छत्रपती संभाजीनगर येथे रस्‍ता करण्‍यासाठी साचलेल्‍या गढूळ पाण्‍यात लोटांगण घालून नागरिकांचे आंदोलन !

नागरिकांचा तीव्र संताप !

छत्रपती संभाजीनगर – शहरातील सातारा देवळाई भागातील बीड बायपास आणि बंबाटनगर भागातील अनेक वसाहतींत रस्‍त्‍यांची सुविधा नाही. या भागातील नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे रस्‍त्‍याची मागणी केली; पण प्रशासनाने त्‍याकडे लक्ष दिले नाही. प्रशासनाच्‍या या दुर्लक्षामुळे संतप्‍त नागरिकांनी पावसाच्‍या साचलेल्‍या डबक्‍यात उतरून आंदोलन केले. काही पुरुषांनी साचलेल्‍या पाण्‍यात ठिय्‍या मांडला, तर काहींनी थेट पाण्‍यात लोटांगण घालून स्‍वतःचा संताप व्‍यक्‍त केला. या वेळी या नागरिकांनी प्रशासनाच्‍या विरोधात घोषणा दिल्‍या.

श्री गणेशमूर्तींची विटंबना झाली, तर उत्तरदायी कोण ?

आम्‍हाला श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्‍यासही मोठी अडचण येते. दुर्दैवाने रस्‍त्‍याअभावी मूर्ती पडून विटंबना झाली, तर त्‍याला उत्तरदायी कोण ? असा प्रश्‍नही आंदोलकांनी उपस्‍थित केला आहे.

संपादकीय भूमिका

स्‍वातंत्र्याच्‍या ७६ वर्षांनंतरही रस्‍त्‍याच्‍या मागणीसाठी नागरिकांना संतप्‍त आंदोलन करावे लागणे दुर्दैवी !

नागरिकांना अशी आंदोलने का करावी लागतात ? मतदारसंघातील नगरसेवक आणि प्रशासन यांना ही समस्‍या दिसत नाही का ? स्‍वतःहून नागरिकांच्‍या समस्‍यांकडे लक्ष देऊन त्‍या न सोडवणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांवर कठोर कारवाई केली पाहिजे !