Goa Shivjayanti Christian Attack : गोव्यात शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी गेलेले मंत्री फळदेसाई यांच्यावर ख्रिस्त्यांचे आक्रमण !

  • गोवा राज्यात शिवजयंतीला गालबोट

  • मंत्री फळदेसाई यांना धर्मांध ख्रिस्त्यांनी घटनास्थळावरून हाकलून लावण्याचा संतापजनक प्रकार !

  • मोठ्या संख्येने पोलीस तैनात

मडगाव – दिनांकानुसार साजरा करण्यात येणार्‍या शिवजयंतीनिमित्त म्हणजे १९ फेब्रुवारी या दिवशी देशभरात उत्साहाचे वातावरण असतांना या उत्सवाला गोव्यात गालबोट लागले. सां जुझे दी आरियल येथील एका खासगी जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करून निघतांना राज्याचे समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्यावर धर्मांध ख्रिस्त्यांनी दगडफेक करून आक्रमण केले. मंत्री फळदेसाई यांना किरकोळ दुखापत झाली आहे. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

छत्रपतींचा पुतळा उभारण्यावर ख्रिस्त्यांचा आक्षेप !

सां जुझे दी आरियल येथे एका मुसलमान व्यक्तीने त्याच्या खासगी जागेत शिवरायांचा पुतळा उभारून त्याचे अनावरण करण्यासाठी मंत्री सुभाष फळदेसाई आले होते. स्थानिक ख्रिस्त्यांनी तेथे शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यावर आक्षेप घेतला होता. (खासगी जागेत पुतळा उभारण्याला ख्रिस्त्यांनी आक्षेप घेण्याचे कारणच काय ? – संपादक) ‘हा पुतळा बेकायदेशीररित्या उभारला आहे’, असाही आरोप ख्रिस्त्यांनी केला आहे. १८ फेब्रुवारीपासूनच तेथील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा तेथे मोठा फौजफाटा उपस्थित होता.

ख्रिस्त्यांच्या या आरोपावरून पंचायतीने पुतळ्याशी संबंधित पुढील काम थांबवण्याची नोटीस काढली आहे, तसेच आवश्यक कागदपत्रे घेऊन पंचायतीत उपस्थित रहाण्यास सांगितले आहे.

मंत्र्यांना घटनास्थळावरून घालवण्याचा प्रयत्न

पुतळ्याचे अनावरण करून निघाल्यावर मंत्री फळदेसाई यांच्यावर मातीचे गोळे फेकण्यात आले. या वेळी पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीमार केला. पोलीस मंत्र्यांना तेथून सुखरूप घेऊन जात असतांना ख्रिस्त्यांकडून टाळ्या वाजवून ‘वूश वूश’ (चालते व्हा) असे म्हणत खिजवत होते. ‘राज्यात धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी या प्रकरणात मी तक्रार करणार नाही’, असे मंत्री फळदेसाई यांनी म्हटले आहे.

ख्रिस्त्यांकडून आक्रमणाची पूर्वसिद्धता

एका वृत्तवाहिनीने प्रसारित केलेल्या व्हिडिओनुसार, घटनास्थळी मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती उपस्थित होते. तेथे उपस्थित अनेक ख्रिस्त्यांनी स्कार्फ, जॅकेट, टोपी आणि हेल्मेट आदी घातलेले दिसत होते. त्यामुळे ‘दगडफेकीच्या सिद्धतेनेच ख्रिस्ती उपस्थित होते’, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

(सौजन्य : Prudent Media Goa)

१८ फेब्रुवारीला मंत्री फळदेसाई यांनी त्या गावाला भेट देऊन खासगी जागी पुतळा उभारला जात असल्याची आणि त्यासाठी ग्रामपंचायतीची अनुमती घेतल्याची माहिती स्थानिक ख्रिस्त्यांना दिली होती. (तरीही त्यावर ख्रिस्त्यांनी त्यावर आक्षेप घेतला, यावरून ख्रिस्त्यांचा शिवरायांविषयीचा द्वेष लक्षात येतो ! – संपादक) ‘तेथील गावकर्‍यांशी मी चर्चाही केली; परंतु कुठलाही निर्णय झाला नाही’, असेही मंत्री फळदेसाई यांनी सांगितले.

हे पूर्वनियोजितच ! – मंत्री सुभाष फळदेसाई

सुभाष फळदेसाई

‘हे आक्रमण पूर्वनियोजितच होते’, असे मला वाटते; कारण पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी मी रस्त्यापासून ३०० मीटर आत गेलो. तेथे अनावरण केले आणि परत येतांना तोंडाला रूमाल बांधलेल्या महिला आणि काही पुरुष यांनी मातीचे गोळे माझ्यावर फेकले. त्यांतील काही लोक ‘त्यांना कुणीतरी मारले आहे’, असे भासवण्याचा प्रयत्न करीत माझ्यासमोर भूमीवर लोळण घेत होते.

त्याच वेळी आजूबाजूला ४-५ जण भ्रमणभाषवर चित्रीकरण करत होते. ‘मी किंवा पोलीस यांच्यापैकी कुणीतरी त्यांना मारत आहोत’, असे दाखवण्याचा ते प्रयत्न करत होते. कुणीतरी शिकवल्याप्रमाणे ते कृती करत होते. नंतर त्यांना त्याचा लाभ मिळवायचा होता. आम्ही तर ४-५ लोक होतो आणि ते २०० ते ३०० लोक होते. आम्ही त्यांना कसे काय मारू शकत होतो ? सर्वांना मी विनंती करतो, की सर्वांनी शांतता बाळगावी.


सरकारने हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करावी ! – प्रा. सुभाष वेलिंगकर

‘पुरातत्व मंत्री सुभाष फळदेसाई हे सां जुझे द आरियल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यास गेले असता त्यांच्यावर ‘शिवराय’विरोधी समाजकंटकांच्या झालेल्या आक्रमणाचा तीव्र निषेध ! सरकारने हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करावी.’

संपादकीय भूमिका 

  • गोवा राज्याला पोर्तुगिजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी छत्रपतींनी प्रयत्न केले. खरे तर, याबद्दल गोमंतकियांच्या मनात त्यांच्याविषयी कृतज्ञता हवी; मात्र गुलामगिरीच्या जोखडात अडकलेले धर्मांध ख्रिस्ती त्यांचा द्वेष करतात. अशा पोर्तुगिजधार्जिण्या धर्मांध ख्रिस्त्यांवर सरकारने कारवाई करणे आवश्यक !
  • मंत्र्यांवर आक्रमण करण्याइतपत उद्दाम झालेले गोवा राज्यातील ख्रिस्ती ! या आक्रमणामागील खरा सूत्रधार कोण आहे, हे शोधून सरकारने सत्य समोर आणणे आवश्यक !