‘द कश्‍मीर फाइल्‍स’पासून ‘द केरल स्‍टोरी’पर्यंत निधर्मीवाद्यांनी गोंधळ आणि आटापिटा करण्‍यामागील कारणमीमांसा !

१. ‘हिंदु मुली स्‍वतःहून मुसलमान मुलाशी प्रेम करतात’, असे प्रेमकथांमधून सिद्ध करण्‍याचा प्रयत्न !

‘सध्‍या अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्याचे गोडवे गाणार्‍यांना उधाण आले असून ते भयंकर चिंतेत आहेत. त्‍यांची समस्‍या वेगळी आहे. ती समस्‍या इतकी निष्‍पाप आहे की, तिची निरागसता बाहेर दिसून येते. तिचे वास्‍तव सामान्‍य लोकांना समजत आहे, हे पुष्‍कळ मनोरंजक आहे. किंबहुना आतापर्यंत प्रत्‍येक कुकर्म हे अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्याच्‍या आडून सांगणारे लोक त्‍याच्‍या मर्यादा ठरवायला लागले आहेत. सध्‍या त्‍यांची निरागसता त्‍या सत्‍यतेविषयी आहे, जी त्‍यांनी त्‍यांच्‍या धोरणांमुळे बाहेर येऊ दिली नाही. आतापर्यंत या लोकांनी हिंदु मुलगी आणि मुसलमान मुलगा यांच्‍या प्रेमकथांमधून हिंदु कुटुंबाची मानहानी करण्‍याचे षड्‌यंत्र रचले. एवढेच नाही, तर त्‍यांनी ‘हिंदु मुली या स्‍वतःहूनच मुसलमान मुलाशी प्रेम करतात’, असे त्‍यांच्‍या कथा, कविता इत्‍यादींमधून सिद्ध करण्‍याचा प्रयत्न केला आहे.

२. ‘भारतात मुसलमान शोषित आणि हिंदु त्‍यांचे शोषण करणारे’, असा भ्रम पसरवण्‍यात निधर्मीवादी यशस्‍वी !

‘भारतात मुसलमान घाबरले आहेत’, हे आंतरराष्‍ट्रीय चर्चांमधून समोर येते, तेव्‍हा त्‍यात चित्रपटांचे योगदान मोठे असते. यातून वारंवार एक खोटी बाजू समोर आणली जाते. ती म्‍हणजे हिंदु मुलगी आणि मुसलमान मुलगा यांच्‍या प्रेम प्रकरणात केवळ मुलीचे कुटुंबीयच दोषी असतात. ‘पीके’ या हिंदी चित्रपटामध्‍ये हिंदु मुलगी आणि पाकिस्‍तानी मुसलमान मुलगा यांच्‍या प्रेमाची गोष्‍ट दाखवण्‍यात आली होती. त्‍यात हिंदु कुटुंब कट्टर आणि प्रेमाचे शत्रू असल्‍याचे दाखवण्‍यात आले. अशाच प्रकारे ‘केदारनाथ’ हा आणखी एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्‍यातही हिंदु मुलीच्‍या आई-वडिलांना कट्टर विरोधक दाखवण्‍यात आले होते. नुकत्‍याच आलेल्‍या ‘अंतरंगी रे’ या चित्रपटामध्‍ये अक्षयकुमार अभिनय करत असलेल्‍या पात्राची त्‍याच्‍या हिंदु पत्नीच्‍या घरचेच हत्‍या करतात, असे दाखवले आहे. जेव्‍हापासून भारतातील लोकांनी चित्रपट बघण्‍यास प्रारंभ केला आहे, तेव्‍हापासून ते हाच दृष्‍टीकोन बघत आले आहेत, ज्‍यात शोषण करणारे हिंदु आणि मुसलमान मात्र पीडित असल्‍याचे दाखवण्‍यात आले. याचा अर्थ ‘राजकीय अल्‍पसंख्‍यांक’ ही संकल्‍पना चित्रपटांमध्‍ये तंतोतंत उतरली आहे. प्रत्‍यक्षात अल्‍पसंख्‍यांकांची व्‍याख्‍या अद्याप पूर्णपणे स्‍पष्‍ट झालेली नाही, हेही तेवढेच सत्‍य आहे. जर हे संख्‍यात्‍मकदृष्‍ट्या निश्‍चित केले, तर असे म्‍हटले जाईल का की, भारतावर शतकानुशतके अल्‍पसंख्‍यांकांचे राज्‍य होते ? आणि तसे असेल, तर मग हे लोक पीडित कसे ? देशात  भ्रमाचे जाळे इतके घट्ट विणले गेले आहे की, त्‍यात स्‍वातंत्र्यापूर्वी आणि नंतर हिंदूंचे शोषण अन् उदारमतवादी मुसलमानांचा आवाज यांची प्रत्‍येक वेदना दडपली गेली अन् ती पुढेही येऊ शकली नाही.

