इंदूर (मध्यप्रदेश) येथे कपाळावर टिळा लावून आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षिकेकडून मारहाण

  • पालकांची शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार

  • जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशाचे पालन करू ! – शाळेची भूमिका

इंदूर (मध्यप्रदेश) – येथील धार मार्गावरील बाल विज्ञान शिशू विहार उच्च माध्यमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी कपाळावर टिळा लावल्याने शिक्षिकेने काही विद्यार्थ्यांना मारहाण केली. यावरून विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार केली.  मुख्याध्यापकांनी सांगितले की, या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशांचे पालन केले जाईल.

शिक्षिका पद्मा सिसोदिया यांनी शाळेत टिळा लावून आलेल्या ६-७ विद्यार्थ्यांना मारहाण केली आणि शाळेतून बाहेर काढले होते. पालकांना ही माहिती मिळाल्यावर ते शाळेत पोचले. मुख्याध्यापक ओमप्रकाश सिंह आणि शिक्षिका सिसोदिया हे पालकांचे काहीच ऐकून घेत नव्हते. त्यांचे म्हणणे आहे, ‘टिळा लावण्यावर बंदी नाही; मात्र आम्ही शाळेत धर्माला प्रोत्सहन देऊ इच्छित नाही.’ (धार्मिकता आणि धर्मांधता यांतील भेद न समजणारे मुख्याध्यापक आणि शिक्षिका ! टिळा लावल्याचे आध्यात्मिक लाभ या दोघांना कळला असता, तर त्यांनी अशी भूमिका घेतली नसती ! – संपादक) पालकांनी सांगितले की, मुले शाळेत येण्यापूर्वी मंदिरात जातात आणि तेथे टिळा लावतात.

संपादकीय भूमिका

शाळेत विद्यार्थिनी बुरखा घालून आल्या असत्या, तर त्यांना मारहाण करण्याचे धाडस शिक्षिकेने दाखवले असते का ? मारहाण केली असती, तर एव्हाना तिला शिरच्छेद करण्याची धमकी मिळाली असती !