(म्हणे) ‘राष्ट्र’ आणि ‘धर्म’ संकल्पना नष्ट व्हाव्यात ! – भालचंद्र नेमाडे, ज्येष्ठ साहित्यिक

भालचंद्र नेमाडे

मुंबई – ‘औरंगाबाद’ आणि ‘उस्मानाबाद’ शहरांचे नामांतर करणारे क्षुद्र लोक आहेत. अशा नामांतराने काही साध्य होणार नाही. राष्ट्र आणि धर्म या संकल्पना नष्ट झाल्या पाहिजेत, असे फुकाचे वक्तव्य ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेे. (‘औरंगाबाद’ आणि ‘उस्मानाबाद’ यांचे नामांतर करणारे जर क्षुद्र असतील, तर भारतावर आक्रमण करून या भूमीचा आणि संस्कृतीचा विद्ध्वंस करणारे नेमाडे यांना कोण वाटतात ? – संपादक)

सौजन्य एबीपी न्यूज 
औरंगाबादला पाणी द्या. तिथे चांगली झाडे लावा. हडप्पा आणि मोहेंजोदडो संस्कृती जशी नष्ट झाली, तसा आपल्या संस्कृतीच्या अंताला प्रारंभ झाला आहे. (मोगल, इंग्रज, डच, पोर्तुगीज यांनी भारतावर आक्रमण करून येथे शेकडो वर्षे राज्य केल्यानंतरही  हिंदु संस्कृती टिकून राहिली; परंतु ‘औरंगाबाद’, ‘उस्मानाबाद’ यांविषयी जिव्हाळा असलेल्या नेमाडे यांना नेमकी कोणती संस्कृती आपली वाटते ?’, हा खरा प्रश्‍न आहे ! – संपादक)

भारतात लोकशाही धोक्यात आली असून सत्य बोलणार्‍याला पोलीस संरक्षणात फिरावे लागते. देशीवाद हा जगभरात स्वीकारला गेला आहे. ज्या मातीतून आपण उगवलो त्या मातीशी कृतज्ञ रहाणे म्हणजे ‘देशीवाद’ आहे. जगभरात उजव्या विचारसरणी वाढीस लागल्याने ‘देशीवाद’ धोक्यात आला आहे. (ज्या मातीचा आणि देशीवादाचा नेमाडे यांना अभिमान वाटतो, त्या मातीची संस्कृती आणि देशीवाद मोगलांच्या आक्रमणाने उद्ध्वस्त झाला, हे नेमाडे यांना लक्षात येऊ नये, हे आश्‍चर्यच नव्हे काय ? – संपादक) इंग्रजी शाळांमधून शिकणारी मुले पुढे काही होऊ शकत नाहीत. त्यांच्यात आत्मविश्‍वासाचा अभाव जाणवतो, असे या वेळी भालचंद्र नेमाडे म्हणाले.

संपादकीय भूमिका 

  • सर्व संकल्पनांविषयी गोंधळ असलेल्या अशा मराठी साहित्यिकांमुळे समाजाला दिशा मिळण्याऐवजी समाजाचा वैचारिक गोंधळच वाढला आहे, असे म्हटले तर चूक ठरू नये !
  • आपण ज्या भूमीत रहातो तेथील संस्कृती, परंपरा, इतिहास या सर्वांच्या समुच्चयाचा ‘राष्ट्र’ या संकल्पनेत समावेश होतो. ‘जो समाजाला धारण करतो तो धर्म’, अशी धर्माची व्याख्या आहे. अर्थात् प्रत्येकाने स्वत:च्या कर्तव्याचे पालन करणे म्हणजे धर्माचरण. या संकल्पनांविषयी अज्ञान असलेल्या भालचंद्र नेमाडे यांना साहित्यिक म्हणणे म्हणजे ‘साहित्यिक’ शब्दाचे विडंबन होय !