श्रीराममंदिर लोकार्पणाचे निमंत्रण नाकारून काँग्रेसकडून हिंदूंच्या श्रद्धेची कुचेष्टा ! – विजय जाधव, जिल्हाध्यक्ष, भाजप

कोल्हापूर – संपूर्ण भारतवासियांचे श्रद्धास्थान आणि भारताच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असलेल्या प्रभु श्रीरामचंद्रांच्या भव्य मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे आणि प्रभु रामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा मुहूर्ताचे निमंत्रण नाकारून काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांची हिंदुविरोधी मानसिकता उघड केली आहे. असे करून काँग्रेसने कोट्यवधी भारतियांच्या भावनांचा अपमान केला आहे, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

या पत्रकात पुढे म्हणले आहे की, मुसलमान अनुनयाचा वारसा घेऊन हिंदुद्वेषाच्या राजकारणापोटी श्रीराम जन्मभूमीमुक्ती आंदोलनाची थट्टा करणार्‍या आणि निमंत्रण नाकारणार्‍या काँग्रेसला येत्या निवडणुकीत जनता नाकारेल. न्यायालयासमोर प्रभु श्रीरामचंद्राचे अस्तित्वच नाकारून श्रीराम जन्मभूमीमुक्ती आंदोलनाच्या ६ शतकांच्या संघर्षास अपशकुन करू पहाणार्‍या काँग्रेसकडून दुसरी अपेक्षा नव्हतीच; पण हिंदु समाजाच्या या प्रदीर्घ संघर्षाला मिळालेल्या यशामुळे पोटदुखी चालू झालेल्या काँग्रेसने हिंदूंच्या आराध्य दैवताच्या मंदिराचे राजकारण करावे, हे दुर्दैवी आहे.

संपादकीय भूमिका 

देशातील प्रमुख श्रद्धास्थानांना नाकारणार्‍या काँग्रेसला आता जनतेने तिची जागा दाखवून द्यावी !