दिवाळीत प्रचंड उलाढाल करणारी ‘सनातन इकॉनॉमी’ (अर्थव्यवस्था) !

हिंदूंच्या सणांमध्ये मोठ्या प्रमाणात चैतन्य अनुभवायला मिळते. सर्वांचाच आनंद ओसंडून वहात असतो. स्त्रीशक्तीची लगबग चालू असते, मुलांसह वयस्करांमध्येही उत्साह असतो. सर्वजण पारंपरिक पद्धतीने सण साजरे करतात. त्यातून आनंद मिळवतात आणि इतरांनाही तो देतात. यंदाच्या दिवाळीला भारतियांनी काही लक्ष कोटी रुपयांची उलाढाल केली. यावरून हिंदूंच्या सणांचे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये किती मोठे योगदान आहे, हे अधोरेखित होते.

१. चैतन्य आणि आनंदमयी वातावरणामध्ये साजरे होणारे हिंदूंचे सण !

हिंदु नववर्ष, म्हणजेच गुढीपाडव्याला वसंत ऋतू असतो. त्या वेळी वृक्षवेलींना नवीन पालवी फुटते. त्यामुळे सृष्टीत टवटवीतपणा येतो. या दिवशी ब्रह्मदेवाने पृथ्वीची निर्मिती केली होती. हिंदूंसाठी हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो. त्यामुळे सगळीकडे उत्साह असतो. काही दिवसांनी श्रावण मास येतो. श्रावणातील व्रतवैकल्ये आणि भक्ती करण्यासाठी महिला-पुरुष आतुर असतात. तरुणाई श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी यांमध्ये डुंबून गेलेली असते. गणेशचतुर्थी सार्वजनिक पद्धतीने साजरी करण्यात येते.

मग येते नवरात्र ! नवरात्रीमध्ये भक्तीच्या स्तरावर वेगळाच अनुभव येतो. बंगालमध्ये किंवा अन्य राज्यांमध्ये दुर्गापूजा किंवा शक्तीची आराधना करण्यात येते. दसर्‍यालाही उत्साहाला तोटा नसतो. अनेक मोठ्या शहरांमध्ये रामलीला साकारण्यात येते. प्रभु श्रीरामचंद्राने रावणावर मिळवलेला विजय आणि शक्तीने महिषासुराचा केलेला वध, अशी विविध कारणे या सणांना आहेत.

दिवाळी म्हटल्यावर तर विचारूच नका ! महाराष्ट्र आणि इतर काही राज्यांमध्ये ५ दिवस हा सण साजरा केला जातो. हा सण वसुबारस, धनत्रयोदशी, चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज ते कार्तिकी एकादशीपर्यंत मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. संक्रांत, होळी, रंगपंचमी हेही वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरे होतात.

२. हिंदूंच्या सणांच्या वेळी पुरोगाम्यांचा कांगावा !

हिंदूंचे सण आले की, पुरोगामी बोटे मोडणे चालू करतात. हिंदूंच्या सणांना गालबोट लावण्यासाठी विविध कारणे शोधली जातात. ‘पर्यावरणाचा र्‍हास होतो’, ‘सणावारावर पैसा व्यय करण्याऐवजी तो निराधार लोकांना वाटा’, असे फुकाचे सल्ले त्यांच्याकडून दिले जातात.

३. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वदेशी वस्तू खरेदी करण्याच्या आवाहनाला भारतियांचा उदंड प्रतिसाद !

दिवाळीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतियांना ‘सण साजरे करतांना ‘लोकल फॉर व्होकल’ किंवा ‘आत्मनिर्भर भारत’ यांच्याकडे लक्ष ठेवा’, असे सांगितले. भारतीय उत्पादक, कलाकार, व्यापारी आणि विक्रेते यांच्याकडूनच वस्तू खरेदी करा. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था बलवान होईल, असे आवाहन ते पंतप्रधान झाल्यापासून करत असतात. त्याला भारतियांचा पुष्कळ प्रतिसाद मिळतो. यात पंतप्रधानांचा प्रामाणिकपणा, तळमळ आणि देशप्रेम दिसून येते, तसेच त्यामागे भारतीय अर्थव्यवस्थेने उभारी घेऊन भारतीय शेतकरी आणि साधारण विक्रेते सधन व्हावे, हा हेतू आहे. त्यांनी दिवाळीपूर्वी असे आवाहन केले होते. या दिवाळीला त्याचा परिणाम दिसून आला. भारतियांनी स्वदेशी कलाकार आणि व्यापारी यांनी उत्पादित केलेल्या वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या अन् चिनी बाजारपेठेला नाकारले.

४. ‘सनातन इकॉनॉमी’ची प्रचंड आर्थिक उलाढाल !

