बृहन्‍मुंबईत २९ जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश !

प्रतीकात्मक छायाचित्र

मुंबई, २१ जुलै (वार्ता.) – बृहन्‍मुंबई हद्दीत शांतता आणि सुव्‍यवस्‍था राखण्‍यासाठी २९ जुलै २०२३ पर्यंत पोलीस उपआयुक्‍त (अभियान) यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत. ५ किंवा त्‍यापेक्षा अधिक व्‍यक्‍तींचा जमाव करणे, मिरवणूक काढणे, जमाव करून ध्‍वनीवर्धकाचा वापर करणे, फटाके फोडणे यास आदेशानुसार प्रतिबंध घालण्‍यात आला आहे.

विवाह आणि विवाह प्रथेशी संबंधित समारंभ, अंत्‍यविधी, अन्‍य संस्‍था आणि संघटनांच्‍या कायदेशीर बैठका, क्‍लबमध्‍ये होणारे कार्यक्रम, सामाजिक मेळावे, सहकारी संस्‍था, तसेच अन्‍य संस्‍थांच्‍या नियमित कामकाजाचा भाग म्‍हणून होणारे कार्यक्रम, आस्‍थापने, दुकाने, कारखाने, सहकारी संस्‍था, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, शाळा-महाविद्यालये, शासकीय-अशासकीय कार्यालये, न्‍यायालये यांना या बंदी आदेशातून वगळण्‍यात आले आहे. तसेच पोलिसांच्‍या पूर्व अनुमतीसह शांततापूर्ण मार्गाने मोर्चास या जमावबंदीतून वगळण्‍यात आले आहे, असे पोलीस उपायुक्‍त विशाल ठाकूर यांनी आदेशान्‍वये कळवले आहे.