बंदमुळे इंफाळ खोर्‍यातील जनजीवन विस्कळीत !

इंफाळ – मणीपूरमधील २७ विधानसभा मतदारसंघांच्या समन्वय समितीच्या आवाहनावरून ५ ऑगस्टला पाळण्यात आलेल्या २४ घंट्यांच्या बंदमुळे इंफाळ खोर्‍यातील जनजीवन विस्कळीत झाले. बहुतांश सर्वच वस्त्यांमधील बाजारपेठा बंद होत्या. सार्वजनिक वाहतूक आणि शाळाही बंद ठेवण्यात आल्या होत्या. पर्वतीय जिल्ह्यांमध्ये मात्र या बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही.

या बंदविषयी माहिती देतांना समन्वय समितीचे समन्वयक एल्. विनोद म्हणाले, ‘‘मणीपूरशी संबंधित विविध सूत्रांवर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याच्या मागणीसाठी या बंदचे आवाहन करण्यात आले होते. हा बंद लोकांच्या अडचणींमध्ये भर घालण्यासाठी नव्हे, तर सरकारवर दबाव आणण्यासाठी होता.’’

मणीपूर विधानसभेचे अधिवेशन २१ ऑगस्टपासून बोलवावे, अशी शिफारस राज्य मंत्रीमंडळाने ४ ऑगस्टला राज्यपाल अनसूया उईके यांच्याकडे केली.