साजिद सरगुरो आणि मुराद अडरेकर यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून समाजात द्वेष पसरवला !

नगरसेवक निहार कोवळे यांची चिपळूण पोलिसांत तक्रार

निहार कोवळे

चिपळूण, १९ जुलै (वार्ताहर) – नाशिक येथील टी.सी.एस्.या कॉर्पोरेट आस्थापनातील हिंदु तरुणींचे अवैध धर्मांतर करण्याचा कट पोलिसांनी उघडकीस आणल्यानंतर कोकणातील हिंदु मुलींमध्ये जनजागृती करण्यासाठी येथील ‘इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रा’त ८ जून २०२६ या दिवशी ‘कॉर्पोरेट जिहाद’ या विषयावर एका संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात येथील नगरसेवक आणि पाणी पुरवठा सभापती निहार कोवळे यांनी लव्ह जिहाद, तरुणींचे होणारे मानसिक आणि शारीरिक शोषण, तसेच गड-किल्ल्यांचे होणारे विद्रुपीकरण याविरोधात परखड भाष्य केले होते.

तथापि माझ्या या वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास करून समाजात द्वेष पसरवल्याप्रकरणी नगरसेवक साजिद सरगुरो आणि मुराद अडरेकर यांच्यावर गुन्हा नोंद करावा, अशी लेखी तक्रार निहार कोवळे यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात दिली आहे.

सभापती निहार कोवळे यांनी त्यांच्या तक्रार अर्जात म्हटले आहे की,

१. विरोधकांचे आरोप कपोलकल्पित आणि राजकीय सूडबुद्धीचे !

नगरसेवक साजिद सरगुरो यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात दिलेल्या लेखी तक्रारीत माझ्या तोंडी ‘चिपळूणमध्ये एखाद्या मुसलमान मुलाची खांडोळी करून टाकूया, म्हणजे सर्व मुसलमान सरळ होतील’ अशी विधाने घातली आहेत. हे आरोप पूर्णपणे खोटे, कपोलकल्पित आणि राजकीय सूडबुद्धीने प्रेरित आहेत.

तसेच दुसरे तक्रारदार मुराद अडरेकर (रा. खडपोली) यांनी त्यांच्या तक्रारीत ‘दादर मोहल्ला ते गोवळकोटपर्यंत खांडोळी करू’ असे मी बोलल्याचा धादांत खोटा उल्लेख केला आहे. अशी कोणतीही विधाने माझ्याकडून करण्यात आलेली नाहीत,

२. सामाजिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न आणि अपकीर्तीचे षड्यंत्र !

हा कार्यक्रम होऊन ४० दिवस उलटले आहेत. या काळात मी लोकप्रतिनिधी म्हणून समाजात फिरत असून कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही; मात्र साजिद सरगुरो आणि मुराद अडरेकर हे वृत्तवाहिन्यांवरील मुलाखती आणि सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून माझ्या अपकीर्तीचे (बदनामीचे) आणि समाजाला भडकवण्याचे सुनियोजित षड्यंत्र रचत आहेत.

३. निहार कोवळे यांनी ८ जूनला कार्यक्रमात नेमके व्यक्त केलेले मनोगत !

हिंदु मुलींना एका सुनियोजित षड्यंत्राद्वारे, तसेच लव्ह जिहादच्या माध्यमातून त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे जीवन उद्ध्वस्त केले जाते. मुलींच्या मानसिकतेचा, वयाचा आणि अज्ञानाचा गैरलाभ उठवला जात आहे.

हर्णे येथील गडावर मुसलमान युवक दारू पितात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र गडाला अपवित्र करतात. त्यांना तसे न करण्याविषयी सांगणार्‍या २ हिंदु मुलांना मारहाण करण्यासाठी मुसलमान समाजातील २५/३० लोक एकत्र येऊन त्यांच्या हत्येचा प्रयत्न करतात. या गुन्ह्यातील आरोपींवर बी.एन्.एस्. १०९ अंतर्गत गुन्हा नोंद झालेला आहे. अशा वेळी कायदाही स्वसंरक्षण करण्याचा अधिकार देतो. माझ्यावर कुणी विनाकारण जिवे मारण्यासाठी आक्रमण करत असेल, तर माझ्यासारखे मार खाणार नाहीत, मी त्याचा प्रतिकार करणारच.

४. पोलिसांकडे कडक कारवाईची मागणी

मी लोकप्रतिनिधी असून माझे समाजात सामाजिक आणि व्यावसायिक हितसंबंध आहेत. या अपकीर्तीमुळे माझी सामाजिक, व्यावसायिक आणि आर्थिक हानी झाली असून, सामाजिक माध्यमांवरून पोलीस कारवाईच्या संदर्भातील चुकीची पत्रे पसरवून समाजात भीती आणि द्वेष पसरवण्याचे काम चालू आहे. त्यामुळे खोटे आरोप करून सामाजिक सलोखा बिघडवणार्‍या साजिद सरगुरो आणि मुराद अडरेकर यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंद करावा, अशी मागणी आहे.