देशातील साम्यवादी विषवल्ली हीच राममंदिराच्या विरोधात आहे ! – वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति

‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि

‘नुकतेच ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांनी एका कार्यक्रमात ‘राममंदिराला उपद्रव पोचवण्याचे ‘तुकडे तुकडे’ गँगचे (देशाचे तुकडे करू पहाणारी टोळी) मनसुबे आहेत’, असे म्हटले.

वैद्य परीक्षित शेवडे

‘‘तुकडे तुकडे गँग म्हणजे ते लोक जे मुखाने राज्यघटनेचा जप करतात; पण मनात मात्र कायदा सुव्यवस्थेची अजिबात चाड नसते. देशात अराजक निर्माण करायचे असते. वरवर निधर्मी; पण आतून धर्मांध असलेले ‘जमात ए पुरोगामी’, म्हणजेच तुकडे गँग. प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांसारख्या अधिकारी व्यक्तींनी केलेले विधान हलक्यात घेण्याजोगे नाही. देशातील साम्यवादी विषवल्ली हीच राममंदिराच्या विरोधात आहे. जनता ते न्यायालय या सगळ्यांची दिशाभूल साम्यवाद्यांनी कशी केली, याचे सप्रमाण वर्णन आम्ही ‘राममंदिरच का ?’, या पुस्तकात केलेले आहे. राममंदिराचा प्रश्न हा वर्ष १९९२ पासूनचा असल्याचे काही मंडळींना भासवायचे आहे. प्रत्यक्षात हा प्रश्न काही शतके जुना आहे. या संघर्षात शीख योद्धे, नागा साधू आणि कारसेवक यांनी स्वतःचे रक्त सांडले आहे. आज सनदशीर मार्गाने हा प्रश्न हिंदूंच्या बाजूने सुटला आहे. हा आनंदाचा क्षण असला, तरीही बलीदान कदापि विसरू नये. राममंदिर हा केवळ व्यक्तीगत श्रद्धेचा नाही, तर देशाच्या अस्मितेचा मुद्दा आहे.’’

परकीय आक्रमकांनी सहस्रो मंदिरे उद्ध्वस्त केली. असे असले, तरी हिंदु मनाचे जे मानबिंदू, म्हणजेच अयोध्या, काशी आणि मथुरा ही तिन्ही मंदिरे परकीय आक्रमणांच्या व्रणांपासून मुक्त व्हावीत ! अलाहबाद उच्च न्यायालयाने मथुरेतील कृष्णजन्मभूमीच्या सर्वेक्षणासाठी मान्यता दिली आहे. ‘अयोध्या बस झांकी है। काशी, मथुरा बाकी है।’

(वैद्य परीक्षित शेवडे यांच्या फेसबुक पेजवरून साभार)