हिंदु धर्मात सांगितल्याप्रमाणे विवाहसंस्थेचे जतन करा !

सध्याच्या काळानुसार विवाहाकरिता पुरुषासाठी २५ ते ३० वर्षे आणि स्त्रीसाठी २० ते २५ वर्षे, ही वयोमर्यादा सर्वोत्तम समजली जाते. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ही वयोमर्यादा आदर्श आहे. विवाह संस्कारामुळे धार्मिक आणि सामाजिक बंधन प्राप्त होत असल्याने अनैतिकता किंवा विवाहबाह्य संबंध यांचे प्रमाण पुष्कळ अल्प असते. थोडक्यात हिंदु धर्मात शारीरिक वासनांची पूर्ती करण्यासाठी विवाह विधी सांगितलेला नाही, तर चार पुरुषार्थांपैकी ‘काम’ हा पुरुषार्थ साध्य करून हळूहळू ‘मोक्ष’ या पुरुषार्थाकडे जाता यावे, यासाठी प्रायः विवाहसंस्काराचे प्रयोजन आहे. समाजात सुप्रजा निर्माण होऊन समाजाचे अस्तित्व टिकावे आणि त्याचा उत्कर्ष व्हावा, यांसाठी पवित्र अशा या विवाहसंस्काराची, म्हणजे गृहस्थधर्माची स्थापना झाली आहे. विवाहसंस्थेचे जतन करण्यातच संपूर्ण समाजाचे, पर्यायाने राष्ट्राचे सर्वंकष कल्याण आहे.
(संदर्भ – सनातन निर्मित ग्रंथ – विवाहसंस्कार) ॐ