रत्नागिरीत गीता जयंती कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद

रत्नागिरी – गीता जयंतीनिमित्त २२ डिसेंबरला गीता भवन येथे गीता मंडळ, नारायणी पठण मंडळ, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, स्वानंद पठण मंडळ, कवीकुलगुरु कालिदास विश्वविद्यालय रत्नागिरी उपकेंद्र, संस्कृत भारती अशा ६ संस्थांनी एकत्र येत संपूर्ण श्रीमद्भगवद्गीता पारायण केले. सकाळी ४ तास चाललेल्या या पारायणात १२५ हून अधिक महिला, पुरुष, विद्यार्थी, ज्येष्ठांनी सहभाग घेतला. श्रीकृष्णाच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.

व्यासपिठावर गीता मंडळाचे विश्वस्त अधिवक्ता मिलिंद पिलणकर, नारायणी पठण मंडळाच्या ज्येष्ठ सदस्य सौ. उज्ज्वला पटवर्धन, स्वानंद पठण मंडळाच्या प्रमुख अश्विनी जोशी, कवीकुलगुरु कालिदास विश्वविद्यालय, डॉ. पां.वा. काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय संस्कृत विभागप्रमुख तथा समन्वयक डॉ. कल्पना आठल्ये आणि संस्कृत भारतीचे अधिवक्ता आशिष आठवले आदी व्यासपिठावर उपस्थित होते.

याप्रसंगी अभ्यासिका प्रा. अंजली बर्वे म्हणाल्या की, भगवद्गीता युवा पिढीने वाचायला हवी. गीतेचा प्रसार कलियुगात कसा करू ? याचा विचार केला पाहिजे. गीता ही गंगेपेक्षा पवित्र आहे; कारण ती साक्षात् भगवान श्रीकृष्णाच्या मुखकमलातून आली आहे. जीवनात आनंद, समाधान आणि शांती देण्यासाठी गीता पठण करा. याचे महत्त्व पटवून देता आले, तर अधिकाधिक लोक गीतापठणाकडे वळतील. गीतेतील तत्त्वचिंतन आचरणात आणि जीवनात कसे येईल ? याकरता प्रयत्न करावेत.

डॉ. दिनकर मराठे म्हणाले की, गीताजयंतीला आज ५ सहस्र १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. भगवद्गीतेवर प्रादेशिक भाषांमध्ये २००० हून अधिक टीका लिहिल्या आहेत. वेद अध्यायनासाठी पूर्वसिद्धता लागते; परंतु गीताभ्यासात लहान मुलांपासून महिला, ज्येष्ठांपर्यंत कुणीही प्रवेश घेऊ शकतो. आपापल्या शक्तीनुसार गीतेचा अर्थ कळतो. गीतेचे अध्ययन म्हणजे सर्व शास्त्रांचे अध्ययन होय. त्यामुळे संस्कृतीचे स्वरूप, संस्कारांचे ज्ञान मिळते. व्यावहारिक ज्ञान मिळते.

अधिवक्ता मिलिंद पिलणकर यांनी सांगितले की, अर्जुन गोंधळलेला होता का ?त्याकरता ७०० श्लोकांच्या गीतेतून श्रीकृष्णाने सांगितले आहे; परंतु गीता आपल्या मनुष्य जन्मासाठी अत्यंत आवश्यक आहे. गीतेच्या अभ्यासातून आपले जीवन समृद्ध करूया.