(म्हणे) ‘भारताला हिंदु राष्ट्र बनवू’ असे बोलण्याची काय आवश्यकता ?’ – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना प्रश्‍न !

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

पाटलीपुत्र (बिहार) – ‘भारताला हिंदु राष्ट्र बनवू’ असे जो कुणी बोलतो त्याचे मला आश्‍चर्य वाटते. असे बोलण्याची काय आवश्यकता आहे ? येथे हिंदु आणि मुसलमान असे सर्व धर्माचे लोक आहेत. सर्वांना त्यांच्या पद्धतीने पूजा करण्याचा अधिकार आहे. सर्व धर्म मानण्याचा सर्वांना अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी व्यक्त केली.  बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी हिंदु राष्ट्राविषयी केलेल्या विधानाच्या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते. पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री गेल्या ४ दिवसांपासून पाटलीपुत्र येथे हनुमान कथेचे वाचन करत आहेत. पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या हनुमान कथेला उपस्थित रहाण्याचे आमंत्रण मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना देण्यात आले होते; मात्र त्यांनी याला नकार दिला.

संपादकीय भूमिका

जगात ५२ इस्लामी, तर १५० हून अधिक ख्रिस्ती राष्ट्रे आहेत; मात्र १०० कोटी हिंदूंचे एकही राष्ट्र नाही. जर बहुसंख्य हिंदूंना ‘आमचे हिंदु राष्ट्र असावे’, असे वाटत असेल, तर त्यात चूक ते काय ?

(म्हणे) ‘हिंदु राष्ट्राविषयी विधाने करणे, हे राज्यघटनेचे उल्लंघन !’

नितीश कुमार पुढे म्हणाले की, राज्यघटना सर्वांच्या संमतीने बनवण्यात आली आहे. जे कुणी हिंदु राष्ट्राविषयी स्वतःच्या मर्जीने बोलत आहेत, त्याला कोणतेही महत्त्व नाही. प्रसारमाध्यमांनी हे सांगायला हवे, ‘अशी विधाने करणे म्हणजे राज्यघटनेचे उल्लंघन आहे.’ जे कुणी हिंदु राष्ट्राविषयी बोलत आहेत त्यांचा जन्म स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी झालेला नाही. राज्यघटना प्रत्येकाच्या उत्थानासाठी आहे. राज्यघटनेनेत पालट करायचे असेल, तर संसदेत दोन तृतीयांश बहुमत पाहिजे.

संपादकीय भूमिका

हिंदु राष्ट्राविषयी बोलण्याने राज्यघटनेचे कुठेही उल्लंघन होत नाही. राज्यघटनेत आतापर्यंत १०० वेळा सुधारणा करण्यात आल्या आहेत. अशी आणखी एक सुधारणा करून त्यात भारत हे हिंदु राष्ट्र असल्याचे घोषित करता येऊ शकते !