सिंधुदुर्ग : नरकासुर प्रतिमा स्पर्धेवर बंदी घालण्याची वेंगुर्ला येथील नागरिकांची मागणी

नगरपरिषद प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांना दिले निवेदन

‘विकृत आणि विद्रूप’ स्पर्धेवर बंदी घालावी

वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) : नरकासुररूपी दैत्याचा वध केलेल्या भगवान श्रीकृष्णाचा जयजयकार करण्याऐवजी नरकासुररूपी दैत्यालाच देव करणार्‍या आणि प्रतिवर्षी वाढत चाललेल्या ‘नरकासुर प्रतिमा स्पर्धा’ या विकृतीला आमचा विरोध आहे. तरुण पिढीला संस्कृतीपासून आणि भविष्यापासून भरकटवणार्‍या या ‘विकृत आणि विद्रूप’ स्पर्धेवर आपल्या कार्यकक्षेतील नियमांचे पालन करून बंदी घालावी आणि संस्कृती अन् तरुण पिढी यांना वाचवावे, अशी मागणी ३ नोव्हेंबर या दिवशी शहरातील नागरिकांनी वेंगुर्ला नगरपरिषद प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदन देतांना सुहास मांजरेकर, उमेश वेंगुर्लेकर, पंकज शिरसाट, भाई मालवणकर, सुदेश वेंगुर्लेकर, शिरी जाधव आणि अन्य नागरिक

या निवेदनात म्हटले आहे की,

१. हिंदु संस्कृतीतील सणांमध्ये प्रमुख मानल्या गेलेल्या अंध:कारातून प्रकाशाकडे नेणार्‍या तेजोमय दिवाळीसारख्या सणाला काही विकृत लोकांकडून राक्षसी प्रवृत्तीच्या नरकासुर प्रतिमा स्पर्धा भरवल्या जातात. याद्वारे तरुण पिढीला हिंदु संस्कृतीपासून भरकटवण्याचे आणि तरुण पिढीला चुकीच्या मार्गावर नेण्याचे प्रयत्न चालू आहेत.

२. अशा प्रकारांमुळे राक्षसी प्रवृत्ती वाढीस लागण्याचा प्रकार वाढू लागला आहे. या स्पर्धेत भाग घेणारे तरुण आणि लहान मुलेही नरकासुराची प्रतिमा बनवण्यासाठी शहरात फिरून वर्गणी गोळा करतात.

३. नरकासुराच्या प्रतिमा स्पर्धेच्या ठिकाणी नेतात आणि स्पर्धेत त्यांनी सिद्ध केलेल्या नरकासुराच्या प्रतिमेस पारितोषिक मिळाले नाही, तर परीक्षकांना दमदाटी करतात, प्रसंगी मारहाणही केली जाते. मंडळांमध्ये हाणामार्‍या होतात आणि यातून निर्माण झालेले शत्रुत्व कायम रहाते.

४. दिवाळीच्या आदल्या दिवशी रात्रभर डी.जे. सारखी कर्णकर्कश वाद्ये लावून शहरभर मिरवणूक काढण्यात येते. मद्यप्राशन करणार्‍या तरुणांकडून वाहतुकीस अडथळा करण्यात येतो. तेथेही वाद होतात. पहाटे या प्रतिमा शहरातील चौकाचौकात आणि भर रस्त्यांवर जाळल्या जातात.

यातून काही दुर्घटना घडतात. सकाळी संपूर्ण शहरभर या जळलेल्या प्रतिमांचे अवशेष रस्त्यावर विखुरलेले असतात. यात सहभागी सर्व तरुण आणि लहान मुले जाऊन झोपतात, ती थेट दुसर्‍या दिवशी दुपारी उठतात.

५. दीपावलीच्या पहिल्या दिवशी सकाळी उठून अभ्यंगस्नान करून नवीन कपडे परीधान करून देवदर्शन करणे आणि थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेऊन घरात फराळ करून आनंद घ्यायचा असतो, तेव्हा ही मंडळी झोपलेली असतात.