Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश

उधमसिंह नगर (उत्तराखंड) – येथील खतिमा भागातील कुटरी गावात थारू जमातीच्या लोकांची सनातन धर्मात परतण्याची प्रक्रिया चालूच आहे. येथे ख्रिस्ती पंथ स्वीकारलेल्या थारू समाजाच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांनी वैदिक परंपरानुसार स्वतःच्या इच्छेने सनातन धर्मात पुनर्प्रवेश केला. यापूर्वी याच गावातील ७० लोकांनी पुनर्प्रवेश केला होता. हा कार्यक्रम ग्रामप्रधान दीपा देवी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. या वेळी पंडित हरीश जोशी आणि साधू मोहन गिरी यांनी वैदिक मंत्रोच्चारात शुद्धीकरण हवन आणि यज्ञ केला.

१० ते १२ वर्षांपूर्वी झाले होते धर्मांतर

स्थानिक लोकांच्या मते, १० ते १२ वर्षांपूर्वी गावातील अनेक थारू कुटुंबांना आमीष दाखवून किंवा फसवून त्यांचे धर्मांतर करण्यात आले होते. यानंतर ते नियमितपणे प्रार्थना सभांमध्ये सहभागी होऊ लागले, ख्रिस्ती पुस्तके वाचू लागले आणि गळ्यात क्रॉस घालू लागले. तसेच त्यांनी हिंदु देवतांची पूजा करणे, टिळा, चंदन लावणे आणि प्रसाद घेणेही बंद केले होते. आता या लोकांनी स्वतःहून पुढे येत सनातन धर्मात परतण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी परिसरातील इतर लोकांनाही कुणाच्याही आमिषाला बळी पडून धर्मांतर न करण्याचे आणि स्वतःच्या सांस्कृतिक वारशाशी जोडलेले रहाण्याचे आवाहन केले.

संपादकीय भूमिका

भारत हिंदु राष्ट्र झाल्यावर जे पूर्वी बळाने आणि आमिषामुळे धर्मांतरित झाले आहेत, त्यांना हिंदु धर्मांत आणण्यासाठी देशस्तरावर प्रयत्न केले जातील !