गुरांची अवैध वाहतूक करणार्‍या आरोपींवर कठोर कारवाई करा !

लांजा येथील बजरंग दल आणि हिंदु राष्ट्र सेना यांचे पोलीस प्रशासनाला निवेदन

लांजा – ५ नोव्हेंबर या दिवशी साखरपा दूरक्षेत्र येथे पाळीव गुरांची वाहतूक करणारी पीकअप गाडी क्र. MH-१०-Z-८८६७ पकडण्यात आली. ही गाडी पकडण्यासाठी लांजा येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाला साहाय्य केले. पाली येथून कोल्हापूरच्या दिशेने जाणार्‍या या गाडीमध्ये ६ पाळीव जनावरे वेड्यावाकड्या पद्धतीने कोंबण्यात आली होती. ही अवैध गुरांची वाहतूक अल्ताफ नामक चालक कत्तलीच्या हेतूने करत होता. या घटनेची माहिती मिळताच देवरुख पोलीस निरीक्षक प्रदीप पवार साखरपा दूरक्षेत्र येथे आले आणि त्यांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवला. या घटनेचे पुढील अन्वेषण पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे.


या वेळी लांजा येथील बजरंग दल आणि हिंदु राष्ट्र सेनेच्या वतीने आरोपींवर कडक कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु राष्ट्र सेनेचे प्रणित दुधाने, श्रेयस शेट्ये, सचिन कदम, मंगेश शिंदे उपस्थित होते.

यापूर्वीही हिंदु राष्ट सेनेच्या वतीने अवैध वाहतूक करणार्‍या गाड्या पकडण्यात आल्या होत्या. त्या वेळीही संघटनेकडून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी भूमिका घेण्यात आली होती. त्यामुळे आता या आरोपीवर कशा प्रकारे कार्यवाही होते ? हे पहाणे महत्त्वाचे ठरेल, ज्यामुळे अवैध गुरांच्या वाहतुकीला चाप बसेल, असे कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे.
पकडलेल्या गुराची व्यवस्था श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरी, गोसेवा संघ यांचा मार्फत  करण्यात आली. 

संपादकीय भूमिका

असे निवेदन पोलिसांना का द्यावे लागते ? पोलीस स्वत:हून आरोपींवर कठोर कारवाईसाठी प्रयत्न कधी करणार ?