३. स्‍वत:वर वेळ आल्‍यावर निधर्मीवाद्यांकडून अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्यावर अंकुश ठेवण्‍याची भाषा !

अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्याचे गोडवे गाणार्‍यांनी चित्रपटांच्‍या ‘सॉफ्‍ट पॉवर’चा (सौम्‍य शक्‍तीचा) पुरेपूर वापर केला. गेल्‍या अनेक वर्षांपासून त्‍यांची कुचंबणा होत आहे. त्‍यामुळे ‘या अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्यावर काहीतरी अंकुश असला पाहिजे’, असे सूत्र ते मांडत आहेत. आता ते अंकुश ठेवण्‍याची गोष्‍ट का करत आहेत ?; कारण त्‍यांनी संपूर्ण कथानकामध्‍ये (‘नॅरेटिव्‍ह’मध्‍ये) काश्‍मिरी हिंदूंची अनेक हत्‍याकांडे आणि जीव वाचवण्‍यासाठी त्‍यांनी केलेले विस्‍थापन वर्षानुवर्षे समोर येऊच दिले नाही.

चित्रपट आणि साहित्‍य यांच्‍या माध्‍यमातून त्‍यांनाच (हिंदूंनाच) दोषी बनवून समोर ठेवण्‍यात आले. प्रत्‍यक्षात ते सर्वांत मोठे पीडित होते. आता चर्चेच्‍या पातळीवर सातत्‍याने नाकारण्‍यात येणार्‍या विषयांवर चित्रपट सिद्ध होत आहेत, तर अभिव्‍यक्‍तीच्‍या नावाने त्‍यावर परत अंकुश लावण्‍याची गोष्‍ट केली जात आहे. हे प्रकरण हिंदु महिलांचे बलपूर्वक धर्मांतर होत असल्‍याचे आणि त्‍यांना प्‍यादी बनवून ‘इसिस’मध्‍ये सहभागी करून घेण्‍याचे आहे. आकडे पुष्‍कळ काही सांगतात आणि अजेंडा (कार्यसूची) काही दुसराच ! ‘द केरल स्‍टोरी’ या चित्रपटात ते सत्‍य दाखवण्‍यात येत आहे. जे आजवर सर्वांनाच ठाऊक होते; पण ते समोर आणू शकले नाहीत. याचे कारण या विषयावर लिहिणे किंवा त्‍यावर चित्रपट बनवणे, म्‍हणजे त्‍यांचे वैचारिक ‘लिंचिंग’ (हत्‍या) होणार, हे ठरलेले होते आणि ही सामान्‍य गोष्‍ट होती. असे लिखाण केल्‍यावर अनेक प्रकारचे शिक्‍के (लेबल) बसवले जातात, संबंधित व्‍यक्‍तीला विविध प्रकारे त्रास दिला जातो आणि त्‍याला समाजात ‘विष पसरवणारा’ असे म्‍हटले जाते.

४. जगभर ‘ग्रूमिंग गँग’ची चर्चा होत असतांना ‘द केरल स्‍टोरी’ चित्रपटाचे प्रदर्शन !

हिंदु मुलींना नाव पालटून इतर अनेक पद्धतींनी प्रेमाच्‍या जाळ्‍यात अडकवले जाते. त्‍यानंतर त्‍यांचा अन्‍य प्रयोगासाठी वापर केला जातो. हे प्रयोग केवळ भारतातच होत आहेत, असे नाही, तर विदेशातही होत आहेत. नुकतीच ब्रिटनमध्‍ये ‘ग्रूमिंग गँग’ (अल्‍पवयीन मुलींना फसवून किंवा त्‍यांना प्रेमपाशात ओढून त्‍यांच्‍यावर अत्‍याचार करणारी टोळी) कार्यरत असल्‍याची चर्चा झाली. त्‍यात पाकिस्‍तानी नागरिक तेथील मुलींना कसे अडकवतात आणि सरकार कशी पावले उचलणार आहे ? यावर प्रकाश टाकण्‍यात आला. त्‍यात पाकिस्‍तानचे नावही पुढे आले होते. धर्मांध तरुणांंकडून होणारे बलपूर्वक ‘ग्रूमिंग’ आणि कट्टरतेवर आधारित ‘ग्रूमिंग’ यांची जगभर चर्चा होत आहे. त्‍याच काळात या समस्‍येवर ‘द केरल स्‍टोरी’ हा चित्रपट बनवण्‍यात आला.

