कॅनडामध्ये वर्षभरात भारतविरोधी १५ घटना घडूनही एकालाही अटक नाही !

कॅनडातील भारतीय वंशाच्या नागरिकांची ट्रुडो सरकारवर टीका

टोरंटो (कॅनडा) – कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी आतंकवादी निज्जर याच्या हत्येमध्ये भारताचा हात असल्याच्या केलेल्या दाव्यावर कॅनडामध्ये रहात असलेल्या भारतीय वंशांच्या लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. भारतीय वंशांच्या नागरिकांनी म्हटले की, ट्रुडो यांचा आरोप हास्यास्पद आहे. वर्षभरात कॅनडामध्ये भारतविरोधी १५ घटना घडल्या आहेत. त्यामध्ये ९ भारतविरोधी सभा, खलिस्तानच्या समर्थनार्थ २ ठिकाणी सार्वमत घेतल्याच्या घटना आणि ४ मंदिरांवरील आक्रमणे या घटनांचा समावेश आहे. ट्रुडो सरकारने एकाही प्रकरणात कुणालाही अटक केलेली नाही.

१. कॅनडातील ब्रॅम्पटन शहरातील अक्षय गर्ग यांनी म्हटले की, ट्रुडो यांनी भारतावर आरोप केला; पण स्वत:च्या सरकारची कामे पाहिली नाहीत.

२. इटोबिकोक येथील अश्‍विनी शर्मा म्हणाल्या की, येथे भारताच्या विरोधात घडलेल्या घटनांचे व्हिडिओ पोलिसांना सोपवले जातात; पण पोलिसांना एकही आरोपी सापडत नाही. आता खलिस्तानी निज्जर याच्या हत्येच्या ३ मासांतच कॅनडाला मोठे पुरावे मिळाले आहेत. हे कसे शक्य आहे ?

३. ओंटारियो येथील एका शीख युवकाने म्हटले की, काही लोकांमुळे आमच्या संपूर्ण समाजाचा अपमान होतो. येथील ट्रूडो सरकार मूग गिळून गप्प आहे. पंतप्रधान ट्रुडो दुर्बल नेते आहेत. त्यांच्या प्रसिद्धीचे मानांकन केवळ ३० टक्के आहे. खलिस्तान समर्थक जगमीत धालीवाल याच्या पक्षाच्या समर्थनाखाली ते सरकार चालवत आहेत. खलिस्तान्यांना खुश करत स्वतःची खुर्ची वाचवत आहेत.

संपादकीय भूमिका 

यातून ट्रुडो सरकारची कार्यक्षमता आणि भारतद्वेष लक्षात येतो ! असे सरकार भारतावर आरोप करून जगात हास्यास्पदच ठरत आहे !