गोसीखुर्द धरणाच्या तांत्रिक दोषयुक्त वितरिकेमुळे शेतपिके पाण्याखाली !

  • शेतकर्‍यांच्या तक्रारींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

  • १५ ऑगस्टपर्यंत स्थिती न सुधारल्यास शेतकर्‍याची आत्मदहनाची चेतावणी

भंडारा – हरितक्रांतीच्या उद्देशाने वैनगंगा नदीवर गोसीखुर्द धरणाची निर्मिती करण्यात आली आहे. डाव्या आणि उजव्या कालव्याच्या माध्यमातून शेतांना पाणी मिळण्यासाठी तेथे वितरिका सिद्ध करण्यात आल्या आहेत; मात्र त्यांच्यात तांत्रिक दोष असून अनेक ठिकाणी त्या अर्धवट आहेत. त्यामुळे त्यातून येणारे पाणी शेकडो हेक्टर शेतीतील शेतकर्‍यांच्या शेतात साठत आहे. परिणामी शेतातील उभे पीक पाण्याखाली येऊन त्याची नासाडी होत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक चिंतेत आहेत; परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

शेतकरी प्रकाश नागतोडे यांनी अनेकदा याविरोधात तक्रारी दिल्या; पण त्याकडे लक्षच देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांनी प्रशासनाला ३१ जुलैपर्यंतची समयमर्यादा दिली आहे. ‘प्रशासनाने आमची शेती अधिग्रहित करून आम्हाला आर्थिक मोबदला द्यावा, अन्यथा वितरिकेचे काम योग्य करून आर्थिक फटक्यातून आमची सुटका करावी. तसे न झाल्यास १५ ऑगस्टला प्रशासनाच्या विरोधात आत्मदहन करू’, अशी चेतावणी त्यांनी दिली आहे.

संपादकीय भूमिका

  • जर वितरिकेचे कामच पूर्ण झाले नव्हते, तर त्या कालव्यांतून पाण्याचा प्रवाह चालू का करण्यात आला ?
  • शेतकर्‍यांची होणारी आर्थिक हानी कोण भरून काढणार ?