या चित्रपटामध्‍ये केरळमध्‍ये कसे धर्मावर आधारित प्रेमाच्‍या जाळ्‍यात हिंदु आणि ख्रिस्‍ती मुलींना फसवण्‍यात येत आहे, हे दाखवण्‍यात आले आहे. जेव्‍हा या चित्रपटाचा ‘टीझर’ (चित्रपटाचा संक्षिप्‍त भाग) प्रदर्शित झाला, तेव्‍हापासून अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्याचा पुरस्‍कार करणारी ‘लॉबी’ (वैचारिक गट) या चित्रपटाच्‍या विरोधात समोर आली होती आणि हा चित्रपट थांबवण्‍यासाठी कायदेशीर पावले उचलणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले होते; पण प्रत्‍यक्षात ही लॉबी सत्‍याला इतकी का घाबरते ? त्‍यांना असे वाटते का की, ‘ज्‍या प्रकारे ‘द कश्‍मीर फाइल्‍स’ या चित्रपटाने काश्‍मीर प्रकरणात त्‍यांना उघडे पाडले, तसेच काहीसे याही वेळी होईल ? ‘द केरल स्‍टोरी’ हा चित्रपट केरळसह संपूर्ण देशात हिंदु आणि ख्रिस्‍ती मुलींच्‍या विरोधात चालू असलेले षड्‍यंत्र लोकांसमोर उघडे करील ? कथित प्रेमाचा संदर्भ देऊन ज्‍यांना गायब केले जाते, त्‍या मुलींविषयी ही ‘लॉबी’ का बोलू इच्‍छित नाही ?’, हा एक मोठा प्रश्‍न आहे.

५. ‘द केरल स्‍टोरी’ चित्रपटामुळे छुपे धोरण उघड होत असल्‍यानेे त्‍यावर बंदी घालण्‍याचे धर्मनिरपेक्षतावाद्यांचे प्रयत्न !

‘सुदीप्‍तो सेन या चित्रपटाचे दिग्‍दर्शक आहेत. त्‍यांनी वर्ष २०१८ मध्‍ये केरळमधील ‘लव्‍ह जिहाद’वर एक माहितीपट (डॉक्‍युमेंट्री) बनवला होता. त्‍याचे नाव ‘प्रेमाच्‍या नावावर’ असे होते. हा माहितीपट तेव्‍हा मोठा प्रभाव टाकू शकला नाही. त्‍यामुळे आता विपुल अमृत शहा यांच्‍या ‘बॅनर’खाली सुदीप्‍तो सेन यांनी त्‍या हरवलेल्‍या मुलींची कथा समोर आणली आहे. त्‍यामध्‍ये ‘हिंदु मुलगी आणि मुसलमान मुलगा यांच्‍यातील पवित्र प्रेम अन् क्रूर हिंदु पालक’ या अजेंडाला छेद देण्‍यात येत आहे. आता धर्मनिरपेक्षतावादी लॉबी अजेंडा उद़्‍ध्‍वस्‍त होत असल्‍याने हताश झाली आहे. ‘खोट्याला पाय नसतात’, हे लक्षात घ्‍यायला हवे. त्‍यामुळे जसा ‘काश्‍मीर अजेंडा’चे सत्‍य दाखवणारा चित्रपट आला, तेव्‍हा त्‍यांचा ‘अजेंडा’ उद़्‍ध्‍वस्‍त झाला. आता अनेक वर्षे चालू असणार्‍या ‘एका हिंदु मुलीचे कसाई पालक आणि निरागस प्रेम’ या कथानकाचे खरे वास्‍तव समोर आणणारा ‘द केरल स्‍टोरी’ चित्रपट प्रसारित झाला आहे. त्‍यामुळे ही लॉबी पुन्‍हा कांगावा करत आहे. अशा परिस्‍थितीत एक अतिशय महत्त्वाचा प्रश्‍न उपस्‍थित होतो की, एकतर्फी अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्याची आवश्‍यकता यांना का हवी असते ? जेणेकरून भारत आणि भारताचा आत्‍मा यांच्‍या विरोधात चर्चा उभी केली जाऊ शकेल.’

– सोनाली मिश्रा

(साभार : साप्‍ताहिक ‘पांचजन्‍य’, ३०.४.२०२३)

संपादकीय भूमिका

इतकी वर्षे लपवलेले सत्‍य चित्रपटांतून उघड झाल्‍यावर अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्याला दाबू पहाणार्‍या निधर्मींचा कांगावा जाणा !