकचकीत जगाला ‘वहाबी इस्लामचे वैभव’ समजून हे प्रवासी जेव्हा मायदेशी परतत, तेव्हा ते वहाबी मानसिकताही समवेत घेऊन येत. सर्वत्र मशिदी आणि मदरसे बांधले जाऊ लागले. यासमवेतच संघटित गुन्हेगारी आणि ‘डी कंपनी’ (दाऊद इब्राहिम टोळी) उदयास आली.

१९. ब्रिटिशांना शेतीतून महसूल देणार्‍या भारताला ‘हरित क्रांती’ची आवश्यकता होती का ?

लेखक आणि संशोधक श्री. संदीप बाळकृष्ण सांगतात, ‘‘हे एवढे लज्जास्पद आहे की, आपण अमेरिकेकडून कर्ज घेतले आणि तेथून एका अशा भूमीवर दुधाची पावडर आयात केली, जिथे गोपाळाची, अर्थात् गायींचे रक्षक श्रीकृष्णाची पूजा केली जाते ! ‘फोर्ड फाऊंडेशन’ला कंत्राट देण्यात आले, ज्याने ते त्याच्या इतर संस्था आणि मित्र यांना दिले – उदाहरणार्थ चर्च ! चर्चने लहान मुलांना धर्मांतरित करण्यासाठी दुधाचे पॅक आणि दुधाच्या पावडरचा शस्त्रासारखा वापर चालू केला. कुठलेही उदाहरण घ्या. शेतीची थोडीफार दुर्लभता होती आणि दुष्काळसदृश परिस्थिती होती, हे ठीक आहे. तुम्ही मला सांगत आहात की, ब्रिटिशांचा महसूल जो प्रामुख्याने आमच्या शेतीतून येत होता, त्या आम्हा भारताला युरोपीय आणि अमेरिकी लोक यांनी शिकवलेले कृषी धोरण हवे आहे का ?’’ मग काय होणार होते ? कीटकनाशके आणि जनुकीय सुधारित गव्हाच्या आधारावर भारतात ‘हरित क्रांती’ करण्यात आली, पण त्याची किंमत पंजाब आजतागायत चुकवत आहे. (पंजाबमध्ये आजही अनेक लोक कर्करोगामुळे मरत आहेत. याला ‘कॅन्सर एक्सप्रेस’ असेही संबोधिले जाते. हरित क्रांतीत वापरल्या गेलेल्या कीटकनाशकांचाच हा परिणाम असल्याचे स्थानिकांचे मत आहे.)’

(क्रमश: पुढील रविवारी)

(साभार : ‘प्राच्यम्’ हिंदु ओटीटी)


शासनकर्त्यांनी मुसलमानांना मोठे करण्याचा घाट घातला नि कालांतराने हे षड्यंत्र देशावरच उलटले !

प्रतिकात्मक छायाचित्र

‘माजी केंद्रीय माहिती आयुक्त श्री. उदय माहूरकर सांगतात, ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द भारताच्या राज्यघटनेत समाविष्ट करण्यामागे एक रणनीती होती. त्या रणनीतीत जो मुख्य बिंदू होता, तो म्हणजे राष्ट्र्रवादी शक्ती आणि हिंदु आकांक्षा यांना दाबणे. हे शब्द इस्लामवादी आणि साम्यवादी यांच्यासाठी एका शस्त्रासारखे काम करू लागले. या देशात मुसलमान अशा मागण्या करू लागले, ज्या मुसलमान देशांमध्येही होत नाहीत.’

प्रसिद्ध रंगमंच सिद्धांतकार आणि संगीतज्ञ प्रा. भरत गुप्त सांगतात, ‘हे अगदी नग्न सत्य आहे की, तुम्ही लोकांचा (मुसलमानांचा) एक प्रतिगामी वर्ग सिद्ध करता, त्यांना भूतकाळात (धर्मपरंपरांत) अडकवून ठेवता आणि मग म्हणता की, ‘आम्ही तुम्हाला ते कायम ठेवण्यास साहाय्य करू !’ तुम्ही त्यांच्यासाठी मौलवी (इस्लामचे धार्मिक नेते) वर्ग किंवा अन्य शासकवर्ग निर्माण करता, त्यांना खायला घालता, लाभ पोचवता आणि त्यांच्यावर राज्य करता ! मग एक वेळ अशी येते की, हे लोक बंडखोर होतात आणि देशाबाहेरील कुणाचे तरी समर्थन करणे चालू करतात. त्यानंतर हेच तुमचे (सरकारचे नि देशाचे) ‘शत्रू’ बनतात. तुम्ही लक्ष्मणपुरीमधील (उत्तरप्रदेश) छोटा आणि बडा इमामबाडा येथे गेल्यावर काय पहाता ? तेथे आपल्याला इराणचे माजी नेते खोमेनी यांची मोठी छायाचित्रे लटकलेली दिसतात. का ? अशा प्रकारच्या विचारसरणीमुळे मुसलमानांचीच सर्वाधिक हानी झाली आहे. ते जिथे जाऊन स्थायिक होतात, तेथील लोक आणि भूमी यांपासून स्वतःला अलिप्त ठेवतात. ते काळानुसार पालटले नाहीत म्हणून त्यांच्या कुटुंबावर, मुलांच्या व्यवसायावर आणि मुलांच्या वैवाहिक जीवनावर घातक परिणाम झाले आहेत.’  (साभार : ‘प्राच्यम्’ हिंदु ओटीटी)