भाजपचे खासदार रमेश बिधूडी यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मागितली क्षमा !

बिधूडी यांनी लोकसभेमध्ये बसपचे खासदार दानिश अली यांच्या विरोधात केले होते वक्तव्य !

नवी देहली – केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेमध्ये भाजपचे देहली येथील खासदार रमेश बिधूडी यांच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून क्षमा मागितली आहे. २१ सप्टेंबर या दिवशी ‘चंद्रयान-३’च्या विषयावर संसदेत चर्चा चालू असतांना बिधूडी यांनी बसपचे खासदार दानिश अली यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यावरून अध्यक्ष ओम बिर्ला यांनी चेतावणी देऊन सभ्य भाषेचा उपयोग करण्यास सांगितले. तसेच विरोधकांनीही गदारोळ केला. यावरून राजनाथ सिंह यांनी २२ सप्टेंबर या दिवशी संसदेमध्ये क्षमायाचना केली. बिधूडी यांनी केलेले वक्तव्य लोकसभेच्या कामाजातून काढून टाकण्यात आले.

  • नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांची गरळओक !

  • (म्हणे) ‘भाजपच्या खासदाराने मुसलमानांना ‘आतंकवादी’ म्हटल्यावरून भाजपशी संबंधित मुसलमानांना लाज कशी वाटत नाही ?’

पाकिस्तानचे समर्थन करणार्‍या आणि जिहादी आतंकवाद्यांना पाठीशी घालणार्‍या अब्दुल्ला यांना लाज कशी वाटत नाही, हे त्यांनी आधी सांगितले पाहिजे !-संपादकीय भूमिका

बिधूडी यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी बिधूडी यांच्या निलंबनाची मागणी केली होती, तर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले की, जर बिधूडी यांनी अली यांना ‘आतंकवादी’ म्हणून संबोधले आहे, तरी त्यात काही नवीन नाही. आम्हाला याची सवय झाली आहे. या शब्दांचा प्रयोग सर्व मुसलमान समुदायाच्या विरोधात केला जातो. मला हे कळत नाही की, भाजपशी संबंधित मुसलमान हे कसे सहन करू शकतात ? यावरून तेही आमच्याविषयी कसा विचार करतात, हे लक्षात येते. त्यांना याची लाज वाटली पाहिजे !