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

‘कॉन्फिडिरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’चे अध्यक्ष बी.सी. भारतीय आणि सचिव प्रवीण खंडेलवाल यांनी दिवाळीच्या काळात झालेली खरेदी-विक्री यांच्या संदर्भात महत्त्वाचे निवेदन केले. ते म्हणतात की, यावर्षी ३ लाख ७५ सहस्र कोटी रुपयांची उलाढाल झाली. काही व्यापार्‍यांच्या मते ही आर्थिक उलाढाल १ लाख २५ सहस्र कोटी रुपयांची आहे. ही भारतीय ‘जीडीपी’च्या (सकल देशांतर्गत उत्पादनाच्या) २० टक्के ते ३० टक्के इतकी असून १०० देशांच्या ‘जीडीपी’इतकी आहे.

‘भारतियांनी दिवाळीच्या काळात केलेली खरेदी आणि त्यातून झालेली आर्थिक उलाढाल ही १०० देशांच्या वार्षिक ‘जीडीपी’शी तुलना करते’, असेही त्यांनी नमूद केले. या सणानिमित्त झालेल्या उलाढालीमुळे व्यापारी वर्ग आनंदी आहे. त्यांनी या उलाढालीला ‘सनातन इकॉनॉमी’ असे नाव दिले आहे. या उलाढालीविषयी व्यापारी वर्गाने ‘निफ्टी’ आणि ‘बाँबे स्टॉक एक्सचेंज’ यांचा संदर्भ देऊन सांगितले की, वर्ष २०२२ ची दिवाळी ते विक्रम संवत्सर २०७९ म्हणतात, त्यापासून वर्ष २०२३ ची दिवाळी, म्हणजे २०८० विक्रम संवत्सर यात गुंतवणूकदारांच्या उत्पन्नात ६४ लाख कोटी रुपयांचा लाभ झाला.

५. चीनचा किमान १ लाख कोटी रुपयांचा तोटा

मागील २-३ वर्षांमध्ये हिंदूंनी चीनसारख्या मस्तवाल देशांना वठणीवर आणले. काही वर्षांपूर्वी दिवाळीच्या काळात ७० टक्के चिनी बनावटीचे साहित्य आणि वस्तू खरेदी केल्या जात होत्या. प्रवीण खंडेलवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा भारतियांनी भारतीय उत्पादने मोठ्या प्रमाणात खरेदी केली. त्यामुळे चीनचा किमान १ लाख कोटी रुपयांचा तोटा झाला. कार्तिक मासाच्या पौर्णिमेपर्यंत ही आर्थिक उलाढाल ४ लाख २५ सहस्र कोटी रुपयांपर्यंत जाईल.

खंडेलवाल पुढे म्हणाले की, हिंदूंची १० लाख मंदिरे आहेत. या काळात मंदिरांतही मोठ्या प्रमाणात अर्पण गोळा होते. तसेच मंदिराच्या परिसरात व्यवसाय करणार्‍या व्यापारी वर्गालाही मोठा लाभ होतो. हे होत असतांना या ‘सनातन इकॉनॉमी’चा हिंदूंसह अन्य पंथीयही लाभ घेतात. अनेकांचा उदरनिर्वाह हिंदूंच्या सणावर अवलंबून असतो. असे असतांनाही हिंदूंचे सण आले की, पुरोगामी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना विरोध करतात. ते देवासाठी व्यय करणारा पैसा गरिबांना वाटायला सांगतात. अशा प्रकारे नानाविध फुकाचे सल्ले ते देतात. यासमवेतच हिंदूंच्या सणांमुळे प्रदूषण होत असल्याची ओरड करतात.

६. हिंदूंच्या सण-उत्सवांवरील धर्मांधांची आक्रमणे थांबवण्यासाठी हिंदूंचा धर्माभिमान जागृत होणे आवश्यक !

धर्मांध हिंदूंच्या सणांमधून प्रचंड पैसा कमावतात; पण तेच गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी, दुर्गामातेच्या विसर्जनाच्या वेळी, तसेच रामनवमीच्या मिरवणुकांवर दगडफेक करून आक्रमण करतात आणि दंगली घडवतात. हे गेली ७५ वर्षे चालू आहे. हिंदूंनी चीनलाही वठणीवर आणले आहे. त्यामुळे धर्मांधांनी लक्षात ठेवावे की, सनातनी हिंदू एखादी गोष्ट ठरवतात, तेव्हा त्याचे तंतोतंत पालन करतात. त्याचा परिणाम समोरच्याला भोगावा लागतो. त्यामुळे हिंदूंनी ठरवले, तर ते अन्य पंथियांनाही चीनसारखे वाठणीवर आणू शकतात. केवळ त्यांच्यातील धर्माभिमान जागृत करण्याची आवश्यकता आहे.

श्रीकृष्णार्पणमस्तु ।’

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (१९.१०.२०२३)

संपादकीय भूमिका 

दिवाळीत भारतियांनी चिनी मालावर टाकलेला बहिष्कार, हा राष्ट्रऐक्याचा आविष्कार !