पोर्तुगिजांवर वचक ठेवणारा सार्वभौम राजा छत्रपती संभाजी महाराज !

आज दिनांकानुसार ‘छत्रपती संभाजी महाराज जयंती’ आहे. त्या निमित्ताने…

छत्रपती संभाजीराजांच्या वधानंतर पोर्तुगीज आणि मराठे यांच्यामधील युद्ध जवळ जवळ संपुष्टात आले; परंतु छत्रपती संभाजीराजे जिवंत असतांना पोर्तुगिजांना त्यांचा एवढा वचक वाटत होता की, ते त्यांना सार्वभौम राजा मानत होते. छत्रपती संभाजीराजांनी पोर्तुगिजांना नरमाईचे धोरण अवलंबायला लावले ते तलवारीच्या बळावर. ते जर आणखी काही वर्षे जगले असते, तर पोर्तुगिजांना ठाणे जिल्ह्यातून आणि गोव्यातून हाकलून लावण्यात यशस्वी झाले असते; परंतु पोर्तुगिजांचे नशीब बलवत्तर होते, हेच खरे.

छत्रपती संभाजी महाराज

पोर्तुगीज-मराठा तहाच्या वाटाघाटी !

औरंगजेबाचा पुत्र शाहजादा अकबर हा आपल्या बापाशी भांडून छत्रपती संभाजीराजे यांच्या आश्रयास येऊन राहिला होता. तो छत्रपती संभाजीराजांचा, तसेच पोर्तुगिजांचाही मित्र होता. त्याचा भाऊ शाहआलम याने छत्रपती संभाजीराजांच्या प्रदेशात शिरून आक्रमणे चालू केली. त्या वेळी शाहजादा अकबरने छत्रपती संभाजी आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये तह घडवून आणण्याचा प्रयत्न चालू केला. छत्रपती संभाजीराजांना एकाच वेळी दोन आघाड्यांवर लढणे अशक्य झाल्याने ते पोर्तुगिजांशी तह करण्यास सिद्ध झाले.

पोर्तुगीज-मराठा  संघर्ष अखेरपर्यंत चालूच !

पोर्तुगीज आणि छत्रपती संभाजीराजे या दोघांचे युद्ध छत्रपती संभाजीराजे यांच्या मृत्यूपर्यंत चालू राहिले. तोपर्यंत मराठ्यांनी पोर्तुगीज अमलाखालचा जो प्रदेश काबीज केला होता, त्याचा पुष्कळसा भाग मराठ्यांच्या हाती होता. गोव्याचा गव्हर्नर दॉ रुद्रिगु द कॉश्त हा २४.१.१६८८ या दिवशी पोर्तुगालच्या राजास लिहितो, ‘छत्रपती संभाजीराजे यांच्याशी चालू असलेल्या युद्धास अजून विराम पडलेला नाही. ते विजरेई कॉट द आल्व्होर यांच्या कारकीर्दीत चालू झाले होते.’

(साभार : पोर्तुगीज-मराठा संबंध या ग्रंथामधून संक्षिप्त. साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या सौजन्याने)’